गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

आझम खान यांच्या वादग्रस्त विधानानंतरही अखिलेश मौनात का?

समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांनी रामपूरमधील एका प्रचार सभेत जयाप्रदा यांच्यावर केलेल्या टिप्पणीमुळे मोठा वादंग माजलाय.
 
आझम खान म्हणाले, "रामपूरवाल्यांना जे समजायला 17 वर्ष लागली ते मी फक्त 17 दिवसात ओळखलं की, त्यांच्या अंडरवियरचा रंग खाकी आहे." आझम खान यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रीय महिला आयोग, केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्यासह देशातील सगळ्याच वरिष्ठ नेत्यांनी तीव्र निषेध केलाय.
 
राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांनी आझम खान यांना नोटीस पाठवून या प्रकरणी स्पष्टीकरण देण्यास बजावलंय. याशिवाय आझम खान यांच्याविरोधात FIR सुद्धा दाखल करण्यात आला आहे.
 
जयाप्रदा यांनी आझम यांच्या टिपण्णीला उत्तर देताना म्हटलंय की आझम खान यांची उमेदवारी रद्द झाली पाहिजे. कारण जर आझम खान निवडणूक जिंकले तर तर समाजात महिलांची स्थिती आणखी वाईट होईल. याशिवाय सोशल मीडियावर अनेक राजकीय नेत्यांसह सामान्य लोकही आझम खान यांच्या वक्तव्यानंतरही अखिलेश यादव गप्प असल्यानं संताप व्यक्त करतायत. तसंच इतकं गंभीर विधान करूनही अखिलेश शांत का आहेत? असा सवाल करतायत. मात्र त्याचवेळी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या प्रकरणावर कुठल्याही पद्धतीनं प्रतिक्रिया देणं टाळून चक्क आझम खान यांच्याशी हस्तांदोलन करणारे फोटो ट्विटरवर प्रसिद्ध केले आहेत.
 
जयाप्रदा काय म्हणाल्या?
जयाप्रदा यांनी या प्रकरणावर बोलताना म्हटलं की, "ही त्यांच्यासाठी काही नवी गोष्ट नाहीए. 2009 मध्ये मी पार्टीची उमेदवार होते. आणि त्यावेळीही माझ्यावर खालच्या भाषेत टिपण्णी झाल्यानंतरही अखिलेश यांनी मला पाठिंबा दिलेला नव्हता. आझम खान साहेबांना सवय आहे, ते सवयीचे गुलाम आहेत. जर त्यांनी अशी टिपण्णी केली नसती तर ती नवी गोष्ट होती."
 
"मात्र आता त्यांची पातळी किती घसरलीय बघा. ते लोकशाही आणि संविधानाची लक्तरं काढतायत. मी एक महिला आहे, आणि माझ्यावर जी टिपण्णी करण्यात आलीय ते मी माझ्या तोंडाने सांगूही शकत नाही. यावेळी त्यांनी सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यांनी माझा अंत पाहिलाय. आता ते माझ्यासाठी भाऊ राहिलेले नाहीत. ते माझे कुणीही नाहीत. मी असं काय केलं की, ते माझ्यावर अशी टिपण्णी करत आहेत. मात्र या प्रकरणी एफआयआर दाखल झालेली आहे. याचा अर्थ असा आहे की हे सगळं लोकांपर्यंत पोहोचलं आहे. निवडणुकीतून त्यांची उमेदवारी रद्द व्हावी अशी माझी मागणी आहे. कारण ही व्यक्ती जर निवडून आली तर महिलांना समाजात स्थानही मिळणार नाही."
 
अखिलेश शांत का आहेत?
आझम खान यांच्या टिपण्णीनंतर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्वीट करून म्हटलंय की, "मुलायमजी, तुम्ही समाजवादी पार्टीचे पितामह आहात. तुमच्यासमोर रामपूरमध्ये द्रौपदीचं चीरहरण होत आहे. तुम्ही भीष्मासारखं मौन बाळगण्याची चूक करू नका."
 
सोशल मीडियापासून ते टीव्ही स्क्रीनपर्यंत गाजत असलेल्या वादावेळीच अखिलेश यादव यांनी आपल्या रामपूरच्या रॅलीचे फोटो ट्विटरवर प्रसिद्ध केलेत. सोशल मीडिया युझर्सनीही अखिलेश यांनी आझम खान यांच्यासोबतचे फोटो जारी केल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
 
लेखिका अद्वैता काला लिहितात की, "अखिलेश यादव यांनी आझम खान यांच्या टिपण्णीवरील आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी गर्वाने आपली आझम यांच्यासोबतची उपस्थिती आधोरेखित केली आहे. त्यांचं विधान हे पुन्हा बोलण्यासारखंही नाही. आता राष्ट्रीय महिला आयोग आणि निवडणूक आयोगाकडूनच अपेक्षा आहे. पार्टीच्या नेतृत्वाकडून कुठलीही अपेक्षा नाहीए."
 
कौस्तुभ मिश्रा नावाचे ट्विटर युझर्स लिहितात की, "आपल्याला लाज वाटायला हवी की माफी न मागता तुम्ही निर्लज्जपणे ट्विट करत आहात. सपा-बसपासारख्या छोट्या पक्षांची हा लालची विचार आहे."
 
सोशल मीडियावर काही काँग्रेस समर्थकांनीही अखिलेश यांच्यावर हल्लाबोल केलाय. ट्विटर युजर विवेक सिंह म्हणतात, "भैय्याजी, आझम खान यांना थोडं समजवा. डोकं ठिकाणावर ठेऊन बोलत चला म्हणावं. मला वाटत नाही की रामपूर किंवा देशाला आझम खान यांची गरज आहे. आपण सगळ्यांनी महिलेच्या पोटातूनच जन्म घेतलाय. हे आपल्याला विसरून चालणार नाही. जयाप्रदा तुमच्या विरोधक असू शकतात पण त्या एक महिला आहेत."
 
त्याचवेळी ट्विटर युजर माया मिश्रा लिहितात, "आपण आई-बहिणींशी बोलतानाही याच भाषेचा उपयोग करता का?, आझम खान यांना इतका सन्मान का देतायत. दरम्यान आझम खान यांनी या प्रकरणावर उत्तर देण्यास नकार दिला आहे.