गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (15:16 IST)

स्टँड अप कॉमेडियन रोहन जोशीची 'ही' पोस्ट वादात

विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांचं 21 सप्टेंबरला निधन झालं. ही बातमी समोर येताच देशभरातून त्यांच्या चाहत्यांनी दु:ख व्यक्त केलं. परंतु स्टँड अप कॉमेडियन रोहन जोशी यांची पोस्ट मात्र वादात अडकली.
 
रोहन जोशी यांनी अतुल खत्री यांच्या पोस्टवर एक कॉमेंट (प्रतिक्रिया) केली होती.
 
अतुल खत्री यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर लिहिलं, 'आरआयपी राजूभाई' तुम्ही अनेकांना प्रेरणा दिली. तुम्ही जेव्हा व्यासपीठावर जायचा तेव्हा तुफान फटकेबाजी करायचा. तुम्हाला पाहून लोकांच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य यायचं. भारतीय स्टँड अप कॉमेडी क्षेत्राचं आज मोठं नुकसान झालं.'
 
या पोस्टवर रोहन जोशी यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, 'आपण कोणालाही गमावलं नाहीय. कर्म असोत, रोस्ट असो किंवा बातम्यांमध्ये येणं असो. राजू श्रीवास्तव यांनी नवीन कलाकारांना शिव्याशाप देण्याची एकही संधी सोडली नाही. त्यांना कलाप्रकार समजायचा नाही म्हणून तो आक्षेपार्ह वाटायचा. त्यांनी काही चांगले विनोद केले असतील पण त्यांना कॉमेडीची ताकद किंवा कुणाच्या अधिकारांच्या रक्षणासाठी केलेलं काहीही कळालं नाही. तुम्ही सहमत नसला तरीही.'
 
या कॉमेंटवरून रोहन जोशी यांना श्रीवास्तव यांच्या चाहत्यांनी ट्रोल केलंय. 'त्यांच्याविषयी असं आक्षेपार्ह लिहून तुम्ही प्रसिद्ध झालात हेच त्यांनी कमवलं आहे,' अशा शब्दात चाहत्यांनी रोहन जोशी यांच्यावर टीका केली आहे. झी 24 तासने हे वृत्त दिलं.
 
ट्रोलिंगनंतर रोहन जोशी यांनी आपली कॉमेंट हटवल्याचं दिसून येतं. तसंच कोणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नव्हता असंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.