गुरूवार, 5 मार्च 2026
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. शिवजयंती
Written By वेबदुनिया|

छत्रपतींची दूरदृष्टी

- डॉ. सदानंद मोरे

छत्रपती
WD
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच आज महाराष्ट्र दिसत आहे. महाराष्ट्राला महाराष्ट्रपण देण्याचे काम त्यांनी केले. शिवाजी महाराज नसते तर आपल्या राज्याला महाराष्ट्रपण आलेच नसते. त्यांच्या कार्याचा आजच्या ‍परिस्थितीत फार विचार करण्याची आवश्यकता आहे. एक कठोर प्रशासक म्हणून शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची दाखल इतिहासाने घेतलीच आहे. ते जसे उत्तम प्रशासक होते, तसेच त्यांच्याकडे कमालीची दूरदृष्टीही होती. त्यातूनच त्यांनी महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर सागरी किनारा आहे हे लक्षात घेऊनच सैन्यासाठी सागरी व्यवस्था राबवली. आपल्याकडे मनुष्यबळ आणि शत्रूच्या तुलनेत शस्त्रास्त्रांची कमतरता आहे हे लक्षात घेऊनच त्यांनी सागरी व्यवस्थेचा उपयोग करून घेतला. यातून त्यांचा दूरदर्शीपणा लक्षात येतो. शिवाजी महारजांनी धर्माचे राजकारण कधीच केले आही. त्यांच्या सैन्यातही काही मुस्लिम धर्माचे सैनिक होते. त्यावेळी धर्माचा अर्थ वेगळा घेतला जात असे. जो आपले कर्तव्य करतो त्याला धर्म असे म्हटले जाते.

महाभारतातही धर्माचा असाच अर्थ लावला गेला आहे, पण आज जाती-धर्माच्या नावावर राजकारण करताना याचा विसर आपल्याला पडला आहे. शिवाजी महाराज हे लष्करी तज्ज्ञ होते. युद्ध कशा प्रकारे खेळले पाहिजे, याची त्यांना जाण होती. केवळ शत्रू मुस्लिम समाजाचा आहे म्हणून त्यांनी मोगलांवर हल्ला केला नाही. त्यांच्या सैन्यदलात मुस्लिम समाजाचे सैनिक होते त्याचप्रमाणे दलित समाजातील सैनिकही होते, पण आज जाती-धर्माच्या नावावर राजकारण करताना या गोष्टीचा आपल्याला विसर पडला आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत नीतीमत्ता, चारित्र्य आणि चांगली वागणून याच मूल्यांचा नेहमी महत्त्व दिले. युद्धशास्त्राच्या नियमांनुसार ते युद्ध खेळले. त्यांनी आपल्या वाटचालीत शत्रूच्या स्त्रियांनाही मोठा सन्मान दिला. त्यांच्या अनेक कामांची नोंद आज घेणे आवश्यक आहे. आज भ्रष्टाचार करून मोठं होण्याचा प्रयत्न करणार्‍या राजकीय नेत्यांनी शिवाजी महाराजांचे विचार लक्षात घेणे गरजेचे आहे.