यवतमाळ : गोतस्करांना रोखण्याच्या प्रयत्नात बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची दगडाने ठेचून हत्या
महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड सुकळी जवळ, नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर एक भयंकर घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी मध्यरात्री बोलेरो पिकअपमध्ये गोवंशाची अवैध तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यावर बजरंग दलाचे कार्यकर्ते त्यांचा पाठलाग करत होते. तस्करांनी गजानन सुरोशे (वय ३२) यांच्या गाडीला वेढा घातला आणि दगड व लाकडी दांडक्यांनी ठेचून हत्या केली.
या घटनेननंतर संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच घटनेचे CCTV फुटेज समोर आले आहे. मृतकाचे नाव गजानन मारोती सुरोशे (वय ३२) असून ही घटना महाराष्ट्रात खळबळ उडवून गेली आहे. बजरंग दलाने हल्ला घडवून आणल्याचा दावा केला आहे आणि निषेध व्यक्त केला आहे.
नेमके काय घडले?
एका पिकअप वाहनातून सुमारे १५ ते १६ जनावरांना निर्घृणपणे कोंबून बेकायदेशीरपणे नेले जात असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. बिजोरा टोलनाक्याजवळ कार्यकर्त्यांनी हे वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तस्करांनी वाहनाचा वेग वाढवून पळ काढला. तस्करांच्या वाहनाने सुरुवातीला कार्यकर्त्यांच्या दुचाकीला कट मारून पाडले, ज्यामध्ये काही कार्यकर्ते जखमी झाले. त्यानंतर गजानन सुरोशे यांनी आपल्या कारने त्या पिकअप वाहनाचा पाठलाग सुरू केला. दबा धरून बसलेल्या तस्करांनी आणि त्यांच्या साथीदारांनी गजानन यांच्या कारवर जोरदार दगडफेक केली. त्यानंतर त्यांना कारमधून बाहेर ओढून लाकडी दांडके, लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण व दगडाने ठेचून हत्या केली. या जीवघेण्या हल्ल्यात गजानन यांचा मृत्यू झाला.
हत्येच्या बातमीमुळे महागाव आणि उमरखेड परिसरात तीव्र संताप निर्माण झाला. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि स्थानिक व्यापारी महासंघाने या घटनेचा निषेध करत 'महागाव बंद' ची हाक दिली. पोलिसांनी तत्परता दाखवत याप्रकरणी मुख्य संशयितांसह ६ आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच घटनास्थळावरून पिकअप वाहन जप्त करून सर्व जनावरांची सुटका करण्यात आली आहे. परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहे.
Edited By- Dhanashri Naik