॥ श्रीगणेशाय नमः ॥
	 
	हे सगुण स्वरूपा रुक्मिणीवरा । हे चंद्रभागातटविहारा ।
	श्रीसंतवरदा शारंगधरा । पतितपावना दयानिधे ॥१॥
				  													
						
																							
									  
	 
	लहानावांचून मोठ्याचा । मोठेपणा न टिके साचा ।
	पतिताविण परमेश्वराचा । बोलबाला होणें नसे ॥२॥
				  				  
	 
	आम्ही आहों पतित । म्हणून तुला म्हणतात ।
	पावनकर्ता रुक्मिणीकांत । हें आतां विसरूं नको ॥३॥
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	परिस लोहाला सोनें करी । म्हणुनी त्याचें महत्त्व भूमीवरी ।
	ओहोळ पोटीं घे गोदावरी । म्हणून म्हणती तीर्थ तिला ॥४॥
				  																								
											
									  
	 
	याचा विचार करावा । चित्तीं आपुल्या माधवा ।
	दासगणूला हात द्यावा । बुडूं न द्यावें कोठेंही ॥५॥
				  																	
									  
	 
	असो गोविंदबुवा टाकळीकर । एक हरिदास होता थोर ।
	तो कराया कीर्तनगजर । शेगांवासी पातला ॥६॥
				  																	
									  
	 
	तेथें शिवाचें मंदिर । पुरातन होतें साचार ।
	ज्याचा केला जीर्णोध्दार । मोटे नामक सावकारें ॥७॥
				  																	
									  
	 
	अलिकडच्या श्रीमंताला । मदिराचा कंटाळा ।
	मोटारी क्लब बायसिकला । यांचें प्रेम बहु असे ! ॥८॥
				  																	
									  
	 
	तैसा न मोटे सावकार । श्रीमंत असून भाविक फार ।
	त्यानेंच हा जीर्णोध्दार । केला असे मंदिराचा ॥९॥
				  																	
									  
	 
	म्हणोन मोट्याचें मंदिर । वदूं लागले नारीनर ।
	आतां पुढचा प्रकार । काय झाला तो ऎका ॥१०॥
				  																	
									  
	 
	त्या मोट्याच्या मंदिरीं । उतरले टाकळीकर कथेकरी ।
	त्यांचा घोडा समोरी । बांधिला होता मंदिराच्या ॥११॥
				  																	
									  
	 
	घोडा अतिद्वाड होता । कोणासही मारी लाथा ।
	समोरून कोणी येतां । त्यास चावे कुत्र्यासम ॥१२॥
				  																	
									  
	 
	तोडी चर्हाटें वरच्यावरी । स्थिर न राहे क्षणभरी ।
	कधीं कधीं कांतारीं । त्यानें जावें पळोन ॥१३॥
				  																	
									  
	 
	खिंकाळे रात्रंदिवस । वाईट खोड्या बहुवस ।
	आल्या होत्या मुक्कामास । श्रोते तया घोड्याच्या ॥१४॥
				  																	
									  
	 
	लोखंडाच्या सांखळ्या । होत्या त्यासी बांधण्या केल्या ।
	त्या या समयीं राहिल्या । टाकळीमाजी विसरून ॥१५॥
				  																	
									  
	 
	चर्हाटानें कसा तरी । घोडा मंदिरासामोरी ।
	बांधूनिया कथेकरी । निजले जाऊन शय्येला ॥१६॥
				  																	
									  
	 
	रात्र झाली दोन प्रहर । तमें आक्रमिलें अंबर ।
	दिवाभीतांचे घुत्कार । होऊं लागले वृक्षावरी ॥१७॥
				  																	
									  
	 
	टिटव्या  टी टी  शब्द करिती । वाघुळें भक्ष्या धुंडिती ।
	पिंगळे बसुनि वृक्षांवरती । किलबील करूं लागले ॥१८॥
				  																	
									  
	 
	सामसुम जिकडे तिकडे । बंद झालीं कवाडें ।
	कोठेंही ना दृष्टि पडे । एकही माणूस रस्त्यांनीं ॥१९॥
				  																	
									  
	 
