गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 24 जुलै 2021 (20:49 IST)

वाचा, राज्यात पावसाची काय परीस्थिती आहे?

राज्यात दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसानंतर मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. राज्यात पावसामुळे होणारी परिस्थिती आणि दरडी कोसळल्यामुळे सुमारे 129 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, पुढचे दोन-तीन दिवस कोकणात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे कोकणच्या चिंतेत भर पडली आहे. मध्य महाराष्ट्रातही अतिमुसळधार पावसाचा अंदाज, भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. 1 जूनपासून राज्यात पावसाचे 136 बळी गेल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. तर यंदा दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 
 
रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये तळीये गावात आतापर्यंत 44 जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अद्याप 20 ते 30 जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. मृतांचा आकडा 70पर्यंत जाण्याची भीती व्यक्त होत आहे. तर साताऱ्यात मिरगावात दरड कोसळून 12 ठार, आंबेघरमध्ये 17 जण दरडीखाली अडकल्याची भीती आहे. रत्नागिरीत जिल्ह्यातील पोसरेत 4 जण ठार, तर 13 जण बेपत्ता झाले आहेत. तर चिपळूणमध्ये मदतकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.
 
कोल्हापूर आणि सांगलीचे टेन्शन वाढले आहे. पंचगंगेचा कोल्हापूरला, तर सांगलीला कृष्णेचा वेढा दिसून येत आहे. 2019 पेक्षा मोठं संकट येण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे चिंतेत अधिक भर पडली आहे. दरम्यान, पश्चिम कोकणात सिंधुदुर्गात रात्री ढगफुटीसदृश पाऊस झाला. या पावसामुळे सिंधुदुर्गातील कर्ली आणि तेरेखोल नदीला पूर आला आहे. नदीकाठच्या अनेक गावांत पुराचं पाणी शिरलंय. माडखोल, सावंतवाडी, आंबोली मार्गावरही तीन ते चार फूट पाणी आहे. 
 
महाडपाठोपाठ रत्नागिरीत जिल्ह्यातील खेड तालुक्यात दरड कोसळण्याची मोठी दुर्घटना घडली आहे. पोसर गावात दरड कोसळून १७ जण गाडले गेले आहेत. यातल्या 4 जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात आलाय. तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. पोसरे खुर्दच्या बौद्धवाडीत १८ घरांवर डोंगर खचून दरड कोसळली.  घटनास्थळी एनडीआरएफचे जवान युद्धपातळीवर बचावकार्य करत आहेत. 
 
कोल्हापूर शहरालगतची पंचगंगा नदी 2019 मध्ये पूर पातळीच्यावर वाहत आहे. पुणे आणि कोल्हापूरसह जिल्ह्यात सांगली आणि सातारा जिल्ह्यांचा समावेश आहे. मुसळधार पाऊस आणि दरडी कोसळल्याने सातारा चांगलाच परिणाम झाला आहे.
 
भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) आधीच पावसाने तडाखा बसलेल्या सहा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केल्यामुळे राज्यातील लोकांना पावसापासून काहीसा दिलासा मिळालेला दिसत नाही. आयएमडीने 'मुसळधार पावसाचा' अंदाज वर्तविला आहे आणि खबरदारीच्या उपाययोजनांची शिफारस केली आहे. किनारी भागातील कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत पुढील 24 तास रेड अलर्ट बजाविण्यात आला आहे.