शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कथा
Written By
Last Modified: बुधवार, 10 ऑगस्ट 2022 (14:28 IST)

नाव हे असलेच पाहिजे

काही वर्षे मागे पर्यंत घराघरात एक पद्धत अस्तित्वात होतीच. ती पद्धत म्हणजे

दुकानातुन घरात वापरायची कोणतीही भांडी आणली की ती दुकानातुन आणतांनाच त्यावर नावे घालुन आणायची. भांडे लहान वा मोठे प्रश्नच नसे, त्यावर नाव हे असलेच पाहिजे.

समजा बायको सोबत नसतांना नवरा एकटा दुकानात गेला व गरजेचे भांडे घेतले व घरी आला की भांडे गृहिणी नंतर पहायची आधी त्यावर नांव काय घातले आहे ते पहात असे, त्या भांड्यावर तीला तिचे नांव दिसले की देव भेटल्याचा आनंद मिळत असे. नांव जर दिसले नाही तर मात्र काही खरे नसे, ती आल्यापावली नवऱ्याला परत दुकानात पाठवुन त्यावर नांव घालुन आणा असे सांगत असे किंवा स्वत: जावुन नांव घालुन आणुन मगच ते वापरायला सुरवात करीत असे. काय हो बरोबर आहे ना ? आजही तुमच्या घरात नांव घातलेली खुप भांडी असतील पहा. आता दिवस बदलले आहेत आता विचार हा असतो की सगळे करायचे पण कुठे नांव निशाणी ठेवायची नाही.
 
लग्नकार्यात वा अन्य प्रसंगी आलेली भांडी पहा, त्यात वर्गवारी होत असे, नांव घातलेली व नांव न घातलेली भांडी वेगळी केली जात असत. नांव असलेली भांडी वापरात घेतली जायची व नांव नसलेली भांडी प्रसंगा प्रसंगाने देण्याघेण्यासाठी वापरी जात असत. अशी ही नांव नसलेली भांडी बेवारशा समान या हातातुन त्या हातात, या घरातुन त्या घरात नुसती फ़िरत रहायची, उपयोग काहीच नाही.
 
असो हे सारे आले कशा वरुन तर नांवावरुन. आता ती भांडी जरा घडीभर बाजुला ठेवा व विचार करा आपला देह हे एक पंचभुतांनी बनलेले भांडेच आहे. ते जन्माला येते तेव्हा त्यावर काही नांव नव्हतेच. ते असेच फ़िरत फ़िरत आपल्या घरात आले, मग त्या देहाला नांव दिले जाते ते मरे पर्यंत रहाते पण देह संपला की नांव संपते व बिना नांवाचा देह योनी योनीतुन फ़िरायला जातो.
 
आता ही पळापळ थांबायला उपाय काय सांगितला आहे आपल्या संत सत़्पुरुष गुरु सद़्गुरु समर्थांनी ? हाच हो सोपा आहे, जमेल तेव्हा जमेल तसे जमेल तितके देवाचे नांव घे. म्हणजे काय होईल ?  देह पडला तरी देवाचे नांव तुझ्या सोबत येईल ते नांव देवाने पाहिले की देव म्हणेल याच्यावर माझे नांव आहे याला माझ्या घरात पाठवा, ज्या भांड्यांवर माझे नांव नसेल त्यांना पाठवुन द्या या घरातुन त्या घरात म्हणजे या योनीतुन त्या योनीत फ़िरायला.
 
आपले काय होते माहिती आहे का ? आपण म्हणतो जमेल तसे, जमेल तेव्हा, जमेल तिथे नांव घे, नाम घे असे सांगितले आहे.  झाले आपण पळवाट शोधण्यात पटाईत. आपण म्हणतो जमेल तसे ना ! अहो नाही जमले त्याला आम्ही काय करणार. मग देव म्हणतो हरकत नाही मग रहा फ़िरत निवांत घरोघरी, या योनीतुन त्या योनीत.
 
नाम घे असे देव कधीच सांगत नाही, तो म्हणतो हे सांगायचे काम मी माझ्या प्रतिनिधींना म्हणजे संत, सत्पुरुष, गुरु, सद़्गुरु, समर्थ यांना दिले आहे व ते काम ही मंडळी चोख करतात. माझे काम फ़क्त भांडे माझ्याकडे आले की त्यावर नांव आहे का ते पहायचे. नांव असेल तर माझ्यापाशी ठेवायचे व नांव नसेल तर पुढील प्रवासाला पाठवणे.
 
- सोशल मीडिया