मोदी देवालाही मूर्ख बनवू शकतात: लालू
पाटणा- ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणालाही मूर्ख बनवू शकतात. ती त्यांची खासियतच आहे. ते एक असे मदारी आहेत जे देवालाही मूर्ख बनवू शकतात,’ अशा शेलक्या शब्दांत राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी घेतलेल्या प्रचारसभेत लालू बोलत होते. पंतप्रधान मोदी यांनी प्रचारसभा सुरू केल्यापासून बिहारमधील प्रचारात रंगत आली आहे. बिहारला विशेष दर्जा देण्याच्या नितीशकुमार यांच्या मागणीची हवा काढून घेण्यासाठी मोदी यांनी बिहारला सव्वा लाख कोटींचे पॅकेज देण्याची घोषणा केली आहे. मोदींच्या या घोषणेची लालू यांनी खिल्ली उडवली आहे. ‘मोदींनी 15 महिन्यांपासून बिहारला झुलवत ठेवले आणि आता निवडणुका येताच मतांसाठी पॅकेज घोषित केले. पण, मोदींनी गेल्या 15 महिन्यांत एकतरी आश्वासन पूर्ण केले का याचे उत्तर आधी द्यावे,’ असे लालू म्हणाले. मोदींच्या आश्वासनाला फसू नका. लोकांना मूर्ख बनवण्यात ते माहीर आहेत. पुढचे तीन महिने मोदी या पॅकेजबद्दल बोलत राहतील आणि एकदा का अर्थसंकल्प सादर झाला की हे पॅकेज हवेत उडून जाईल, असेही लालू म्हणाले.
मोदींच्या जंगलराजच्या टिप्पणीवरही लालूंनी त्यांना प्रत्युत्तर दिले.