	ऎशा रात्रसमयास । श्रीगजानन पुण्यपुरुष ।
	घोडा बांधल्या ठायास । येते झाले सहजगतीं ॥२०॥
				  																	
									  
	 
	जे जे कोणी द्वाड असती । त्यांना सुधारण्याप्रती ।
	साधुपुरुष अवतार घेती । ईशाज्ञेनें भूमीवर ॥२१॥
				  																	
									  
	 
	औषधाचें प्रयोजन । रोगा निवारण्याकारण ।
	तेवीं द्वाडाचें द्वाडपण । साधुसंत निवारिती ॥२२॥
				  																	
									  
	 
	असो गजानन घोड्यापासी । आले रात्रसमयासी ।
	जाऊनी निजले अति हर्षीं । चहूं पायांत घोड्याच्या ॥२३॥
				  																	
									  
	 
	मुखें भजन चाललें होतें ।  गणी गण गणांत बोते  ।
	या सांकेतिक भजनातें । जाणण्या कोण समर्थ हो ? ॥२४॥
				  																	
									  
	 
	त्या सूत्ररूप भजनाचा । अर्थ ऎसा वाटतो साचा ।
	गणी या शब्दाचा । अर्थ मोजी हाच असे ॥२५॥
				  																	
									  
	 
	जीवात्मा म्हणजे गण । तो ब्रह्माहून नाहीं भिन्न ।
	हें सुचवावया कारण । गणांत हा शब्द असे ॥२६॥
				  																	
									  
	 
	बोते हा शब्द देखा । अपभ्रंश वाटे निका ।
	बोते हा शब्द ऎका । तेथें असावा निःसंशय ॥२७॥
				  																	
									  
	 
	बाया शब्दें करून । घेतलें पाहिजे मन ।
	तें हें आहे सर्वनाम । शब्दाऎवजीं आलेलें ॥२८॥
				  																	
									  
	 
	म्हणजे मना समजे नित्य । जीव हा ब्रह्मास सत्य ।
	मानूं नको तयाप्रत । निराळा त्या तोचि असे ॥२९॥
				  																	
									  
	 
	 गिणगिण गिणांत बोते  । कोणी  गणी गण गणांत बोते , ।
	ऎशीं आहेत दोन मतें । या भजनाविषयीं शेगांवीं ॥३०॥
				  																	
									  
	 
	त्यासी न आपुलें प्रयोजन । आपणा कथेसी कारण ।
	महाराज निजले येऊन । चौपायांत घोड्याच्या ॥३१॥
				  																	
									  
	 
	वरील भजन मुखानें । चाललें होतें आनंदानें ।
	वाटे या भजनरूप सांखळीनें । घोडा बांधूनीं टाकिला ॥३२॥
				  																	
									  
	 
	गोविंदबुवांच्या अंतरीं । धास्ती होती जबर खरी ।
	म्हणून तो वरच्यावरी । उठून पाहे वारूला ॥३३॥
				  																	
									  
	 
	तो ठाण्यावरी घोडा शांत । ऎसें पडता दृष्टीप्रत ।
	गोविंदबुवांच्या चित्तांत । अति नवल वाटलें ॥३४॥
				  																	
									  
	 
	तों आपुल्या मनीं म्हणे । हें ऎसें झालें कशानें ।
	का कांहीं आजारानें । व्याप्त झाला घोडा हा ॥३५॥
				  																	
									  
	 
	म्हणूनी राहिला शांत । हें न काहीं कळों येत ।
	हा ऎसा आजपर्यंत । नाहीं कधीच स्थिरावला ॥३६॥
				  																	
									  
	 
	हें काय आहे तें पहाया गेलें । तों एक माणूस दिसलें ।
	चोहोंपायांत निजलेले । त्या द्वाड घोड्याच्या ॥३७॥
				  																	
									  
	 
	अति निकट येऊनी । पाहूं लागले निरखुनी ।
	तों दिसले कैवल्यदानी । तेथें गोविंदबुवाला ॥३८॥
				  																	
									  
	 
	ते म्हणाले मनांत । घोडा कां झाला शांत ।
	हें कळलें कारणासहीत । मजलागीं येधवां ॥३९॥
				  																	
