शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 28 ऑक्टोबर 2020 (07:45 IST)

भाजप नेत्यांवर टीका केल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरूद्ध पोलिसात तक्रार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणानंतर राजकारण चांगलच तापलं आहे. भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजपातील अनेक नेत्यांवर सडकून टीका केली होती.
 
त्यानंतर भाजपातील नेत्यांनीही पत्रकार परिषदा घेऊन ठाकरे यांच्यावर टीका केली. मात्र आता उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील वाक्याने भावणा दुखावल्याबद्दल औरंगाबाद येथील अॅड. रत्नाकर भिमराव चौरे यांनी त्यांच्या विरूद्ध बेगमपुरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
 
'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यामध्ये माझ्या भारत देशाची तुलना पाकिस्तान व बांगलादेश या दहशतवादी व मुस्लीम राष्ट्रांशी करून माझ्या भारत देशाचा अपमान केलेला आहे व माझी धार्मीक भावना भडकावली आहे.
 
त्यामुळे भारत देशाचा एकअर्थी अपमान झालेला आहे. उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी लाचार होऊन हिंदुत्वाचा त्याग करून खुर्ची संपादन केलेली आहे. त्या संदर्भात मी या आधी सुद्धा आवाज उठविलेला आहे. तरी मुख्यमंत्र्यांनी भारताचा अपमान करून राष्ट्रीय व धार्मीक भावना दुखावल्या, त्यामुळे त्यांच्याविरूद्ध कायदेशीर कार्यवाही करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा', असे अॅड. चौरे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात खणखणीत भाषण करत भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. यावेळी त्यांनी पाकिस्तान आणि बांग्लादेशचा उल्लेख केला होता. त्यावरून चौरे यांनी तक्रार दाखल करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरूद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.