बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019 (15:36 IST)

काश्मीर: कलम 370 विरोधातल्या याचिकेला काही अर्थ नाही - सर्वोच्च न्यायालय

सरकारच्या कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी याचिकाकर्त्याला फटकारलं आहे.
 
सरन्यायाधीश गोगोई यांच्याबरोबर न्यायाधीश एस. बोबडे आणि एस. ए. नजीर यांच्या खंडपीठाने कलम 370 विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी केली.
 
वकील एम. एल. शर्मा यांनी सरकारच्या कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेला काही एक अर्थ नाही, असं या खंडपीठानं म्हटलं.
 
"ही कसली याचिका आहे? ही याचिका नामंजूर केली जाऊ शकते, परंतु रजिस्ट्रीकडे आणखी 5 याचिका आहेत," असं खंडपीठानं म्हटलंय.
"मी कलम 370 वरील याचिका वाचण्यासाठी 30 मिनिटं घालवली, पण त्यातून काही निष्पन्न झालं नाही," असं खंडपीठानं म्हटलंय.
 
"तुमचं म्हणणं तरी काय आहे? राष्ट्रपतींचा आदेश स्वीकारला जाऊ नये असं देखील तुम्ही म्हटलं नाही. मग तुमचं म्हणणं तरी काय आहे?" या शब्दांत सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्यांना फटकारलं.
 
सर्वोच्च न्यायालयानं वकिलांना कलम 370 वरील सहा याचिकांमधील तांत्रिक दोष दूर करण्यास सांगितलं आणि सुनावणी तहकूब केली.