1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

अल्हाददायक वातावरणाचे शहर अशी ओळख असलेल्या नाशिकची हवा धनत्रयोदशीपासून बिघडण्यास सुरुवात

लक्ष्मीपूजनाच्या रात्री मोठ्या प्रमाणात फटाके फोडल्यामुळे  नाशिकच्या हवेच्या गुणवत्तेवर मोठा दुष्परिणाम झालेला दिसला. वायू प्रदूषण धोकादायक पातळीपर्यंत जाऊन पोहोचले. प्रदूषण पातळी २५६पर्यंत गेल्याची नोंद प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून करण्यात आली.
 
अल्हाददायक वातावरणाचे शहर अशी ओळख असलेल्या नाशिकची हवा धनत्रयोदशीपासून बिघडण्यास सुरुवात झाली. दिवाळीची धामधूम धनत्रयोदशीपासून सुरू झाली. धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि.११) हवेचा गुणवत्ता निर्देशांक ११८ इतका होता; मात्र लक्ष्मीपूजनाच्या रात्री रविवारी यामध्ये कमालीची वाढ झाली. सायंकाळी साडेसहा वाजेपासूनच शहर व परिसरासह उपनगरांमध्ये फटाक्यांची जोरदार आतषबाजीला प्रारंभ झाला. मध्यरात्री १ वाजेपर्यंत फटाक्यांचा आवाज कानी येत होता. यामुळे हवेचा गुणवत्ता निर्देशांक रविवारी रात्री २०३पर्यंत वाढला होता. ध्वनीप्रदूषणाची पातळी जरी कमी राहिली असली तरी फटाक्यांच्या धुरामुळे वायू प्रदूषणात मोठी वाढ झाली. यामुळे नाशिकची हवा बिघडली. हवेचा गुणवत्ता निर्देशांक दोनशेच्या पुढे सरकल्यामुळे प्रदूषणाचा धोकादायक स्तर असल्याची नोंद केंद्रीय प्रदूषण मंडळाकडून (सीपीसीबी)करण्यात आली आहे.