मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019 (10:49 IST)

IT क्षेत्रातील 40 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता - मोहनदास पै

भारतीय अर्थव्यवस्थेतील सुस्ती कायम राहिली, तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्या 30 ते 40 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू शकतात, अशी भीती इन्फोसिसचे माजी मुख्य आर्थिक अधिकारी (CFO) मोहनदास पै यांनी व्यक्त केली आहे. 
 
"IT क्षेत्रात प्रत्येक 5 वर्षांनंतर हजारो लोकांच्या नोकऱ्या या प्रकारे जातात. कारण, पाच वर्षांत IT क्षेत्रात मोठे बदल होत असतात आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांना नोकऱ्यांतून काढलं जातं," असं पै यांनी म्हटलं आहे.
 
"जेव्हा कोणतीही इंडस्ट्री पूर्ण सक्षम होते, तेव्हा मध्यम स्तरावर काम करणारे अनेक लोक आपल्या पगाराच्या तुलनेत कंपनीला नवं काही देऊ शकत नाहीत. याच कारणामुळे जगात प्रत्येक क्षेत्रात अनेक जणांना आपली नोकरी गमवावी लागते," असंही त्यांनी म्हटलं आहे.
 
ते पुढे म्हणाले, "एखादी कंपनी विकसित होत असते, तेव्हा कर्मचाऱ्यांना बढती मिळत असते, तसंच त्यांच्या पगारातही वाढ होत असते. अशा परिस्थितीत कंपनीला यामुळे फारसा फरक पडत नाही. मात्र, जेव्हा कंपनीचा विकास थांबतो, तेव्हा व्यवस्थापनाला यावर विचार करावा लागतो. अशा परिस्थितीत मध्यम आणि वरच्या पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गरजेपेक्षा जास्त पगार मिळत असतो, त्यामुळे त्यांच्यावर नोकरी जाण्याचं संकट ओढावतं."