शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 6 फेब्रुवारी 2023 (08:53 IST)

'मी सुरुवातीपासूनच...' राज ठाकरेंनी लिहिले सर्वपक्षीय नेत्यांना पत्र

raj thackeray
सध्या कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीच्या मुद्दा राज्यात चांगलाच गाजत आहे. एकीकडे भाजपने (BJP) या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध व्हावी म्हणून प्रयत्न सुरु असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीदेखील पत्र लिहीत सर्व पक्षीय नेत्यांना आवाहन केले आहे. त्यांनी पत्रात लिहिले आहे की, "महाराष्ट्र विधानसभेच्या २ आमदारांचे दुःखद निधन झाले. या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांत पोटनिडणुका होत आहेत. मी अगदी सुरुवातीपासून या मताचा आहे की, जेव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचे निधन होते तेव्हा त्याठिकाणी होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी. कारण मुळात जसा त्या विधानसभेतील कौल लोकप्रतिनिधीला असतो, तसाच कौल त्याच्या पक्षालादेखील असतो.” असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
 
पुढे त्यांनी लिहिले आहे की, “अनेकदा त्या पोटनिवडणुकीत उमेदवार हा मृत व्यक्तीच्या घरामधील असतो. अशावेळेस पक्षाने जर मृत व्यक्तीच्या घरातील उमेदवार दिला असेल तर, त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देणे ही एक प्रकारे, राजकीय संस्कृतीने त्या निधन झालेल्या व्यक्तीला श्रद्धांजलीच ठरणार नाही का? ही प्रगल्भता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाही,"
 
दरम्यान, कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीचा चांगलाच तापला आहे. कारण, भाजपने या दोनही पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात म्हणून इतर पक्षांकडे मागणी केली आहे. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीने ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही हे आधीच स्पष्ट केले आहे. यामध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील पुढाकार घेतला असून सर्वपक्षीय नेत्यांशी याबाबत संवाद साधत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor