शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 16 जानेवारी 2019 (09:47 IST)

सीमाप्रश्‍नी कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करणार नाही

महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्‍नी महाराष्ट्र सरकार कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करणार नाही. न्यायालयीन कामकाजाचा योग्य प्रकारे पाठपुरावा करण्यात येईल. त्याचबरोबर सीमाप्रश्‍नी तज्ज्ञ समिती आणि उच्चाधिकार समितीची बैठक लवकरच बोलावू, अशी ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. खा. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मध्यवर्ती म. ए. समिती अध्यक्ष दीपक दळवी, खजिनदार प्रकाश मरगाळे, सुनील आनंदाचे, माजी ता. पं. सदस्य मारुती मरगाण्णाचे यांनी मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांची मंगळवारी भेट घेतली. 
 
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. परंतु, याकडे महाराष्ट्राने दुर्लक्ष केल्याने मध्यवर्ती म. ए. समितीने आंदोलन छेडण्याचा इशारा नुकताच दिला होता. शनिवारी बेळगाव व कोल्हापूर दौर्‍यावर आलेल्या  खा. शरद पवार यांनी समिती शिष्टमंडळाला सोमवारी मुख्यमंत्र्यांची भेट घालून देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार सोमवारी सायंकाळी भेट घेण्यात आली.