- लाईफस्टाईल
» - आरोग्य
» - घरचा वैद्य
थेंबे थेंबे तळे साचे...
सध्या एप्रिलच्या सुरवातीलाच 'मे हिट'चा तडाखा बसत आहे. तापत्या उन्हामुळे भूजल पातळी कमालीची खालावली आहे. नद्या, तलाव आटले असून विहिरींनी तळ गाठला आहे. पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. खेड्यापाड्यात पाण्यासाठी दाही दिशा हिंडावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात तितकी झळ जाणवत नसली तरी पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे. केवळ बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. आपण पाण्याशिवाय जगू शकत नाही. वसुंधरेने आपल्याला जगण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले आहे. त्याचा काळजीपूर्वक उपयोग करू शकतो. मात्र, त्याचा दुरूपयोग करण्याचा आपल्याला अधिकार नाही. पूर्वी आपल्या घरात नळ किंवा बोरींग करण्याची व्यवस्था नव्हती. फार लांबून डोक्यावर किंवा कावडीने पाणी भरावे लागत होते. आता आपल्याला घरबसल्या पाणी मिळत आहे. त्यामुळे पाण्याचे महत्त्व जपले पाहिजे. भविष्यातली पाण्याची समस्या आजच ओळखून त्यावर विचार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आत्तापासूनच वाया जाणारे थेंब थेंब पाणीही वाचवले पाहिजे. * आपल्या घरातच काय तर सार्वजनिक स्थळीही पाण्याचा अपव्यय थांबवा. * सुरू असलेल्या नळाच्या पाण्याखाली भांडे धुवू नये. दोन टबमध्ये पाणी घेऊन त्यात ते धुवावे.* अंघोळीसाठी शॉवरचा वापर करू नका. शॉवरमुळे पाण्याचा अधिक अपव्यय होत असतो. अंघोळीसाठी आवश्यक तेवढे पाणी बादलीत घ्यावे.* ज्या पाण्याने पालेभाज्या धुतल्या ते पाणी न फेकता त्यामध्येच भाज्या शिजवल्या पाहिजे.* पुरूषांनी दाढी करताना नळ सुरू ठेवू नये. * हात पाय धुतानाही पाणी वाया जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.* पिण्यासाठी मोजकेच पाणी घ्या. * नळीने वाहन न धुता बादलीत पाणी घेऊन कपड्याने वाहन पुसावे.* घरातील टपकणारे नळ आधी दुरूस्त करा. * घरात वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम बसवा. त्यामुळे पावसाचे पाणी वाया न जाता ते जमिनीत मुरेल व भूजल पातळीत बाढ होण्यास मदत होईल.