गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. स्वाइन फ्लू
Written By अभिनय कुलकर्णी|

गरज भासल्यास परदेशातूनही लस खरेदी- आझाद

देशभरात स्वाईन फ्ल्यू वर नियंत्रण प्राप्त करण्यासाठी, विविध पातळ्यांवर युद्धस्तरावर प्रयत्न केले जात आहेत. येत्या सहा महिन्यांच्या आत भारतीय कंपन्या स्वाईन फ्ल्यू विरोधी लस बनवतील. मात्र त्याआधी जगभरातील कुठल्याही देशाने यावर रामबाण लस तयार केल्यास ती खरेदी करण्यास केंद्र सरकार तयार आहे असे केंद्रीय आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी सांगितले.

दरम्यान देशभरातील स्वाईन फ्ल्यू ने ग्रस्त रूग्णांची संख्या ९५९ इतकी झाली असून यांपैकी ५६३ रूग्णांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे. तर राज्यभरातील स्वाईन फ्ल्यू ग्रस्त रूग्णांची संख्या ३२७ इतकी असल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. आज पुण्यातील दोन जणांचा तर मुंबईतील एका महिलेचा स्वाईन फ्ल्यू ने दगावून मृत्यू झाला. पुण्यापाठोपाठ मुंबी महापालिकेनेही, महापालिका शाळा काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील आज खाजगी शाळांच्या प्राचार्यांची भेट घेऊन आपल्या शाळा काही दिवस बंद ठेवण्याचे आवाहन केले. काही ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केल्याच्याही घटना मुंबईत घडल्या.

ठाणे जिल्ह्यात आज आणखी तीन स्वाईन फ्ल्यू ग्रस्त रूग्णांची नोंद करण्यात आली. मुंबई - ठाण्यालगतच्या रायगड जिल्ह्यातही २ स्वाईन फ्ल्यू चे संशयित रूग्ण सापडले आहेत. शासनाने आपल्या सर्व संस्थांना हाय ऍलर्ट जारी केले असून सर्व राजकीय पक्ष मात्र आपही स्वाईन फ्ल्यू च्या साथीचे राजकीय भांडवल करताना दिसत आहेत.