फेरमतदानासाठी 'आप'ची निदर्शने
16 व्या लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात मतदानाची प्रक्रिया सुरु असून मतदार यादीतून लाखों मतदारांची नावे गायब झाल्यामुळे ते मतदानाच्या हक्कापासून वंचित राहिले आहे. असाच प्रकार औरंगाबाद मतदारसंघात देखील घडला आहे. यामुळे या मतदारसंघात फेरमतदान घ्यावे या मागणीसाठी आम आदमी पक्षातर्फे रविवारी भडकलगेट येथे निदर्शने करण्यात आली.
लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद मतदारसंघातून तब्बल दीड लाख मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. यासाठी 16 मेच्या मतमोजणीपूर्वी फेरमतदान घ्यावे, अशी मागणी 'आप'ने केली आहे. ज्या मतदारांची नावे 2009 च्या मतदार यादीमध्ये आहेत. मात्र 2014 च्या मतदार यादीमध्ये नाही. तसेच निवडणूक आयोगाचे ओळखपत्र असूनही मतदार यादीमध्ये नाव नसलेल्या मतदारांना या निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच या प्रकाराला कारणीभूत असणार्या दोषींवर कडक कारवाईचीही मागणी करण्यात आली आहे.