									  
	 
	समर्थांच्या सहवासें । घोडा शांत झालासे ।
	जेथें कस्तुरी तेथें नसे । दुर्गंधाला थारा कदा ॥४०॥
				  																	
									  
	 
	समर्थांच्या पायांवरी । गोविंदबुवानें अत्यादरीं ।
	शिर ठेविलें निर्धारीं । अष्टभाव दाटले ॥४१॥
				  																	
									  
	 
	मुखें करूं लागलें स्तवन । आपण खरेच गजानन ।
	विघ्नांचे करितसा कंदन । याचा प्रत्यय आज आला ॥४२॥
				  																	
									  
	 
	माझा घोडा द्वाड अती । सर्वही ज्याला भीती ।
	तेथेंच आलात गुरुमूर्ती । हरण्या त्याचा द्वाडपणा ॥४३॥
				  																	
									  
	 
	ह्या घोड्याच्या अचाट खोडी । चालतां मध्येंच मारी उडी ।
	क्षणक्षणा मागल्या झाडी । हा दुगण्या महाराजा ! ॥४४॥
				  																	
									  
	 
	मी गेलों होतों कंटाळून । म्हणूण बाजारालागून ।
	गेलों विकाया कारण । परी न कोणी घेई या ॥४५॥
				  																	
									  
	 
	फुकटही लागलो द्याया । परी न कोणी तयार घ्याया ।
	त्यावरी आपण केली दया । हें झालें फार बरें ॥४६॥
				  																	
									  
	 
	आम्हां कथेकर्याचें । घोडें पाहिजे गरीब साचें ।
	घरामाजीं धनगराचें । नाहीं वाघ कामाचा ॥४७॥
				  																	
									  
	 
	ऎसा झाला प्रकार । घोडें झाले गरीब फार ।
	जडजीवांचा उध्दार । करण्यास स्वामी अवतरले ॥४८॥
				  																	
									  
	 
	घोड्यास म्हणाले, " आतां गड्या । करूं नकोस खोड्या ।
	त्या तेथेंच रोकड्या । द्याव्या अवघ्या सोडून ॥४९॥
				  																	
									  
	 
	तूं शिवाच्या समोरीं । याचा विचार कांहीं करी ।
	वागत जावें बैलापरी । त्रास न देई कवणातें " ॥५०॥
				  																	
									  
	 
	ऎसें त्यासी बोलून । निघून गेले दयाघन ।
	कृपाकटाक्षें करून । पशूही ज्यानें आकळिला ॥५१॥
				  																	
									  
	 
	असो श्रोते दुसरे दिवशीं । मळ्यांत असतां पुण्यराशी ।
	आले गोविंदबुवा दर्शनासी । घोड्यावरी बैसून ॥५२॥
				  																	
									  
	 
	घोडा गोविंदबुवांचा । शेगांवासी ठाऊक साचा ।
	कोश अवघ्या खोड्यांचा । भीत होते त्यासी जन ॥५३॥
				  																	
									  
	 
	तो मळ्यांत आलेला पाहून । लोक बोलले त्याकारण ।
	गोविंदबुवा ही घेऊन । पीडा कशास येथें आला ॥५४॥
				  																	
									  
	 
	मुलें बायका मळ्यांत । आहेत पहा वावरत ।
	तुमचा घोडा करील घात । सहज लीलेनें कवणाचा ॥५५॥
				  																	
									  
	 
	गोविंदबुवा त्यास वदले । तुमचें म्हणणें मीं ऎकिलें ।
	माझ्या घोड्यास शहाणें केले । काल रात्रीं समर्थांनी ॥५६॥
				  																	
									  
	 
	त्यानें खोड्या दिल्या टाकून । झाला गोगलगाईसमान ।
	आतं भ्यावयाचें कारण । कांहीं न उरलें कोणाशीं ॥५७॥
				  																	
									  
	 
	चिंचेखालीं उभा केला । टाकळीकरांनी घोडा भला ।
	चर्हाटावांचूनी राहिला । उभा तो एक प्रहर ॥५८॥
				  																	
									  
	 
