गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 26 मार्च 2020 (16:02 IST)

कोरोना व्हायरस : ग्राउंड रिपोर्ट

मुंबई
मुंबई कृषी उत्पन बाजार समिती सुरु ठेवण्याचा निर्णय अन्न नागरी पुरवठ व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी घेतला आहे. 
 
बाजारपेठ सुरु होणार असल्याने बाजारपेठेच्या गेटवर महत्त्वाची सूचनाही लावण्यात आली आहे. या सूचनेमध्ये म्हटले की, व्यापारी, अडते, दलाल, खरेदीदार, वाहतूकदार, माथाडी कामगार, मापाडी आणि इतर सर्व घटकांनी आवक गेटवर उपलब्ध असलेले थर्मलचेक अप करून, सॅनिटायझरने हात धुवून आणि मास्क तोंडाला बांधून मार्केटमध्ये प्रवेश करावा. जर या सुचनेचे उल्लंघन केल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येईल आणि संबंधीतावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
 
पुणे
- मागील ४८ तासांपासून एकही नवा कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेला नाही. दुसरीकडे महाराष्ट्रातील पहिले कोरोनाग्रस्त दाम्पत्य यांच्यासह दाम्पत्याची मुलगी, दाम्पत्याला मुंबईहून घेऊन येणारा कॅब चालक आणि दुबई ट्रिपमधीलसह एक प्रवासी यांचा यात समावेश आहे. यातील दाम्पत्याचे दुसरे निगेटिव्ह रिपोर्ट मंगळवारी रात्री उशिरा तर उरलेल्या तिघांचे निगेटिव्ह रिपोर्ट बुधवारी संध्याकाळी आले आहेत. यापैकी या दांपत्याला घरी सोडण्यात आले आहे.
 
- पुण्यातील कोथरुडचे आमदार असलेल्या चंद्रकांत पाटलांनी आपल्या मतदारसंघात पाच रुपयात घरपोच पोळी भाजी देण्याची घोषणा केली आहे. 
 
यासाठी व्हाट्सअप नंबर “आ चंद्रकांतदादा मदत गट 1″ :- 8262879683 पोळीभाजीसाठी सकाळी 10 वाजेपर्यंत मागणी करायची आहे. नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर व्हाट्सअप मेसेज करुन मागणी नोंदवावी लागणार आहे. दुपारी एक वाजेपर्यंत पोळीभाजी घरपोच केली जाईल. तसेच संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मागणी केल्यावर रात्री 9 वाजेपर्यंत पोळीभाजी घरपोच मिळणार आहे.
 
ज्यांना औषधांची गरज आहे आणि डॉक्टरांनी नियमित घ्यायला सांगितली आहेत, अशा नागरिकांना 25% सवलतीच्या दरात घरपोच प्रिस्क्रिप्शननुसार औषध पोहोचवणार आहेत. औषध सेवेसाठी व्हाट्सअप नंबर “आ चंद्रकांतदादा मदत गट 2” :- 9922037062
 
रोज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्रिस्क्रिप्शन, नाव , पत्ता आणि मोबाईल नंबर व्हाट्सअप करावे व दुसऱ्या दिवशी औषधे घरपोच केली जातील. 
 
- ससूनची नवी 11 मजली इमारत 1 एप्रिलनंतर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या उपचारासाठी वापरली जाणार असून तिचे नामकरण आता 'कोविड- 19 हॉस्पिटल' असे केले आहे. या नवीन हॉस्पिटलमध्ये 7 आयसीयू खाटासह (बेड) 700 नवीन खाटा बसविण्यात येत आहेत. कोरोनाच्या पॉझिटीव्ह रुग्णासाठी युद्धपातळीवर हे रुग्णालय सज्ज करण्यात येत आहे. खासगी रुग्णालयातील तज्ज्ञांसह ससूनचे तज्ज्ञ डॉक्टर येथील रुग्णाचे व्यवस्थापन करतील. 
 
चीनच्या ट्रीटमेंट मॉडेल प्रमाणे आरोग्य सेवा पुरवणाऱ्या स्टाफला संसर्गाचा जास्त धोका न पत्करता कोरोनाच्या रुग्णाचे योग्य व्यवस्थापन करण्याचा उद्देश यामागे आहे. चीनने कोरोनाच्या रुग्णांना विविध रुग्णालयात भरती न करता एकाच रुग्णालयात भरती केले होते. त्यामुळे रुग्णांचे व्यवस्थापन योग्य रीतीने त्यांना करता आले. त्यानुसार खासगी रुग्णालयात कोरोनाचे संशयित रुग्ण दाखल करण्यात येतील आणि तेथून त्यांची चाचणी करण्यात येईल.
 
सोलापूर
शहरात डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना तपासणीची प्रयोगशाळा तयार झाली आहे. या प्रयोगशाळेसाठी आवश्यक असणारे तंत्रज्ञाची पदे भरण्यात आली आहे. सोबतच त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठपुरावा केला. मग त्यांच्या मान्यतेनंतर सोलापुरातच स्वॅब (नमुना) टेस्टींग होणार आहे.
 
