1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Exactly how many MLAs are present at the meeting called by Uddhav Thackeray?

उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला नेमके किती आमदार उपस्थित?

uddhav thackeray
आमदारांपाठोपाठ शिवसेनेतील खासदारही शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांची बैठक बोलावली आहे. मातोश्रीवर सध्या ही बैठक सुरू आहे.
 
पण या बैठकीला तब्बल 10 खासदारांनी दांडी मारली आहे. त्यात राजन विचारे यांचासुद्धा समावेश आहे. याच राजन विचारे यांना शिवसेनेनं भावना गवळी यांच्या जागी प्रतोद म्हणून नेमलं आहे.
 
दरम्यान या बैठकीला भावना गवळी आणि श्रीकांत शिंदे हे केवळ दोनच खासदार उपस्थित नव्हते. बाकी सर्व खासदार उपस्थित होते असा दावा शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर म्हणाले.
 
आम्ही सर्व खासदारांनी द्रौपदी मूर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली आहे असं ते म्हणाले. यासंदर्भात उद्धव ठाकरे दोन दिवसात निर्णय घेतील असंही त्यांनी सांगितलं.
 
बैठकीला आलेले खासदार
गजानन किर्तीकर
विनायक राऊत
अरविंद सावंत
राहुल शेवाळे
धैर्यशील माने
हेमंत गोडसे
श्रीरंग बारणे
प्रतापराव जाधव
सदाशिव लोखंडे
ओमराजे निंबाळकर
बैठकीला अनुपस्थित खासदार
भावना गवळी
श्रीकांत शिंदे
कलाबेन डेलकर
राजन विचारे
संजय जाधव
राजेंद्र गावित
कृपान तुमाने
संजय मंडलीक
हेमंत पाटील
तर राज्यसभेचे संजय राऊत आणि प्रियांका चतुर्वेदीदेखील बैठकीला पोहोचले आहेत. तर अनिल देसाई मात्र दिल्लीत आहेत.
 
शिवसेनेतील 40 हून अधिक आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड केल्यानंतर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झालं. त्यानंतर शिवसेनेचे खासदारही आमच्या संपर्कात असल्याचे विधान शिंदे गटातील नेते गुलाबराव पाटील यांनी केले होते.
 
खासदार भावना गवळी यांनी भाजपबरोबर जाण्याबाबत शिंदे गटाच्या मागणीचा विचार करण्याबाबत मत व्यक्त केलं होतं.
 
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी विनंती करणारं पत्र खासदार राहुल शेवाळे यांनी लिहिलं होतं.
 
त्यानंतर शिवसेना खासदारांची मतं राष्ट्रपती निवडणुकीत फुटणार अशी चर्चा सुरू झाल्याने पक्षाने लोकसभेतील मुख्य प्रतोदपदावरून खासदार भावना गवळी यांची उचलबांगडी करत खासदार राजन विचारे यांची नियुक्ती केली.
 
तरीही काही खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी व्यक्तिगत संपर्क साधून भाजपसोबत जाण्याचा विचार करण्याची विनंती केली. आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात निवडून आल्याने त्यांच्यासोबत राहण्यापेक्षा भाजपसोबत जाणं योग्य ठरेल, असा काही खासदारांचा युक्तिवाद आहे.
 
'आईच्या दूधाशी बेईमानी करू नका'; उद्धव ठाकरेंचं आमदारांना भावनिक पत्र
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर निष्ठा दाखवत संकटाच्या काळात साथ दिल्याबद्दल शिवसेनेच्या 15 आमदारांना धन्यवाद व्यक्त करणारे भावनिक पत्र पाठवले आहे.
 
सुप्रीम कोर्टाचा निर्णय येण्याआधीच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या सोबत राहीलेल्या 15 निष्ठावान शिवसेना आमदारांना भावनिक पत्र लिहिलं आहे. या पत्रात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अडचणीच्या आणि संकटाच्या काळात साथ दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानले आहेत.
 
उद्धव ठाकरे यांनी या पत्रात म्हटलं, "आईच्या दूधाशी बेईमानी करू नका हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मंत्र जपत तुम्ही शिवसेनेसोबत राहत निष्ठेचं पालन केलं आहे. कोणत्याही धमक्या आणि प्रलोभनांना बळी न पडता आपण एकनिष्ठ राहिलात आणि शिवसेनेला बळ दिलेत. आई जगदंबा तुम्हास निरोगी आयुष्य देओ हीच प्राथना."
पुढील लेख
नवीन संसद इमारतीवरील विशाल अशोक स्तंभाचे पंतप्रधान मोदींनी अनावरण केले