गझनीचा मोहम्मद इतिहासात वाचला होता. पण नुकत्याच आलेल्या आमीर खानच्या 'गझनी'चा 'त्या' गझनीशी काहीही संबंध नव्हता. तसाच आता 'बाबर' नावाचा चित्रपट आलाय. पण त्याचा इतिहासातल्या बाबराशी काहीही संबंध नाहीये. इतकंच काय, पण चांगली कथा, पटकथा, दिग्दर्शन, अभिनय याच्याशीही काही संबंध नाहीये.
ओम पुरी, मिथून चक्रवर्ती, सोहम, उर्वशी शर्मा आणि सुशांत सिंग अशी बर्यापैकी स्टारकास्ट असूनही मूळ कथेत आणि त्यानंतर दिग्दर्शनात दम नसल्याने 'बाबर' हा चित्रपट निराशा करतो. रक्तरंजीत मारधाडपटाशिवाय यात काहीही नाही. सत्यावरून प्रेरणा घेऊन हा चित्रपट बनविल्याचे बोलले जाते. पण त्याच्या एका फ्रेमशीही याची तुलना होऊ शकणार नाही. बाबर (सोहम) नावाच्या एका गु्हेगाराची ही कथा आहे. सत्यातल्या भिकू म्हात्रेवरून हे पात्र जन्माला घातलंय. हा न नायक म्हणजे एंटी हिरो आहे. अंडरवर्ल्डमध्ये त्याचा उदय आणि अस्त यांचा त्याचा प्रवास यात मांडला आहे.
बाबरच्या विरोधात उभा ठाकला आहे तो पोलिस अधीक्षक द्विवेदी (मिथून चक्रवर्ती). पण बाबरला पोलिसांमधल्या भ्रष्ट इन्स्पेक्टरची (ओम पुरी) आणि अधिकार्यांची साथ मिळालेली असते. त्यामुळे द्विवेदीचे काम आणखी कठिण होते. मधल्या काळात बाबरला वेळ मिळाला की बायकोच्या कुशीत जागा शोधू पहातो.
मुळात बाबर हे कॅरेक्टरच नीट विकसित न झाल्याने ते फुलविताच आलेले नाही. आणि त्या भूमिकेतल्या सोहमनेही स्वतःचे काही त्या भूमिकेत टाकण्याचे कष्ट घेतलेले नाहीत. मिथून, ओम पुरी आणि सुशांत सिंग यांचा अभिनय तेवढा बघण्यासारखा आहे. बाकी आख्खा चित्रपट म्हणजे एका नकारात्मक व्यक्तिरेखाला उदात्त करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न वाटतो.