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात विविध ठिकाणी व्हायरल रिसर्च डायग्नोसिस लॅब सुरु करण्याची घोषणा केली होती. सोलापुरातील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आठ एप्रिलपर्यंत प्रयोगशाळा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत; मात्र त्या आधीच प्रयोगशाळा सुरु होणार आहे. महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागांतर्गत व्हीआरडीएल (व्हायरल रिसर्च डायग्नोसिस लॅब) ही प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे.
 
यासाठी वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्ये विभागाकडून ५० लाख ३५ हजार रुपये देण्यात आले आहेत. या प्रयोगशाळेमध्ये बायोसेफ्टी कॅबिनेट, रेफ्रिजरेटेड हाय स्पीड सेंन्ट्रीफ्युज थर्मल सायकलर, जेल डॉक्युमेंटेशन सिस्टीम अँड जेल इलेक्ट्रोफोरेसीस, रेफ्रिजरेटेड मायक्रोफ्युजरिअल टाईम पीसीआर मशीन, ८० व्हर्टिकल अल्ट्रा लो फ्रिजर, अ‍ॅटोमेटेड एलायजा मायक्रो प्लेट वॉशर, अ‍ॅटोमेटेड एलायजा मायक्रो प्लेट वॉशर या नऊ यंत्रांचा समावेश आहे.
 
सांगली
शहरात जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी ३१ मार्च २०२० रोजीच्या रात्री १२ वाजेपर्यंत जिल्हा स्थलसिमा हद्दीतील सर्व पेट्रोल पंप धारकांना पेट्रोल व डिझेल विक्री बंद करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याकरिता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्याच्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी पेट्रोल व डिझेल विक्री बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
 
अहमदनगर
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने लागू केलेल्या नियमांच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात तीन हजार पोलिसांचा खडा पहारा आहे. जिल्ह्यात सध्या अधिकारी अणि कर्मचारी असे एकूण ३ हजार २५० पोलिसबळ नियुक्तीस आहे़. कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात कलम १४४ लागू करून जमाबंदी आणि संचारबंदी करण्यात आली आहे तसेच रस्त्यावर वाहने आणण्यासही बंदी आहे. या नियमांच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी मात्र नागरिक नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत.  पोलिसांसह  होमगार्डही तैनात करण्यात आलेले आहेत.
 
१४ ठिकाणी जिल्ह्याची सीमा बंद
बाहेरील जिल्ह्यातून नगर जिल्ह्यात कोणी येऊ नये यासाठी बीड, सोलापूर, नाशिक व औरंगाबाद या जिल्ह्यांना जोडणा-या १४ ठिकाणचे रस्ते बंद करण्यात आले आहेत. या ठिकाणी २४  तास पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे. केवळ अत्यावश्यक सेवांची वाहतूक करणाºया वाहनांना सोडण्यात येत आहे.
 
गडचिरोली
गडचिरोली जिल्हयासह लगतच्या बस्तरमध्ये आदीवासी अतिदुर्गम भागात झाडांच्या पानापासुन मास्क तयार करुन वापर करीत असल्याचे दिसून आले आहे. आदिवासी भागात नागरिकांकडे आरोग्याच्या सुविधा नाहीत या सुविधा नसल्या तरी कोरोनापासुन बचावासाठी आदीवासीनी जनजागृती सुरु करत स्वतःच नैसर्गिक स्रोतांचा वापर करुन मास्क तयार केले आहेत.
 
रत्नागिरी
राजापूरमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपययोजना सुरू असतानाच आता जागरूक गावकऱयांनीही स्वतःहून पुढे येत प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहे. अनेक गावांनी बाहेरील व्यक्तीला प्रवेश बंदी केली आहे. चिपळुण तालुक्यातील परशुराम पाठोपाठ आता रत्नागिरी तालुक्यातील कारवांचीवाडी, धनावडेवाडी, धामणसे, आंबेशेत त्याचबरोबर राजापुर तालुक्यातील पाचल व जैतापुर आदी गावांमध्ये गावकऱयांना रस्ते बंद करत स्वतःलाच ‘क्वारंटाईन’ करून घेतले आहे.
 
कोल्हापूर
औषधे, किराणा सामान, दूध, भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंची विक्री दुकाने शक्य असल्यास 24 तास खुली ठेवण्यास कोणतीही हरकत नाही. त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई केली जाणार नाही, असे जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांनी स्पष्ट केले. परंतु गिर्‍हाईकांमध्ये सुरक्षित अंतर (सोशल डिस्टन्सिंग) असणे, हॅन्ड सॅनिटायझरचा वापर करणे याची खबरदारी दुकानदारांनी घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला. ग्राउंड रिपोर्ट