वसंतपंचमी साजरा करण्याची पद्धत!
वसंतपंचमीपासून फाल्गुन पौर्णिमेपर्यंत वसंतोत्सव साजरा करतात. प्राचीन काही वसंत ॠतूच्या आगमनाप्रीत्यर्थ सुवसंतक, वसंतोत्सव, मदनोत्सव, अशोकोत्सव वगैरे उत्सव करण्याची प्रथा होती. या निमित्ताने नृत्य, संगीत, वनविहार, जलक्रीडा इ. मनोरंजनात्मक कार्यक्रम केले जात. काही ठिकाणी रंगीबेरंगी वस्त्रे परिधान करून, रंग व गुलाल उडवून हा वसंतोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. वसंत ॠतूमध्ये वृक्षलतांना नवी पालवी फुटते. त्या पानाफुलांनी बहरतात. त्याप्रमाणेच लोकांच्या मनोवृत्तीही उत्साही व आनंदी होऊ लागतात. हा उत्सव ह्या संक्रमणस्थितीचा द्योतक आहे. निसर्गसृष्टीप्रमाणेच मानवी जीवनात आनंद व उत्साह वृद्धिंगत व्हावा, या उद्देशानेच हा उत्सव साजरा करण्याची प्रथा असावी. दक्षिण भारतापेक्षा उत्तर भारतामध्ये या सणाला विशेष महत्त्व आहे. राजस्थानमधील राजपुतांमध्ये हा उत्सव विविध प्रकारे उत्साहाने साजरा केला जातो. समाजातील सर्व थरांतील लोक यामध्ये सहभागी होतात. रथसप्तमीच्या ( राजस्थानातील ‘भानुसप्तमी’ ) दिवशी सूर्याची पूजा करून त्याच्या रथाची मिरवणूक काढण्यात येते. हा वसंतोत्सवाचाच एक भाग आहे. फाल्गुन महिन्यातील वसंतोत्सव ‘ फाग ’ ह्या नावाने ओळखला जातो. फाल्गुन पोर्णिमेला वसंतोत्सव समाप्त होतो.