शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 जून 2022 (21:24 IST)

वीज पुरवठा खंडित होण्याचे महावितरणने दिले हे कारण…

electricity
गुरुवारी संध्याकाळी वा-यासह आलेल्या पहिल्याच पाऊसामुळे नाशिक शहर व मंडळातील अनेक भागात महावितरणच्या यंत्रणेला फटका बसला. त्यामुळे महावितरणची १९ विद्युत उपकेंद्रे ३३ केव्हीच्या १९ विद्युत वाहिन्या व ११ केव्हीच्या ७२ वाहिन्यांचा रोहित्रांचा वीज पुरवठा खंडित झाला होता, मात्र बंद झालेली वीज यंत्रणा सुरु करण्यासाठी तात्काळ व अविरत कार्य करीत महावितरणच्या अभियंत्यांनी व जनमित्रांनी टप्याटप्य्याने वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू केले आणि बंद पडलेली व बिघाड झालेली यंत्रणा दुरुस्त करून गुरुवारी रात्रीच शहरातील जवळपास बहुतांश भाग व जिल्ह्यातील उर्वरित भाग आज पूर्ववत केला आहे. ग्राहकांना विजेअभावी होणाऱ्या त्रासाची महावितरणला जाणीव असून अखंडित, सुरळीत व सुरक्षित ग्राहक सेवेसाठी यंत्रणा सज्ज असून ग्राहकांनी या काळात थोडासा संयम राखून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.
 
दरवर्षी महावितरणकडून मान्सूनपूर्व आगमनाअगोदर विद्युत यंत्रणेची देखभाल व दुरुस्तीची कार्ये केली जातात, यामध्ये विद्युत वाहिन्या, रोहित्र व इतर यंत्रणा उघड्यावर असल्याने विद्युत यंत्रणेला लागलेल्या झाडाच्या फांद्या काढण्यासह वाहिन्या व यंत्रणेची देखभाल दुरुस्ती यासह नियोजन करून इतर महत्वाची कामे केली जातात.

जेणेकरून पावसाळ्यामध्ये ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होणार नाही. मात्र तरीसुद्धा फांद्या छाटताना झाडावरील संपूर्ण फांद्या काढता येत नाही. त्यामुळे जोरदार हवेच्या दाबामुळे लगतच्या फांद्या, मांज्याचे धागे व इतर साहित्य विद्युत यंत्रणेला अडथळा आणीत असतात. त्यासोबतच उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे वीजवाहक यंत्रणेवर बसविण्यात आलेल्या पिन इन्सुलेटर आणि डिस्क इन्सुलेटरवर पहिल्याच पावसाचे पाणी पडल्याने ते पंक्चर होऊन वीजपुरवठा बाधित होतो. विजेचा संभाव्य अपघात टाळण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा(ब्रेकर) कार्यंनवित होतात व वीजप्रवाह खंडित होतो. याशिवाय वृक्ष, झाडाच्या फांद्या वीजवाहक तारांवर पडल्याने व वाऱ्यामुळे वीजवाहक तारा तुटल्याने वीजपुरवठा बंद होत असतो. त्यामुळे फौल्ट शोधण्यासाठी व बंद झालेला पुरवठा सुरु करण्यासाठी यंत्रणा सातत्याने कार्यरत असते.
 
पहिल्याच पावसाने काल जिल्ह्यात व शहरात वीजयंत्रणेवर आघात केला. यामध्ये त्यामुळे १९ उपकेंद्रे, ३३ व ११ केव्हीच्या ९१ वाहिन्यां आणि १७८९ रोहित्रे बंद पडली त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. वीज यंत्रणा सुरळीत करण्यासाठी महावितरणने सर्व ठिकाणी आपली यंत्रणा ठेवली होती. वाऱ्यासह सुरू असलेल्या या पावसात फॉल्ट शोधून तो दुरुस्त करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी व कंत्राटदाराचे कामगार यांनी प्रयत्न सुरु केले. पावसाचा वेग ओसरताच गुरुवारी रात्री शहरातील व आज जिल्ह्यातील उर्वरित वीज पुरवठा पूर्ववत केला.
 
महावितरणच्या नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, नाशिक मंडळाचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकारी अभियंते आणि अभियंते, जनमित्र, कंत्राटी कर्मचारी यांनी सातत्याने अहोरात्र कार्य करीत वीज पुरवठा पूर्ववत केला आहे. वा-यासह आलेल्या पाऊसामुळे जर आपल्या परिसरात इलेक्ट्रिक खांब कोसळला, वीज वाहिनी तुटल्यास किंवा रोहित्र जळाल्यास महावितरणच्या टोल फ्री नंबर १८००२३३३४३५ / १८००१०२३४३५ / १९१२ यावर तसेच आपात्कालीन परिस्थितीत तात्काळ संबंधित महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन महावितरणने केले आहे.