वासनेचा काळाशार ‘डोह’
- दीपक जाधव
सुप्रसिध्द मराठी लेखक ह. मो. मराठे यांच्या `काळेशार पाणी' या १९७० साली गाजलेल्या तसेच वादग्रस्त ठरलेल्या कादंबरीवर आधारीत `डोह' हा चित्रपट लवकरच मुंबईत प्रदर्शित होतो आहे. विचारवंत, बुद्धिवादी वाचकांमध्ये प्रचंड वादळ निर्माण केलेल्या तसेच श्लील -अश्लील वादाच्या भोवयात सापडलेल्या या कादंबरीवर निर्माते साईराम अय्यर यांनी दे. सी. फिल्मस् या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मॅजिक आय फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कराज परांजपे यांनी केले असून पटकथा व संवादही त्यांनीच लिहिले आहेत. व्यवसायाने आर्किटेक्ट असणारे पुष्कराज परांजपे हे अमेरिकेत रहातात. त्यांनी याआधी ‘पहेली' या अमोल पालेकरांच्या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे.
वैषयिक भूक आणि तिच्या भयावह परिणतीची कथा म्हणजे ‘डोह'. पष्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आणि वर्तमानकालीन वास्तवात ‘डोह' ची कथा उलगडते. या चित्रपटाची कथा आहे भिकी आणि तिची वयात आलेली तरूण मुलगी कमळीची. भाजी विकून आपलं आणि आपल्या मुलांचं पोट भरणार्या भिकीचे गावातील विष्णूबरोबर अनैतिक संबंध आहेत. घरात अठरा विश्व दारिद्रय त्यामुळे यातून सुटका मिळवण्यासाठी कमळी आईचा विरोध सहन करून शाळेत जाते. पण तिथेही तिची उपेक्षाच होते. कमळीला तिच्या वर्गातील मुलं मुली आपल्यात खेळायला घेत नाहीत आणि तिचे शिक्षकही तिला टाकून बोलतात. वर्गातल्या एका गुंड मुलाची आणि गावातल्या वाण्याची तिच्यावर नजर आहे. पण तिला मात्र मुंबईहून आलेल्या हुषार आणि देखण्या अजयबद्दल ओढ वाटू लागते. वासनेच्या आहारी गेलेल्या भिकीला अजयचं राजबिंडं रूप पाहून अजयला शारीरिक जवळिकीच्या जाळयात पकडण्यासाठी भिकी कमळीवर दबाव आणते. राजबिंडया अजयबद्दलची निरागस ओढ आणि भिकीचा सततचा दबाव यामुळे गोंधळून कमळी अजयला मोहात पाडण्याचा प्रयत्न करते. व एक दिवस अजय व कमळीला एकांतात त्या स्थितीत पाहून भिकी अजयकडून जबरदस्तीने कामसुख मिळवते. पुढे अजय व कमळीचं काय होतं? कमळीला वेढणारा शारिरिक पशुवृत्तीचा काळाशार डोह तिचा बळी घेतो, की त्यातून सावरून ती ताकदवान बनते? या प्रश्नांच्या उत्तरासाठी डोह पहायला हवा.
भूक, दारिद्रय आणि कामवासना यावर बेतलेला हा ‘डोह' गरीबीचे भोग भोगणाया ग्रामीण जीवनाचे दाहक दर्शन परिणामकतेने घडवतो. एकही गाणं नसलेल्या या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण भोरजवळ करण्यात आले आहे. या चित्रपटाचं संगीत आनंद मोडक यांचं असून छायाचित्रण अमलेंदु चौधरी, ध्वनी अनिता कुशवाहा, कला एकनाथ कदम तर संकलन अभिजीत देशपांडे यांचे आहे. यात हर्षदा ताम्हणकर व अभय महाजन ही जोडी या चित्रपटाद्वारे पदार्पण करीत असून सोबत सुहास पळशीकर, लीना भागवत, ऋता पंडीत, मेघना वैद्य, अमेय वाघ, सुनील मोझर, सुनील गोडबोले, राजेश मोरे, अनिल कांबळे, श्रीराम पेंडसे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या २८ मार्चपासून मुंबईत प्लाझा (दादर), आयमॅक्स (वडाळा), हुमा (कांजुरमार्ग), मुव्हीस्टार (गोरेगांव), आरमॉल (मुलुंड) आणि वंडरमॉल (ठाणे) या ठिकाणी प्रदर्शित होत आहे.फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा.....