	भाजीपाला कोवळा घांस । मळ्यांत होता विशेष ।
	परी ना लाविलें त्यास । तोंड घोड्यानें एकाही ॥५९॥
				  																	
									  
	 
	पाहा संताची केवढी शक्ति । पशूही आज्ञेंत वागती ।
	पत्र्यांत आरंभिली स्तुती । गोविंदबुवांनीं समर्थांची ॥६०॥
				  																	
									  
	 
	श्लोक ( पृथ्वी वृत्त )
	अचिंत्य जगताप्रती कृति तुझी न कोणा कळे ।
	असो खलहि केवढा तव-कृपें सुमार्गी वळे ॥
				  																	
									  
	 
	उणें पुढति ये तुझ्या खचित रत्नचिंतामणी ।
	शिरीं सतत माझिया वरदहस्त ठेवा झणीं ॥१॥
				  																	
									  
	 
	ऎसी स्तुती करून । गेले गोविंदबुवा निघून ।
	घोड्यास आपल्या घेऊन । टाकळी ग्रामाकारणें ॥६१॥
				  																	
									  
	 
	प्रत्येक दिनीं शेगावीं । यात्रा येई नवी नवी ।
	कांहीं तरी धरून जीवीं । हेतु आपल्या श्रोते हो ॥६२॥
				  																	
									  
	 
	त्या यात्रेकरू मंडळींत । बाळापूरचे दोन गृहस्थ ।
	आले कांहीं धरून हेत । समर्थांच्या दर्शना ॥६३॥
				  																	
									  
	 
	पथीं जातां एकमेकां । बोलूं लागले ऎसें देखा ।
	पुढल्या वारीस गांजा सुका । येऊं आपण घेऊन ॥६४॥
				  																	
									  
	 
	कां कीं या गांजावर । समर्थांचे प्रेम फार ।
	तो आपण आणिला जर । तरी कृपा होईल त्यांची ॥६५॥
				  																	
									  
	 
	लोक आणती बर्फी खवा । आपण गांजा नेऊं बरवा ।
	गांठ धोत्रां बांधून ठेवा । ना तरी विस्मृति होईल ॥६६॥
				  																	
									  
	 
	पुढल्या वारीस दोघेजण । आले दर्शनाकारण ।
	परि गेले विसरोन । गांजा तो आणावया ॥६७॥
				  																	
									  
	 
	शिर ठेवितां पायांवरी । आठवण त्यांना झाली खरी ।
	कीं नाहीं आणिला बरोबरी । गांजा तो आपण ॥६८॥
				  																	
									  
	 
	आतां पुढल्या वारीसी । दुप्पट आणूं गांज्यासी ।
	ऎसें बोलून मानसीं । दर्शन घेऊन गेले हो ॥६९॥
				  																	
									  
	 
	पुढल्या वारीस तेंच झालें । गांजा आणण्याचे विसरले ।
	कर जोडून मात्र बसले । स्मृति नसे गांजाची ॥७०॥
				  																	
									  
	 
	तै स्वामीं म्हणाले भास्करासी । पाहा जगाची रीत कैसी ।
	गांठ मारून धोतरासी । विसरती जिन्नस आणावया ॥७१॥
				  																	
									  
	 
	जातीनें आहेत ब्राह्मण । तेच आपुलें भाषण ।
	करिती आपण होऊन । खोटें पहा सर्वांशीं ॥७२॥
				  																	
									  
	 
	ब्राह्मणांचे भाषण । कदा नसावें अप्रमाण ।
	या तत्त्वालागून । न जाणती चांडाळ ते ॥७३॥
				  																	
									  
	 
	द्विजें निजधर्म सोडिला । आचार विचार सांडिला ।
	ह्यामुळें श्रेष्ठत्वाला । ते मुकले सांप्रत ॥७४॥
				  																	
									  
	 
	बेटे मनीं नवस करिती । आणि हात हालवित येथें येती ।
	अशानें कां पूर्ण होती । त्यांच्या मनींचे मनोरथ ? ॥७५॥
				  																	
									  
	 
	बोलण्यांत पाहिजे मेळ । चित्त असावें निर्मळ ।
	तरीच तो घननीळ । कृपा करितो भास्करा ॥७६॥
				  																	
