शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 31 ऑक्टोबर 2022 (15:13 IST)

राज्यात भारत जोडो पदयात्रेची तयारी सुरु, येत्या 18 नोव्हेंबर शेगावाला येणार

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा सुरु आहे. ही पदयात्रा आता महाराष्ट्रात दाखल होणार आहे. 18 नोव्हेंबर रोजी राहुल गांधींची हि यात्रा बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे येणार आहे. याच दिवशी सायंकाळी राहुल गांधी यांची जंगी सभासुद्धा होणार आहे. राहुल गांधींच्या या सभेची आणि यात्रेची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्या सोबत माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, चंद्रकांत हंडोरे, यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेसचे मोठे नेते शेगाव येथे तयारी करत आहेत.
 
राहुल गांधी यांची पदयात्रा तीन दिवस बुलढाणा जिल्ह्यात असणार आहे. त्यामुळे सभेचे नियोजन करण्यासाठी आणि सभास्थळी पाहणी करण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांची शेगावमध्ये लगबग दिसत आहे. दरम्यान राहुल गांधी यांच्या सभेसाठी सहा लाख लोकं येणार असून त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे. अशी माहिती नाना पटोले यांनी दिली. दरम्यान राहुल गांधी भारत जोडो यात्रेमधून बेरोजगारी आणि ढासळलेली अर्थव्यवस्था या मुद्यांवरून भाजपवर हल्लाबोल करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत.
 
दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची नोंद जागतिक पातळीवर घेतली जाईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. राहुल गांधी यांच्या स्वागतच्या नियोजनासाठी प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 7 सप्टेंअबर रोजी कन्याकुमारी  येथून सुरु झाली होती.  एकूण 3,500 किमीचा प्रवास करून 12 राज्यांमधून ही यात्रा जाणार आहे. महाराष्ट्रात आगमन झाल्यानंतर त्यांच्या भोजन आणि न्याहारीसाठी मराठवाडा आणि खान्देशातील पाककृतींवर भर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor