शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 14 सप्टेंबर 2022 (14:54 IST)

जितेंद्र आव्हाड आक्षेपार्ह छायाचित्र प्रकरणात अनंत करमुसेंविरोधात दोषारोपपत्र दाखल

Jitendra Awhad
राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांचं आक्षेपार्ह छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारीत करण्याच्या प्रकरणात पोलिसांनी अनंत करमुसे यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केलं आहे.
 
या प्रकरणात करमुसे याने तपासकामात कोणत्याही प्रकारचे साह्य केले नाही. तसंच त्यांनी दाखल केलेली याचिकाही स्वच्छ हेतूने दाखल करण्यात आलेली नाही. शिवाय, करमुसे यांचं ट्वीट आणि फेसबुक पोस्ट हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षेबाहेर आहे, अशी निरीक्षणे उच्च न्यायालयाने नोंदवली आहेत.
 
अनंत करमुसे याने जितेंद्र आव्हाड यांचे अर्धनग्न अवस्थेतील मॉर्फ केलेले छायाचित्र त्याने समाजमाध्यमांवर प्रसारीत केले होते. या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी 6 एप्रिल 2020 रोजी भादंवि 292, 500 तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 च्या कलम 66 (ई) अन्वये गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्य़ातील दोषारोपपत्र ठाणे न्यायालयात दाखल करण्यात आहे. तसेच अनंत करमुसे याला समन्सपत्र बजावण्यात आले आहे, असं प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
 
"या आरोपपत्रामध्ये पोलिसांनी करमुसे याच्या वर्तणुकीवर ताशेरे ओढले आहेत. करमुसे याच्या जप्त केलेल्या फोनमध्ये जितेंद्र आव्हाड यांचे अर्धनग्न छायाचित्र सापडले होते. मात्र, असे असतानाही करमुसे याने पोलिसांना तपासात कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नसल्याचे या आरोपत्रात नमूद करण्यात आले आहे. आरोपी करमुसे याने स्वतःच्या मोबाईल फोनमधून स्वतः चे फेसबुक अकाउंटवरून जितेंद्र आव्हाड यांचा एडीट केलेला अर्धनग्न अवस्थेतील अश्लील फोटो अपलोड करून प्रसिद्ध केला असल्याने सदरचा मोबाईल फोन जप्त करून फोरेन्सिक लॅबमध्ये पाठविला असता, जातीद्वेष-धर्मद्वेष, व्यक्तीद्वेष आदी 27 प्रकारचे द्वेष पसरविणार्‍या पोस्ट करमुसे याने आपल्या वैयक्तिक अकाउंटवरून फेसबुक व ट्विटरवर अपलोड केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे." असेही प्रेसनोटमध्ये म्हटले आहे.
 
नेमकं प्रकरण काय?
एप्रिल 2020 मधील हे प्रकरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवे लावण्याच्या आव्हानावर आव्हाड यांनी टीका केली होती. त्यानंतर अनंत करमुसे यांनी आव्हाड यांना एका आक्षेपार्ह फेसबुक पोस्टमध्ये टॅग केलं होतं.
 
त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप ठाण्यातील अनंत करमुसे यांनी केला होता. त्यानंतर ठाणे भाजपने या प्रकरणी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती.
 
जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी घरातून उचलून नेऊन मारहाण केल्याचा आरोप करमुसे यांनी केला होता. मारहाण झाली तेव्हा यावेळी स्वत: जितेंद्र आव्हाडही त्याठिकाणी उपस्थित होते, असा करमुसे यांचा दावा आहे.
 
या प्रकरणात पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांना अटक केल्यानंतर त्यांना जामीनही देण्यात आला होता. याविषयी प्रचंड गुप्तता बाळगण्यात आली होती. पण अखेर, ही बातमी माध्यमांपर्यंत पोहोचली होती.
 
मी समाधानी नाही - करमुसे
मारहाण झालेली व्यक्ती अनंत करमुसे यांनी माध्यमांशी बोलताना त्यावेळी सांगितलं,
 
"जितेंद्र आव्हाड यांना अटक झाली असेल तर ज्या लोकांना त्रास देण्यात आला, कुणाचं मुंडन करण्यात आलं, कुणाच्या घरी जाऊन मारहाण करण्यात आली, त्या सर्वांचा हा विजय आहे. त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि असंच कायद्यानं यांच्याशी लढत राहिल."
 
करमुसे यांनी पुढे सांगितलं, "अटक झाली आणि सुटका झाली यावर मी समाधानी नाहीये. त्यांना शिक्षा झाली पाहिजे. कारण त्यादिवशी मला घरातून बाहेर नेण्यात आलं. माझ्या घरच्यांना खोटं सांगून मला बाहेर नेण्यात आलं होतं. ज्यांनी बाहेर नेलं ते पोलीस आजसुद्धा नोकरीवर आहेत. त्यांनासुद्धा 2 तासात जामीन देण्यात आलेला आहे. जे मला अजिबात पटलेलं नाहीये. खाकीवरच्या विश्वासानं मी त्यांच्याबरोबर गेलो होतो, त्याला डाग लागला आहे. जोवर या पोलिसांना बडतर्फ करत नाही, तोवर मला न्याय मिळणार नाही."