1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
  4. marathi poem on human loneliness in virtual world

माणसाला शेपूट येईल का.......

marathi kavita
माणसाने माणसाशी 
संवाद तोडला आहे
म्हणून तो घरा घरात 
एकटा पडला आहे
 
येत्या काळात ही समस्या
अक्राळविक्राळ होईल 
तेंव्हा आपल्या हातातून
वेळ निघून जाईल
 
कदाचित माणूस विसरेल
संवाद साधण्याची कला
याच्यामुळे येऊ शकते
मूकं होण्याची बला
 
पूर्वी माणसं एकमेकांना
भरभरून बोलायचे
पत्र सुद्धा लांबलचक
दोन चार पानं लिहायचे
 
त्यामुळे माणसाचं मन
मोकळं  व्हायचं
हसणं काय, रडणं काय
खळखळून यायचं
 
म्हणून तेंव्हा हार्ट मध्ये
ब्लॉकेज फारसे नव्हते
राग असो लोभ असो 
मोकळं चोकळं होतं
 
पाहुणे रावळे गाठीभेटी
सतत चालू असायचं
त्याच्यामुळे प्रत्येक माणूस
टवटवीत दिसायचं
 
आता मात्र माणसाच्या
भेटीच झाल्या कमी
चुकून भेट झालीच तर
आधी बोलायचं कुणी ?
 
ओळख असते नातं असतं
पण बोलत नाहीत
काय झालंय कुणास ठाऊक
त्यांचं त्यांनाच माहीत
 
घुम्यावणी बसून राहतो
करून पुंगट तोंड
दिसतो असा जसा काही
निवडुंगाचं बोंड
 
Whatsapp वर प्रत्येकाचेच 
भरपूर ग्रुप असतात
बहुतांश सदस्य तर
नुसते येड्यावणी बघतात
 
त्यांनी मेसेज वाचल्याच्या
दिसतात निळ्या खुणा
पण रिप्लाय साठी सुटत नाही
शब्दांचा पान्हा 
 
नवीन नवीन Whatsapp वर
चांगलं बोलत होते
दोनचार शब्द तरी 
Type करत होते
 
आता मात्र बऱ्याच गोष्टी
इमोजीवरच भागवतात 
कधी कधी तर्कटी करून
इमोजीनेच रागवतात
 
म्हणून इतर प्राण्यां सारखी
माणसं मुकी होतील का ?
भावना दाबून धरल्या म्हणून
माणसाला शिंग येतील का ?
 
काय सांगावं नियती म्हणेल
लावा याला शेपटी
वाचा देऊन बोलत नाही
फारच दिसतो कपटी
 
हसण्यावर नेऊ नका 
खरंच शेपूट येईल
पाठीत बुक्का मारून मग
कुणीही पिळून जाईल
 
म्हणून म्हणतो बोलत चला
काय सोबत येणार
नसता तुमची वाचा जाऊन
फुकट शेपूट येणार
 
- सोशल मीडिया
पुढील लेख
आरोग्य टिप्स- निरोगी राहण्यासाठी या टिप्स अवलंबवा