1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. आगामी नाट्य-चित्र
Written By वेबदुनिया|

सचिनचा 'आम्ही सातपुते'

सचिनचा 'आम्ही सातपुते'
PR
'नवरा माझा नवसाचा' नंतर सचिन पिळगावकर 'आम्ही सातपुते' हा नवा कोरा करकरीत चित्रपट घेऊन सज्ज झाले आहेत. याच महिन्यात हा चित्रपट रिलीज होणार आहे. हा चित्रपट 'सत्ते पे सत्ता' या चित्रपटावर आधारीत असल्याची चर्चा आहे. त्याची कथाही काहीशी तशीच आहे. सचिन यांनीही 'सत्ते पे सत्ता' मध्ये काम केले होते. पण त्यांनी हा चित्रपट 'सेव्हन ब्राईड्स फॉर सेव्हन ब्रदर्स' या मूळ इंग्रजी चित्रपटावरून प्रेरीत असल्याचे म्हटले आहे.

पण याची कथा 'सत्ते पे सत्ता' शी मिळती जुळती आहे. ती अशी- पूर्णा (सुप्रिया) एक अनाथ मुलगी आहे. तिला अण्णा (अशोक सराफ) आपली मुलगी मानून ते सांभाळतात. अण्णांना स्वतःच्याही सहा मुली असतात. अण्णांची खानावळ आहे. पूर्णा अण्णांच्या किचनचा ताबा घेते. किचनमधील सगळं व्यवस्थापन ती घेते. भाज्यांपासून स्वयंपाकापर्यंत सारं काही ती बघते. सहाजिकच तिच्यामुळे खानावळीचा दर्जाही वाढतो. पूर्णाची अन्नपूर्णा होते.

PR
कांद्या ( सचिन) हा अण्णांच्या खानावळीला भाज्या पुरवत असतो. रोजच्या व्यवहाराच्या निमित्ताने कांद्या आणि पूर्णाचा संबंध येतो आणि दोघे विवाहबद्धही होतात. लग्नानंतर पूर्णाची भेट होते ती कांद्याच्या सहा भावांशी. हे सहा भाऊ म्हणजे अर्क आहेत. कुठलेही संस्कार त्यांच्यावर नाहीत. एकमेकांशी लबाडी करणे आणि परस्परांवर कुरघोडी करणे हा त्यांचा उद्योग. या सहा भावांची नावे अशी- बटाट्या (केदार), तांब्या (नयन), कोब्या (आनंदा), हरभर्‍या (वृषसेन), दोडक्या( सचिन कुलकर्णी) आणि सर्वांत लहान चिंगळ्या (स्वप्निल)

कांद्याचे एकेक दिव्य भाऊ पाहून सटपटलेली पूर्णा अखेर त्यांना शिस्त लावायला पहाते. त्यासाठी कठोर उपाययोजना करते. एकेकाला चांगलेच सरळ करते. संस्कारहीन मुलांवर ती योग्य संस्कार करून त्यांना चांगल्या घरातली मुले अशी ओळख मिळवून देते. संतापी भावांना रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी काय करावे याचे धडेही देते.

पुढे काय होते, योगायोगाने या भावांची भेट पूर्णाच्या सहा बहिणींशी होते. आणि ते सगळे त्यांच्या प्रेमात पडतात. आता काय करायचं? कांद्या एक शक्कल लढवतो आणि त्या सहा बहिणींचे अपहरण करण्याची योजना आखतो. अण्णांना पत्ता न लागू देता तो हा प्लॅन आखतो.

हा प्लॅन काय असतो? कांद्याचे भाऊ पूर्णाच्या बहिणीचे प्रेम मिळविण्यात यशस्वी होतात का? पूर्णा याला संमती देते का? अण्णांना हे मान्य होते का? या सगळ्यांचा शेवट गो़ड होतो का?

या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'आम्ही सातपुते' बघायला पाहिजे.