Last Modified: मोहाली , बुधवार, 30 मार्च 2011 (10:38 IST)
आज भारत-पाक आमनेसामने!
ND
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत व पाकिस्तानदरम्यानचा दुसरा उपांत्य सामना, बुधवारी येथे पंजाब क्रिकेट असोसिएशन (पीसीए)च्या मैदानावर खेळला जाणार असून, भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेतील पाकविरुद्धच्या विजयांची परंपरा कायम राखतो, की पाकिस्तान प्रथमच भारताला पराभूत करून दुसर्या विश्वविजेतेपदाच्या दिशेने झेप घेतो, याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.
आजच्या सामन्याला दोन्ही देशांच्या पंतप्रधानांसह अनेक महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार असून, दहशतवादी सामन्यादरम्यान घातपात घडविण्याच्या तयारीत असल्याचा इशारा मिळाल्याच्या पृष्ठभूमीवर, सामन्यासाठी अतिशय चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर असलेला मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा विक्रम करून संघाला अंतिम फेरीत पोहोचवतो काय, याकडेही क्रिकेटप्रेमींचे लक्ष राहणार आहे.