									  
	 
	हे शब्द त्या दोघांसी । अती लागले मानसीं ।
	पाहूं लागले एकमेकांसी । कुतूहल दृष्टीनें ॥७७॥
				  																	
									  
	 
	पाहा केवढें अगाध ज्ञान । आहे यांचें परिपूर्ण ।
	हा जगत्चक्षु गजानन । सूर्यापरीच असे हो ॥७८॥
				  																	
									  
	 
	आपण नवस केला मनीं । तो जाणिला समर्थांनी ।
	आतां येऊं घेऊनी । चला गांजा गांवांतून ॥७९॥
				  																	
									  
	 
	ऎसा विचार करून उठले । गांवांत जाऊं लागले ।
	गांजा आणावयाला भले । तैं महाराज वदले त्या ॥८०॥
				  																	
									  
	 
	आतां शिळ्या कढीप्रत । कां हा उगा आणितां ऊत ।
	सार नाहीं किमपि यांत । मी न हपापलो गांज्याला ॥८१॥
				  																	
									  
	 
	आतां आपण गांजाप्रत । नका जाऊं पेठेंत ।
	मेळ हमेशा बोलण्यांत । ठेवा तुम्ही आपुल्या ॥८२॥
				  																	
									  
	 
	लबाडाचे न हेतु पुरती । ही खूणगांठ बांधा चित्तीं ।
	तुमचें काम झाल्यावरती । मर्जी असल्या गांजा आणा ॥८३॥
				  																	
									  
	 
	पुढील आठवड्यांत तुमचें काम । होईल जा अत्युत्तम ।
	परी कदा न चुकावा नेम । पांच वार्या येथील करा ॥८४॥
				  																	
									  
	 
	कां कीं हा येथें स्थिर । आहे मृडानीपती कर्पूरगौर ।
	ज्याच्या कृपेनें कुबेर । जगीं झाला धनपती ॥८५॥
				  																	
									  
	 
	जा नमस्कार त्यासी करा । गांजा आणावया न विसरा ।
	परमार्थात खोटें जरा । बोलूं नये मानवांनी ॥८६॥
				  																	
									  
	 
	ऎसा उपदेश ऎकून । महाराजांशीं वंदून ।
	घेतलें शिवाचें दर्शन । आणी गेले बाळापुरा ॥८७॥
				  																	
									  
	 
	पुढील आठवड्यामाजी भले । काम त्यांचें फत्ते झालें ।
	तेही गांजा घेऊन आले । शेगावांत वारीला ॥८८॥
				  																	
									  
	 
	त्या बाळापुरची दुसरी कथा । तुम्ही ऎका श्रोते आतां ।
	बाळकृष्ण नामें होता । बाळापुरांत रामदासी ॥८९॥
				  																	
									  
	 
	कांता त्याची पुतळाबाई । परम भाविक होती पाही ।
	दरवर्षी वारीस जाई । पायीं सज्जनगडातें ॥९०॥
				  																	
									  
	 
	पति-पत्नीचा विचार एक । पौष मासीम निघती देख ।
	ओझ्यासाठीं घोडें एक । घेऊनिया बरोबरी ॥९१॥
				  																	
									  
	 
	कुबडी कंथा दासबोध । सवें हें सामान अति शुध्द ।
	साधुत्वाचा नव्हता मद । तयासी कीं चढलेला ॥९२॥
				  																	
									  
	 
	मार्गी चालतां ग्रामांतरीं । प्रत्यहीं झोळी फिरवी खरी ।
	त्या झोळीच्या भिक्षेवरी । नैवेद्य करी रामाला ॥९३॥
				  																	
									  
	 
	पौष वद्यांत बाळापूर । सोडी नवमीला साचार ।
	असे कांता बरोबर । पुतळाबाई नाम जिचें ॥९४॥
				  																	
									  
	 
	बाळकृष्णबुवा हातीं । चंदनाच्या चिपळ्या असती ।
	पुतळाबाई करी साथी । झांज हातीं घेऊन ॥९५॥
				  																	
									  
	 
