शनिवार, 17 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 जानेवारी 2017 (12:14 IST)

प्रेम जात पाहून होत नाही- हर्षदा खानविलकर

premala jat nasate
प्रेम जात पाहून होत नाही- हर्षदा खानविलकर
‘प्रेमाला जात नसते’ स्टार प्रवाहचे ‘पुढचं पाऊल’
 
स्टार प्रवाह वाहिनीवर गाजत असलेल्या 'पुढचं पाऊल' या मालिकेने प्रसिद्धीचा उच्चांक गाठला आहे. आजही ही मालिका महाराष्ट्राच्या घराघरात आवडीने पाहिली जात असल्याची प्रचीती अक्कासाहेब म्हणजेच हर्षदा खानविलकर यांना कोल्हापूरमध्ये आली.  या मालिकेतील 'प्रेमाला जात नसते' हा नवा विचार मांडणाऱ्या सत्यजित (अमित खेडेकर) आणि तेजस्विनी (आरती मोरे) यांच्यावर आधारित सुरु असलेल्या कथेने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात अक्कासाहेब यांनी 'प्रेमाला जात नसते आणि प्रेमाने जातीपातीची बंधने पुसून टाकता येतात', असे मत मांडले.
 
पारंपारिक कोल्हापूरच्या पार्श्वभूमीवर गेले सहा वर्षे यशस्वीरीत्या सुरु असलेल्या या मालिकेने नवे वळण घेतले आहे. आंतरजातीय प्रेम तसेच विवाहाला विरोध करणाऱ्या आपल्या समाजबहूल परिस्थितीला आव्हान देण्याचे काम अक्कासाहेब यात करताना दिसणार आहेत. याच मुद्द्यावर सत्यजित (अमित खेडेकर) आणि तेजस्विनी (आरती मोरे) या कलाकारांसोबत कोल्हापूरदौऱ्यात नुकत्याच येऊन गेलेल्या हर्षदा खानविलकर यांनी 'प्रेम'या शब्दांची त्यांची असलेली व्याख्या स्पष्ट केली.
 
'पालकांनी आपल्या मुलांच्या प्रेमाला विरोध करण्याआधी काहीवेळ विचार करायला हवा. वेळीच प्रसंगावधान दाखवून निर्णय घेतल्यास भविष्यात चुकीचा निर्णय घेतल्याचे शल्य राहणार नाही. असा सल्ला त्या सर्व पालकांना देतात. त्याचबरोबर ' संसार करणे खूप कठीण गोष्ट असते, प्रेमात पडणाऱ्या प्रत्येकाला ते जमतेच असे नाही. त्यामुळे थोरामोठ्याचे म्हणणे ऐका' अशी तरुणांची कानउघाडणी देखील त्या करतात. 'प्रेम' जात पाहून होत नाही, त्यामुळे प्रेमाला जातीसाठी दुय्यम लेखू नका. आपला हा संदेश प्रसारमाध्यमांनी जास्तीतजास्त लोकांपर्यत पोहोचवावा अशी विनंती त्यांनी पत्रकारांना केली. आपली संस्कृती आणि परंपरा जपतानाच आधुनिक विचारसरणीची कास धरण्याचा संदेश अक्कासाहेब या मालिकेद्वारे  देताना दिसत आहेत.विशेष म्हणजे त्यांचा हा दृष्टीकोन दिवसेंदिवस लोकप्रिय होत असल्याचे दिसून येत आहे.
 
एकूणच 'प्रेमाला जात नसते' हा विचार स्टार प्रवाहवर सोमवार ते शनिवार संध्याकाळी ६.३० वाजता प्रसारित होणाऱ्या 'पुढचं पाऊल’ या मालिकेच्या माध्यमातून समाजात रुजवला जात आहे.