रमजानमध्ये कष्टाच्या कमाईचे दान पावते
रमजान महिना प्रत्येक बाबींसाठी पवित्र व शुभ महिना मानला जातो. या महिन्यात केलेले कोणतेही काम फलदायी ठरते. केलेली सेवा मोठे फळ देऊन जाते. विधायक व रचनात्मक मोबदलाही विधायक व चांगला मिळतो. रमजानच्या महिन्यात जर माणसाद्वारे चुकून एखादे काम वाईट घडले व ती चूक मानवाच्या लक्षात आली आणि त्याने तत्काळ अल्ल्हातालाला झालेल्या चुकीची क्षमायाचना केली तर तो शिक्षेस पात्र असतानाही अल्ला त्याला आपल्या दयाळूपणाने माफी देतात. माफ करतात, मंगाफिरत याचा अर्थच माफी असा आहे.
प्रत्येक धर्मात पूजा, अर्चा, प्रार्थना इबादत उपवास या बाबींना महत्त्व दिलेले आहे. ही सर्व कार्ये मनाला सुख, शांती, समाधान प्राप्त करण्यासाठी केली जातात. पण हे सर्व करताना त्यामागे शुद्ध हेतू असला पाहिजे. सत्य, हलाल व खर्याची कसोटी लावली जाते.
काळे धंदे करणारे फार धार्मिक वृत्तीचे व फार मोठे मदतगार असतात. असे सर्वत्र पाहावयास मिळते. मंदिरे, दर्गा, मस्जिद, अन्नदान अशा कार्यक्रमांसाठी ते खूप पैसा खर्च करताना दिसतात. तो मनाचा मोठेपणाही दाखवितात. एवढे खर्च करूनही त्यांना कोणत्याही प्रकारचे सुख व शांती मिळत नाही. कारण ज्या पैशाच्या आधारे त्यांनी हे सर्व सोपस्कार केले त्याचा उगमच मुळाच हरामातून झालेला असतो. कष्टाचे जे असते ते हलाल असते पण ते थोडे असल्यास बाकीचा मोठा खर्च त्या कष्टाच्या कमाईतून होऊ शकत नाही. आपल्याकडे एक म्हण आपण नेहमी ऐकत असतो. 'शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी', कमाई हलालाची असेल म्हणजे कष्टी असेल तर त्यात बरकत असेल अन्यथा नाही.
मुस्लीम समाजात असा एक वर्ग आढळून येतो ज्याची तक्रार आहे की, आपली दुवा कबूल होत नाही. आजकाल दुवामध्ये असर राहिलेला नाही हे आपण बर्याच जणांकडून ऐकतो. ही गोष्ट काही प्रमाणात खरीही असू शकते. दुवा ही कधी न कधी स्वीकारली जाते. पण एका नमाजीची दुवा लवकर कबूल होते पण त्यासाठी आधी नमाज कबूल होणे गरजेचे आहे. तर यासाठी बर्याच शर्ती व अटी आहेत. पण थोडक्यात एका नमाजीच्या हैसियतमध्ये आपण काय खातो? कसे कमवितो? कोणते कपडे परिधान करतो? हे सर्वात महत्त्वाचे प्रश्न आहेत. आज जगात जरी बेईमानीचा मार्ग स्वीकारणारे संख्येने खूप असले तरी त्यात त्यांना समाधान नाही. हरामाच्या पैशातून केलेले दान धर्म पावत नाही किंवा हरामाच्या पैशातील दान धर्माने अल्लाह आपल्या केलेल्या गुन्ह्यांना माफ करत नाही. उलट या कर्मामुळे मानसिक स्थिती ढासळते. मन:शांती मिळत नाही. मन या हरामाच्या कमाईने सदैव चिंतेत राहते. मन स्वत:ला खात राहते. मात्र या उलट कष्टाची कमाई ती थोडी असेल पण त्यात मोठ्या प्रमाणात शांती, समाधान व सुख आहे. कष्टाच्या कमाईतून केलेले दानधर्म पावतात. कष्टाच्या कमाईतील दानधर्माने बरकत राहते. घरात शांतता राहते. लक्ष्मी घरात नांदते. दान करणारा व दान घेणारा दोघेही संतुष्ट राहतात.
रमजान महिन्यात कष्टाच्या कमाईतील केलेले दान देवाला पावते. झटपट श्रीमंत होण्यासाठी आज आपण सर्वच मार्गाचा अवलंब करीत आहोत. पण लक्षात ठेवा हे सर्व चुकीचे मार्ग आपली अखेर बरदादी करणार आहेत. या मार्गाचा स्वीकार कदापिही करू नका. कष्टाच्या कमाईतून दानधर्म करा ते अल्लाहाला पावते.
धोडिरामसिंह राजपूत
पुढील लेख