	रघुपतीचा नामगजर । करी पंथानें निरंतर ।
	शेगांव खामगांव मेहेकर । देऊळगांवराजा पुढें ॥९६॥
				  																	
									  
	 
	आनंदीस्वामीस जालनापुरीं । वंदुनिया जांब नगरीं ।
	जाय तेथें मात्र करी । तीन दिवस मुक्काम ॥९७॥
				  																	
									  
	 
	कां कीं तें ठिकाण । समर्थांचे जन्मस्थान ।
	पुढें दिवर्यास येऊन । वंदन करी गोदेला ॥९८॥
				  																	
									  
	 
	पुढें बीड आंबेजोगाईचे । मोहोरी बेलेश्वर स्वामीचे ।
	पट्टशिष्य समर्थांचे । डोमगांवीं कल्याण ॥९९॥
				  																	
									  
	 
	नरसिंगपूर पंढरपूर । नातेपोतें शिंगणापूर ।
	वाई आणि सातारा । असे जे गडाच्या पायथ्याशीं ॥१००॥
				  																	
									  
	 
	माघ वद्य प्रतिपदेला । तो येऊन पहुचे भला ।
	श्रीसज्जनगडाला । नवमीच्या त्या उत्सवासी ॥१॥
				  																	
									  
	 
	यथाशक्तिप्रमाणें । ब्राह्मणभोजन करावें त्यानें ।
	श्रीस्वामीसमर्थांकारणें । खरा खराच रामदासी ॥२॥
				  																	
									  
	 
	ऎसे रामदासी आतां । होणें कठीण सर्वथा ।
	दासनवमीचा उत्सव होता । परत जाई त्याच मार्गें ॥३॥
				  																	
									  
	 
	ऐसा क्रम चालला । बहुत दिवस त्याचा भला ।
	साठ वर्षें देहाला । गेलीं त्याच्या उलटुन ॥४॥
				  																	
									  
	 
	माघ वद्य द्वादशीस । सोडून सज्जनगडास ।
	निघावें परत जावयास । त्यानें आपुल्या बाळापुरा ॥५॥
				  																	
									  
	 
	असो वद्य एकादशीसी । बसला समर्थ समाधींपासीं ।
	आले दुःखाश्रु लोचनासी । शब्द न त्यासी बोलवे ॥६॥
				  																	
									  
	 
	हे रामदास स्वामी समर्था ! । हे गुरुराया पुण्यवंता ! ।
	माझें शरीर थकलें आतां । वारी न पायीं होईल ॥७॥
				  																	
									  
	 
	जरी बसून वाहानातें । येऊं सज्जनगडातें ।
	तरी तेंही कठीण देसतें । मजलागीं दयाळा ॥८॥
				  																	
									  
	 
	नेम चालला आजवर । आतां पडूं पाहे अंतर ।
	परमार्थासी शरीर । निकोप आधीं पाहिजे ॥९॥
				  																	
									  
	 
	तरीच सर्व घडे कांहीं । हे रामदासा माझे आई ।
	हें म्हणण्याची जरूर नाहीं । आपण सर्व जाणतसा ॥११०॥
				  																	
									  
	 
	ऐशी प्रार्थना करून । निजला शय्येस जाऊन ।
	तों प्रभातकाळीं पडलें स्वप्न । बाळकृष्णबुवाला ॥११॥
				  																	
									  
	 
	स्व्प्नीं म्हणाले रामदास । ऐसा न होई हताश ।
	नको येऊं येथून खास । या सज्जनगडातें ॥१२॥
				  																	
									  
	 
	माझी कृपा तुझ्यावरी । माझा उत्सव बाळापुरीं ।
	करावा तूं आपल्या घरीं । मी येईन नवमीला ॥१३॥
				  																	
									  
	 
	तुला द्याया दर्शन । हें मानीं प्रमाण वचन ।
	आपल्या शक्तीस पाहून । परमार्थ तो आचरावी ॥१४॥
				  																	
									  
	 
	ऐसें स्वप्न पाहिलें । बाळकृष्ण आनंदले ।
	कांतेसह परत आले । बाळापुरास आपुल्या घरीं ॥१५॥
				  																	
