- मनोरंजन
» - बॉलीवूड
» - चित्रपट समीक्षा
अल्लादिन- वैतागवाडी!
निर्माता : इरोज़ इंटरनेशनल, बाउंड स्क्रिप्ट पिक्चर्स दिग्दर्शक : सुजॉय घोष संगीत : विशाल शेखरकलाकार : अमिताभ बच्चन, संजय दत्त, रितेश देशमुख, जैकलीन फर्नांडिसआतापर्यंत पुस्तकातून भेटलेला अल्लादिन आता चित्रपटातून आपल्या भेटीला आला आहे. पण ही कथा पडद्यावर आणताना त्यातली सौंदर्यस्थळेच कुरूप करून टाकली आहेत. अन्यथा, परीकथेतला राक्षस, त्याची ती जादुची सतरंजी, गरीब मुलगा नि श्रीमंत मुलगी आणि त्यांची प्रेमकहाणी, त्यात त्या मुलाला लाभलेली दैवी देणगी या सगळ्या मसाल्यातून एक चांगला चित्रपट तयार होण्याची नक्कीच शक्यता होती. पण दिग्दर्शक सुजॉय घोष यात साफ अपयशी ठरले आहेत. अर्थात हे केवळ सुजॉय घोष यांचेच अपयश आहे असे नाही, तर महानायक अमिताभ बच्चन आणि संजय दत्त यांचेही तितकेच अपयश आहे. दयाळू राक्षसाच्या भूमिकेत असलेले अमिताभ बच्चन आणि खलनायक रिंगमास्टर झालेला संजय दत्त या दोघांनीही या चित्रपटाचे बुडते तारू आणखी खोल कसे जाईल याचीच काळजी घेतल्याचे चित्रपट पाहिल्यावर वाटते. या दोघांचा आजपर्यंतचा 'ड' दर्जाचा अभिनय या चित्रपटात पहायला मिळतो. गोष्टीतला अल्लादिन आणि या चित्रपटातला अल्लादिन (रितेश देशमुख) यांच्यात काहीही साम्य नाही. कासीम हा त्याचा शाळेतला मित्र आणि त्याचे टोळके तेवढे त्याला गोष्टीतल्या अल्लादिनच्या नावाने चिडवत असतात. त्याचा जादुचा दिवा आणि त्या दिव्यातून बाहेर पडणारा राक्षस कुठे आहे अशी कुत्सित विचारणाही करत असतात. कासीम आणि त्याच्या गॅंगला तर तो हल्ली घाबरायलाही लागलेला असतो. लाजरा-बुजरा अल्लादिन त्याच्या कॉलेजातच शिकणार्या जस्मिनच्या (जॅकलिन फर्नांडिस) प्रेमात पडला आहे. अल्लादिनला ही जस्मिन एक दिवा भेट म्हणून देते. तो पाहून कासिम त्याची टर उडवतो. या दिव्याला घास म्हणजे त्यातून राक्षस निघेल, असा सल्लाही ते गंमती गंमतीत देतात. अल्लादिन असे करतो आणि खरोखरच त्यातून राक्षस बाहेर येतो. त्याला पाहून अल्लादिन घाबरून जातो. नंतर त्याला तो निघून जायला सांगतो. पण राक्षस त्याचा पिछा काही सोडत नाही. अल्लादिनच्या तीन इच्छा पूर्ण केल्याशिवाय जाणार नाही, असे तो सांगतो. अखेर अल्लादिन त्या तीन इच्छा सांगतो आणि राक्षस त्या पूर्ण करतो. पण दुष्ट जादूगार रिंग मास्टरला (संजय दत्त) या जादुच्या दिव्याविषयी कळते आणि हा दिवा मिळविण्याच्या प्रयत्नाला तो लागतो. त्यानंतर चांगल्या आणि वाईटातली लढाई सुरू होते.
हा सगळा प्रवास पडद्यावर पहाणे म्हणजे वैतागवाडी आहे. अमिताभ एखाद्या बुजगावण्यासारखा दिसतो. त्याचा मेक अप नीट झालेला नाही. त्याच्या चेहर्यावर रंग थापलेत हे स्पष्टपणे जाणवते. त्याचे कपडेही तसेच विदुषकी आहेत. संजय दत्तही तसाच निष्प्रभ वाटतो. रितेश आणि जॅकलिन यांची जोडीही कंटाळवाणी आहे. एकुणात अल्लादिनच्या वाट्याला न जाणेच श्रेयस्कर.