१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य, परवाने रद्द होणार
मोटार परिवहन विभागामार्फत राज्यातील ५९ प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयांद्वारे विशेष परवाना तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून येत्या १ मे महाराष्ट्र दिनापासून राज्यातील परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा बोलता व लिहिता येणं अनिवार्य करण्यात येणार आहे.
नियमांचे पालन न करणाऱ्या ऑटो व टॅक्सी चालकांचे परवाने रद्द करण्यात येणार आहे. असा इशारा राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.
मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, रिक्षा व टॅक्सी चालकांना परवाना देताना स्थानिक भाषेचे ज्ञान असणे हा नियम आधीपासून अस्तित्वात असून मुंबई महानगर क्षेत्र, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर सारख्या शहरांमध्ये अनेक चालकांना मराठीत बोलता येत नाही. तर काही रिक्षा चालक मराठी बोलण्यास टाळाटाळ करतात.
अशा तक्रारी आल्यावर हा निर्णय घेण्यात आला आहे. आपण ज्या प्रदेशात आपण राहतो त्या प्रदेशाचीभाषा शिकणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. स्वतःच्या मातृभाषेप्रमाणेच इतर राज्यातील भाषेचाही आदर राखणे आवश्यक आहे. त्यामुळे १ मेपासून सर्व चालकांना मराठी भाषा लिहिता व वाचता येणे बंधनकारक राहील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
तसेच, नियमांकडे दुर्लक्ष करून चुकीच्या पद्धतीने परवाने देणाऱ्या परिवहन अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. मोटार परिवहन विभागाच्या नियमांनुसार रिक्षाचालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य आहे. त्यामुळे फेरतपासणीदरम्यान चालकांच्या भाषाज्ञानाचीही तपासणी केली जाणार आहे. मराठी बोलता किंवा समजता न येणाऱ्या चालकांचे परवाने रद्द केले जाणार आहेत.
Edited By - Priya Dixit