									  
	 
	पुढें श्रोते दुसरे वर्षी । काय झालें माघमासीं ।
	त्या बाळापुरासी । तें आतां अवधारा ॥१६॥
				  																	
									  
	 
	माघ वद्य प्रतिपदेस । समर्थांच्या उत्सवास ।
	आरंभ बाळापुरास । बाळकृष्णांनीं घरीं केला ॥१७॥
				  																	
									  
	 
	दासबोधाचें वाचन । रात्रीस हरिकीर्तन ।
	दोन प्रहरीं ब्राह्मणभोजन । धूपार्ती अस्तमानाला ॥१८॥
				  																	
									  
	 
	बाळकृष्णाच्या मनांत । विचार हाची घोळत ।
	पाहूं कसे येतात । स्वामी समर्थ नवमीसी ॥१९॥
				  																	
									  
	 
	बाळकृष्णाच्या वचनांनी । केली गांवकर्यांनीं ।
	आपापसांत वर्गणी । उत्सवा साह्य करावया ॥१२०॥
				  																	
									  
	 
	ऐसा थात बाळापुरा । नव दिवस झाला खरा ।
	नववे दिवशीं दोन प्रहरा । अघटित आलें घडून ॥२१॥
				  																	
									  
	 
	श्रीगजानन साक्षात्कारी । श्रोते तया बाळापुरीं ।
	उभे राहिले दोन प्रहरीं । नवमी तिथी लक्षून ॥२२॥
				  																	
									  
	 
	बाळकृष्णाच्या द्वारांत । रामाभिषेक चालला आंत ।
	लोक झाले विस्मित । गजाननासी पाहूनिया ॥२३॥
				  																	
									  
	 
	म्हणूं लागले बुवासी । उठा उठा हो वेगेसी ।
	तुमच्या दासनवमीसी । द्वारीं पातलें गजानन ॥२४॥
				  																	
									  
	 
	त्यावरी बुवा म्हणाले । गजानन आले बरें झालें ।
	त्याही संतांचे लागले । पाय माझ्या घरासी ॥२५॥
				  																	
									  
	 
	परी आजच्या दिनीं साची । मी वाट पाहतों समर्थांची ।
	त्या सज्जनगड निवासियाची । आतूर होऊन ये ठायां ॥२६॥
				  																	
									  
	 
	त्यांचा मसी करार आहे । मी नवमीला येईन पाहे ।
	ती वाणी असत्य नोहे । ऐसा माझा भरवंसा ॥२७॥
				  																	
									  
	 
	इकडे स्वामी गजानन । द्वारीं उभे राहून ।
	जय जय रघुवीर म्हणोन । श्लोक बोलुं लागले ॥२८॥
				  																	
									  
	 
