लोकसभेच्या निवडणूकीत ज्या माणसाने गद्दारी केली. त्यालाच पक्षाने राजापूरातून उमेदवारी दिली. आम्ही शिवसेनेचे निष्ठावंत असल्याने ज्या पक्षाने मला भरभरून दिले तिथे गद्दारी करणार नाही; मात्र राजापूरातील उमेदवार चुकीचा असल्याने सक्रीय राजकारणापासून दूर राहू, असे माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शिवसेनेत खळबळ उडाली असून राजापूरची जागा मिळविण्यासाठी राजन साळवी यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
राजापूरमधून उपजिल्हाप्रमुख शांताराम मठकर यांनी बंडखोरीचे निषाण फडकविण्याची तयारी केली असतानाच राज्यमंत्री आणि राजापूरमधून इच्छूक असलेल्या रविंद्र माने यांनी दुसरा धक्का दिला आहे. शांताराम मठकर यांनी तर यापुर्वीच साळवी यांच्या विरोधात शिवधनुष्य उचलले आहे. त्यातच उमेदवारी जाहिर झाल्यानंतर तर उघडउघड बंडखोरीची भाषा करण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून पक्षातर्गत दुही सर्वासमोर आली आहे.
शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर राजापूरातून इच्छूक रवींद्र माने यांनी उमेदवारी न मिळाल्याने नाराजी व्यक्त करीत ङङ्गजय महाराष्ट्र' करण्याचा निर्णय घेतला. ते मनसेत प्रवेश करून राजापूरमधून निवडणूक लढणार असल्याच्या अफवा गेले काही दिवस सुरु होत्या. आज ते देवरुखला निवासस्थानी दाखल झाल्यानंतर पत्रकारांनी भेट घेतली. ते म्हणाले, राजापूर, लांजा, साखरपा भागातील हजारो कार्यकर्त्यांनीही उमेदवारीसाठी मला पाठिंबा दिला होता, पण काल जाहीर झालेल्या पक्षाच्या यादीत नाव नाही. राजापूरमधून दिलेला उमेदवार चुकीचा असला तरीही शिवसेनेशी गद्दारी करून कोणत्याच पक्षात प्रवेश करणार नाही. मला उमेदवारी नाही दिली तरी चालेल, पण उमेदवार स्थानिकच असावा, अशी माझी भूमिका होती. मग तो कुणबी सेनेचा उमेदवार असता तरी चालले असते. ज्या पक्षाने मला तालुकाप्रमुख, आमदार ते राज्यमंत्री अशी सर्व पदे दिली त्या पक्षाशी गद्दारी करणे हे माझ्या रक्तात नाही.''