शुक्रवार, 27 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 डिसेंबर 2016 (10:32 IST)

पुण्याला देशातील नंबर एकचे शहर करणार - अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने २०१२ मध्ये दिलेली ८५ टक्के आश्वासने पूर्ण केली आहेत. आता २०२० पर्यंत पुणे शहर देशातील पहिले डिजिटल साक्षर शहर करणार, नागरिकांच्या सहकार्याने पुणे शहर डेंग्यू चिकनगुनियामुक्त करणार, शहरात २४ तास पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी अत्याधुनिक स्काडा ही नियोजन प्रणाली अवलंबणार, अशी अनेक आश्वासने असलेल्या २०१७ च्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जाहीरनाम्याचे माजी उपमुख्यमंत्री  अजित पवार यांच्या हस्ते गुरुवारी प्रकाशन करण्यात आले.यावेळी महापौर प्रशांत जगताप, खासदार वंदना चव्हाण, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, सभागृह नेते शंकर केमसे, आमदार जयदेव गायकवाड आदी उपस्थित होते.
 
एक दशक प्रगतीचे, पुढील वर्ष समृद्धीचे असे घोषवाक्य असलेला हा जाहीरनामा आहे. यामध्ये येत्या ५ वर्षात सार्वजनिक वाहतुकीचा वापर २५ टक्क्यांवर नेण्यासाठी प्रयत्नशील बीआरटीएसचे प्रस्तावित मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू करू. २०२१-२२ पर्यंत मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील एकूण ३१ किमी दोन्ही मार्ग कार्यान्वित करणार. येत्या १० वर्षात दहा लाख नवीन नोकऱ्या निर्माण करण्याच्या दृष्टीने धोरण राबवणार. प्रभागातील कचरा प्रभागातच जिरवण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाचा वापर करणार शहरातील अमेनिटीज स्पेससाठी मास्टर प्लॅन तयार करणार. पुनवाडी ते ग्लोबल पुणे हा इतिहास उलगडणारे थीम पार्क शहरात उभारणार असून देशातील पहिली डिजिटल महानगरपालिका होण्याच्या दृष्टीने पाऊले उचलणार अशी जाहीरनाम्यातील महत्वाची आश्वासने आहेत. 
यावेळी अजित पवार म्हणाले की सरकारमधील बाबू लोक पुणेकर अधिक पाणी वापरतात, असे दाखवतात. पण आपण प्रत्यक्षात किती लोकसंख्येला पाणी देत आहोत याचा विचार करण्याची गरज आहे. मेट्रोच्या २५६ त्रुटीची यादी मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी. आघाडी सरकारच्या काळात आम्ही मेट्रोबाबत नेहमी सकारात्मक होतो आणि आज ही आहे. हे सरकार आगामी निवडणूक डोळयासमोर ठेवून निर्णय घेत आहे असा आरोप पवार यांनी केला. डीपीविषयी अद्यापपर्यंत निर्णय घेतला जात नाही. यामुळे शहराचा विकास रखडला आहे, असा आरोपही त्यांनी भाजप सरकारवर केला.पुणे महापालिकेवर कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचाराचा आरोप नाही हे पुणेकरांनी लक्षात ठेवावे. आमच्या पक्षातील नेत्यांवर जनतेचा विश्वास आहे तो जाणार नाही, असा विश्वास व्यक्त करत पुणेकरांनी राष्ट्रवादीला बहुमत द्यावे, असे आवाहनही अजित पवार यांनी केल्या.