	श्लोक –
	अहिल्या शिळा राघवें मुक्त केली ।
	पदीं लागतां दिव्य होऊनि गेली ॥
				  																	
									  
	अशी वाणी ऐकतां उठली । स्वारी बाळकृष्णाची ॥२९॥
	 
	पाहाती जों येऊन द्वारीं । तों गजाननाची नग्न स्वारी ।
				  																	
									  
	आजानुबाहु साजिरी । उभी निजानंदामध्यें ॥१३०॥
	 
	करण्या गेला नमस्कार । तों रामदास दिसले साचार ।
				  																	
									  
	हातीं कुबडी जटाभार । रुळत होता पाठीवरी ॥३१॥
	 
	भालीं त्रिपुंड उभा साचा । होता गोपीचंदनाचा ।
				  																	
									  
	नेसलेल्या लंगोटीचा । रंग होता हिरमुजी ॥३२॥
	 
	ऎसें रूप पाहिलें । बाळकृष्णा भरतें आलें ।
				  																	
									  
	प्रेमाचें तें श्रोते भले । नयनी संचले आनंदाश्रु ॥३३॥
	 
	तों सवेंच दिसती गजानन । त्याच्या नेत्रांकारण ।
				  																	
									  
	कुबडी लंगोटी कांहींच न । त्रिपुंड शिरींचा जटाभार ॥३४॥
	 
	पुनः त्यानें हताश व्हावें । तों रामदास स्वामी दिसावे ।
				  																	
									  
	पुनः जों निरखून पाहावें । तों मागुती गजानन ॥३५॥
	 
	ऐसी स्थिती झाली खरी । सिनेमाच्या खेळापरी ।
				  																	
									  
	घोटाळलासे अंतरी । कोडें कांहींच उमगेना ॥३६॥
	 
	मग म्हणाले गजानन । रामदासासी प्रेमें करून ।
				  																	
									  
	नको गांगरूं देऊं मन । तुझा समर्थ मीच असे ॥३७॥
	 
	मागें बापा गडावरी । माझीच वस्ती होती खरी ।
				  																	
									  
	आतां शेगांवाभीतरीं । राहिलों येऊन मळ्यांत ॥३८॥
	 
	तुला सज्जनगडीं दिलें वचन । कीं दासनवमीस येईन ।
				  																	
									  
	मी बाळापुरालागून । ह्यांचे स्मरण आहे का ? ॥३९॥
	 
	त्या वचनाची पूर्तता । करण्यास येथें आलों आतां ।
				  																	
									  
	दे सोडोन अवघी चिंता । मीच आहे रामदास ॥१४०॥
	 
	शरीररूपी वस्त्रास । तूं किंमत देतोस ।
				  																	
									  
	आणि आत्म्याला विसरतोस । याला काय म्हणावें ? ॥४१॥
	 
	श्लोक आहे गीतेठायीं । " वासांसि जीर्णानि " तो पाही ।
				  																	
									  
	ऎसी मुळीं ना भ्रमिष्ट होई । चाल पाटीं बसवी मला ॥४२॥
	 
	बाळकृष्णाचा धरून हात । गजानन आले घरांत ।
				  																	
									  
	एका मोठ्या पाटीं स्थित । स्वामी गजानन जाहले ॥४३॥
	 
	बाळापुरीं पुकार झाली । गजानन आल्याची ती भली ।
				  																	
									  
	मंडळीं धांवू लागलीं । दर्शन घ्याया पायांचे ॥४४॥
	 
	रामदासी अवघ्या दिवसभर । करीत राहिला विचार ।
				  																	
									  
	शेवटीं रात्र होतां तीन प्रहर । स्वप्न पडलें बाळकृष्णा ॥४५॥
	 
	अरे गजानन माझीच मूर्ति । हल्लीं तुमच्या वर्हाडप्रांतीं ।
				  																	
									  
	संशय मुळीं ना धरी चित्तीं । तो धरितां बुडशील ॥४६॥
	 
	मी तोच समजून । करी गजाननाचें पूजन ।
				  																	
									  
	गीतेचें हें आहे वचन । " संशयात्मा विनश्यति "॥४७॥
	 
	ऐसें स्वप्न पडल्यावरी । बाळकृष्ण तोषला भारी ।
				  																	
									  
	मस्तक ठेविलें अत्यादरीं । गजाननाचें पायांवर ॥४८॥
	 
	महाराज आपुली लीला । मी ना समर्थ जाणण्याला ।
				  																	
									  
	तो घोटाळा उकलिला । तुम्ही स्वप्न देऊन ॥४९॥
	 
	नवमी माझी सांग झाली । न्यूनता न कांहीं उरली ।
				  																	
									  
	अर्भकावरी कृपा केली । तेणें धन्य झालों मी ॥१५०॥
	 
	आतां कांहीं दिवस । राहा या बाळपुरास ।
				  																	
									  
	हीच आहे मनीं आस । ती पूर्ण करा हो ॥५१॥
	 
	महाराज म्हणाले त्यावर । ऐक माझा विचार ।
	कांहीं दिवस गेल्यावर । येईन मी बाळापुरा ॥५२॥
				  																	
									  
	 
	भोजनोत्तर निघून गेले । स्वामी शेगांवासी भले ।
	रस्त्यानें न कोणा दिसले । क्षणांत पोंचलें शेगांवीं ॥५३॥
				  																	
									  
	 
	स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ ।
	सुखद होवो भाविकांप्रत । हेंचि इच्छी दासगणू ॥१५४॥
				  																	
									  
	 
	शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