1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 1 ऑक्टोबर 2018 (09:01 IST)

संविधान बदलून देशात अराजकता पसरविण्याचे केंद्र सरकार व भाजपचे षडयंत्र - फौजिया खान

ईव्हीएम मशिन व मनुस्मृतीचे प्रतिकात्म दहण करून आंदोलन
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना ही देशाला एकात्मतेत ठेवणारी व धर्मनिरपेक्षता जपणारी असून या घटनेशी निष्ठा ठेवून सर्वांनीच आपले कर्तव्य पार पाडणे ही जबाबदारी असताना केंद्र सरकार व भाजपचे नेते भारतीय राज्यघटनाच बदलून देशात जातीत व धर्मा-धर्मात फूट पाडून अराजकता माजवण्याचे षडयंत्र रचत असल्याचे स्पष्ट मत राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा माजी मंत्री फौजिया खान यांनी व्यक्त केले. दरम्यान मुख्य रस्त्यावर संविधान बचाव देश बचाव या अभियानांतर्गत ईव्हीएम मशिन व मनुस्मृतीचे प्रतिकात्मक दहण करून आंदोलनही करण्यात आले.
नांदेड शहर व ग्रामीण राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने ‘संविधान बचाव, देश बचाव’ या कार्यक्रमांतर्गत बैठक घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनिल कदम हे होते. यावेळी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या नाकर्तेपणाबद्दल बोलताना फौजिया खान म्हणाल्या की, देशात कधी नव्हे तो मोठा भ्रष्टाचार फोफावला आहे. महिलांना सुरक्षितता राहिली नाही, राफेल घोटाळ्याबाबत केंद्र सरकार स्पष्टीकरण देण्यात अपयशी ठरले आहे, केंद्र सरकार व राज्यसरकारमधील मंत्री, आमदार, खासदार हे महिला व युवतीबद्दल बेताल वक्तव्य करीत आहेत. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी एक शब्दही बोलत नाहीत, जनतेला भ्रष्टाचार व महागाईच्या खाईत लोटण्याचे काम मोदींनी केले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.शरद पवार साहेबांच्या नेतृत्त्वाखाली संपूर्ण देशात व राज्यात संविधान बचाव देश बचाव हे आंदोलन सुरू असून आम्ही कदापी राज्यघटना बदलू देणार नाही असेही त्या म्हणाल्या.
 
येत्या 9 ऑक्टोबर रोजी मराठवाडा विभागाचा विभागीय कार्यक्रम मा.खा.शरद पवार व पक्षाच्या सर्वनेत्यांच्या उपस्थितीत होणार असून त्या विभागीय मेळाव्यास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्त्या आ.विद्याताई चव्हाण, प्रदेश सरचिटणीस सुरेखा ठाकरे, युवती सेलच्या प्रदेशाध्यक्षा सक्षना सलगर आदींनी आपली भूमिका मांडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनिल कदम यांनी केले. या प्रसंगी व्यासपिठावर महिला आघाडीच्या राष्ट्रीय सरचिटणीस सोनालीताई देशमुख, राष्ट्रीय सचिव विणाताई खरे, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य छायाताई जंगले, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आशाताई भिसे, राष्ट्रवादी किसान भारतीचे प्रदेशाध्यक्ष माजी आ. शंकरअण्णा धोंडगे, प्रदेश उपाध्यक्ष मोहम्मदखान पठाण, प्रदेश सरचिटणीस हरिहरराव भोसीकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेंद्र जयसवाल, महिला प्रदेश सरचिटणीस सौ. कल्पना डोंगळीकर, जिल्हाध्यक्षा सौ. प्रांजली रावणगावकर, माजी उपमहापौर डॉ. शीला कदम, धर्मराज देशमुख, डॉ. मुजाहिद खान, युवकचे शहर जिल्हाध्यक्ष रऊफ जमिनदार, विद्यार्थी आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष कन्हैया कदम आदींची उपस्थिती होती.