'हो राजे..' हाऊसफुल्ल
'
मुंबई आणि मराठी माणूस' या विषयावर आधारीत 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' हा चित्रपट आज शनिवारी प्रदर्शित झाला आणि चित्रपटगृहांवर हाऊसफुल्लच्या पाट्या लागल्या. 'लगे रहो मुन्नाभाई' स्टाईलच्या या चित्रपटात छ. शिवाजी महाराजांच्या काळातील मराठा आणि आजच्या काळातील मराठी माणसाची अवस्था दाखविताना मराठी मने चेतविण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबईत भैय्ये विरूध्द मराठी यांच्यातील वाद विकोपाला गेला असतानाच हा चित्रपट प्रदर्शित झाल्याने याला धडाकेबाज प्रतिसाद मिळाला आहे. विशेष करून महेश मांजरेकर यांनी साकारलेली शिवाजीमहाराजांची भूमिका प्रेक्षकांना भावली आहे. '
हो राजे..' या शिर्षक गीतावर गेल्या महिनाभरापासून या चित्रपटाची जाहिरात करण्यात आली आहे. मराठीमुद्दा असल्याने प्रेक्षकांनाही या चित्रपटाची आतुरता होती. मुंबईतून नाहिशा होत चाललेल्या मराठी माणसाला केंद्रिभूत ठेवून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. दिनकर मारूती भोसले ही यातील मध्यवर्ती भूमिका. मुंबईतल्या कॉस्मोपॉलिटिन जगात हा दिनकर भोसले अगदी पिचून जातोय. मुंबई महाराष्ट्रात असली तरी मुंबईत महाराष्ट्र नाही, अशी त्याची खंत आहे. परप्रांतीयांच्या लोंढ्यात मराठी माणसाच जगणं हरवल आहे, अशी त्याची भावना आहे. या सगळ्याचं खापर तो आपल्या पाचशे पिढ्यांवर फोडतोय. या पाचशे पिढ्यांनी केलेल्या पापामुळेच आपण मराठी म्हणून जन्माला आलोय, अशा शब्दांत तो या पूर्वजांचा उद्धार करतो. प्रतापगडावर असलेले छत्रपती शिवाजी महाराज त्याचा हा त्रागा ऐकतात आणि वेगळ्या रूपात त्याच्या समोर येऊन ठाकतात. स्वतःच्या मराठीपणालाच त्याने घातलेल्या शिव्या महाराजांना सहन होत नाही. ते त्यालाच खडे बोल सुनावून त्याच्या आणि पर्यायाने मराठी माणसाच्या दोषांवर बोट ठेवतात. इतरांना दोष देण्याआधी स्वतः केलेल्या चुका सुधारण्याचा सल्ला ते दिनकररावांना देतात. आणि दिनकररावांचे डोळे उघडतात. ते संघर्ष करण्यासाठी सज्ज होतात. असे या चित्रपटाचे थोडक्यात कथानक. छ. शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शोभणा-या महेश मांजरेकरांनी ताकदीच्या संवादांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. दिनकर भोसलेंच्या रूपात मराठी माणसाची आगतिकता मांडताना सचिन खेडेकरांचा अभिनय वाखाणण्याजोगा आहे. सुमित्रा भोसलेंच्या भूमिकेत सुचित्रा बांदेकर, याशिवाय मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, प्रिया बापट, अभिजित केळकर यांनीही उत्तम अभिनय केला आहे. दिग्दर्शन संतोष मांजरेकर यांना फुल्ल मार्क द्यावे लागतील. ऐतिहासिक घटनांना वर्तमानाची जोड देऊन सामाजीक संदेश पोहोचविण्यात त्यांना यश आले आहे. प्रत्येक कलाकारांकडून त्यांनी अपेक्षित अभिनय करून घेतला आहे. मुळातच महेश मांजरेकर आणि अभिजित देशपांडे यांनी निवडलेला विषय आणि पटकथाच ताकदीची आहे. अजित, समीर व अतुल यांचे संगीत उत्तम आहे. -------------------------------------------