Last Modified: इंदूर , मंगळवार, 16 फेब्रुवारी 2010 (16:54 IST)
आता आठवला ग्रामीण भारत
कुशाभाऊ ठाकरे नगरात (ओमेक्स सिटी) लहरणार्या पिकांमध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक १७ फेब्रुवारीपासून होणार आहे. इंडिया शायनिंगचा नारा एकेकाळी देणार्या या पक्षाला या अधिवेशनाच्या निमित्ताने ग्रामीण भारताची आठवण झाली आहे. त्यामुळे कोणत्याही हॉटेलात हे अधिवेशन न घेता उघड्या मैदानात शेतांच्या सानिध्यात ते भरविले जात आहे.
अधिवेशनस्थळ 'इको फ्रेंडली' असावे याकडे लक्ष देण्यात आले असून खेडेगावचा 'फील' देण्यात आला आहे. या भागात फक्त भाजपचे वरिष्ठ नेतेच रहातील. बैठकांसाठी दोन शेतांच्या मधले स्थान निवडण्यात आले आहे.
भोजनाची व्यवस्था झोपड्यांमध्ये करण्यात आली आहे. त्यासाठी १६ झोपड्या बनविण्यात आल्या आहेत. खाटेवर बसून जेवण करता येईल. ज्येष्ठ नेत्यांसाठी अर्थात खुर्च्या असतील. संपूर्ण परिसराला शेणाने सारवण्यात आले आहे. सजावटीसाठी लाकडी ओंडके, चटया, टोकर्या, सुप यांचा वापर करण्यात आला आहे. सजावटीची जबाबदारी अजय मलमकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. ज्येष्ठ नेत्यांची नावे सुपावर लिहिली जातील.