॥ श्रीगणेशाय नमः ॥
	 
	हे सर्वसाक्षी सर्वेश्वरा । नीलकंठा गंगाधरा ।
	महाकाल त्र्यबंकेश्वरा । श्रीओंकारा पाव मशी ॥१॥
				  													
						
																							
									  
	 
	तूं आणि रुक्मिणीशा । एक तत्त्व आहां खास ।
	तोय वारी म्हटल्यास । काय जलीं भेद होतो ? ॥२॥
				  				  
	 
	तैसी तुमची आहे स्थिती । तंतोतंत जगत्पति ।
	जैसी ज्याची मानेल मति । तैसा तो तुज बाहत ॥३॥
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	अनन्यभावें बाहतां । तूं पावसी आपुल्या भक्तां ।
	माता न धरी निष्ठुरता । आपल्या वत्साविषयीं कधीं ॥४॥
				  																								
											
									  
	 
	मी तुझें अजाण लेंकरुं । नको माया पाताळ करुं ।
	तूं साक्षात् कल्पतरु । इच्छा पूर्ण करी हरा ॥५॥
				  																	
									  
	 
	बंकटलालाचे घरांत । असतां स्वामी समर्थ ।
	प्रकार एक अघटीत । आला ऐसा घडोनी ॥६॥
	 
				  																	
									  
	वैशाख शुद्ध पक्षासी । अक्षयतृतीयेचिया दिवशीं ।
	पितरार्थ उदककुंभासी । देती श्राद्ध करोनिया ॥७॥
				  																	
									  
	 
	अक्षयतृतीयेचा दिवस । वर्हाडांतील लोकांस ।
	विशेष वाटे प्रत्येकास । मोठा सण मानिती हा ॥८॥
				  																	
									  
	 
	त्या दिवशीं काय झालें । तें पाहिजे श्रवण केलें ।
	महाराज पोरांत बैसले । कौतुकें लीला करावया ॥९॥
				  																	
									  
	 
	बालकां म्हणती गजानन । चिलीम द्यावी भरुन ।
	तंबाखूची मजकारण । विस्तव वरी ठेवोनिया ॥१०॥
				  																	
									  
	 
	सकाळपून ऐसाच बसलों । चिलीम मुळीं नाहीं प्यालों ।
	त्यामुळें हैराण झालों । भरा चिलीम मुलांनो ! ॥११॥
				  																	
									  
	 
	ऐसी आज्ञा ऐकतां भली । पोरें अवघीं आनंदलीं ।
	चिलीम भरुं लागलीं । तंबाखू आंत घालुनिया ॥१२॥
				  																	
									  
	 
	विस्तवाचा तपास केला । तो न सदनीं मिळाला ।
	कां कीं चूल पेटण्याला । अवकाश होता विबुध हो ॥१३॥
				  																	
									  
	 
	पोरें चित्तीं विचार करिती । आपापसांत निश्चिती ।
	कशी करावी यासी युक्ति । विस्तव पाहिजे चिलिमीला ॥१४॥
				  																	
									  
	 
	मुलें पाहून चिंतातुर । बंकट करी मधुरोत्तर ।
	अरे जानकीराम सोनार । आहे वेटाळीं * आपुल्या ॥१५॥
				  																	
									  
	 
	त्याच्याकडे तुम्ही जावें । विस्तवासी मागून घ्यावें ।
	दुकान तें चालण्या बरवें । विस्तव लागतो आधीं त्या ॥१६॥
				  																	
									  
	 
	आधीं पेटते बागेसरी । त्याच्यापुढें दुकानदारी ।
	ही सोनाराची रीत खरी । आहे ठावें कीं तुम्हांला ॥१७॥
				  																	
									  
	 
	पोरांनीं तें ऐकिलें । जानकीरामाकडे आले ।
	विस्तव मागूं लागले । समर्थांच्या चिलमीस ॥१८॥
				  																	
									  
	 
	जानकीराम रागावला । लेंकरासी बोलता झाला ।
	अक्षयतृतियेच्या सणाला । दे न कोणा विस्तव मी ॥१९॥
				  																	
									  
	 
	पोरें म्हणालीं त्यावर । जोडोनी आपले दोन्ही कर ।
	नको करुं हा अविचार । विस्तव पाहिजे समर्थाला ॥२०॥
				  																	
									  
	 
	महाराज श्रीगजानन । देवाचेही देव जाण ।
	त्यांच्या चिलमीकारण । विस्तव हा जातसे ॥२१॥
				  																	
									  
	 
	साधुप्रती कांहीं देतां । तेथें अशुभाचि नसे वार्ता ।
	उगीच व्यावहारिक कथा । सांगत आम्हां बसूं नको ॥२२॥
				  																	
									  
	 
	आम्ही आहों मुलें लहान । तूं मोठा आमच्याहून ।
	ऐसें साच असून । हें न कैसें कळे तुला ? ॥२३॥
				  																	
									  
	 
	विस्तव तूं देशील जरी । भाग्य येईल तुझ्या घरीं ।
	चिलीम पिऊन तृप्त जरी । झाला गजानन महाराज ॥२४॥
				  																	
									  
	 
	तें सोनारें न ऐकिलें । अद्वातद्वा भाषण केलें ।
	ज्याचें जवळ मरण आलें । त्याचे पाय खोलाकडे ॥२५॥
				  																	
									  
	 
	सोनार म्हणे बालकांसी । गजानन कशाचा पुण्यराशी ? ।
	त्या चिलमीबहाद्दरासी । साधु म्हणून सांगूं नका ! ॥२६॥
				  																	
									  
	 
	गांजा तमाखू पीत बसतो । नग्न गांवांत हिंडतो ।
	वेडयापरी चाळे करितो । पितो पाणी गटाराचें ॥२७॥
				  																	
									  
	 
	जात गोत नाहीं त्याला । ऐशा वेडयापिशाला ।
	मी साधु मानण्याला । नाहीं मुळीं तयार ॥२८॥
				  																	
									  
	 
	बंकटलाल खुळावला । नादीं त्याच्या लागला ।
	नाहीं देत विस्तवाला । मी तयाचे चिलमीसी ॥२९॥
				  																	
									  
	 
	तो आहे ना साक्षात्कारी । मग विस्तव कशाला पाहिजे तरी ? ।
	आपुल्या कर्तृत्वें कां न करी । विस्तवातें निर्माण ? ॥३०॥
				  																	
									  
	 
	साधु नाथ जालंदर । पीत होते चिलीम फार ।
	परी विस्तवासाठीं घरघर । ना हिंडले कदा ते ॥३१॥
				  																	
									  
	 
	जा जा उभे न राहा येथ । विस्तव ना मिळे तुम्हांप्रत ।
	नाहीं मला किंमत । त्या तुमच्या पिशाची ॥३२॥
				  																	
									  
	 
	पोरें विन्मुख परत आलीं । महाराजांसी निवेदिली ।
	हकीकत जी कां झाली । सोनाराचे दुकानांत ॥३३॥
				  																	
									  
	 
	ती ऐकतां हास्यवदन । करिते झाले दयाघन ।
	नाहीं आपणां प्रयोजन । मुळींच त्याच्या विस्तवाचें ॥३४॥
				  																	
									  
	 
	ऐसें म्हणोन घेते झाले । चिलीम आपुल्या हातीं भले ।
	बंकटलालासी बोलले । काडी एक वरती धरी ॥३५॥
				  																	
									  
	 
	बंकट म्हणे गुरुराया । थोडें थांबा परम सदया ।
	विस्तव देतों करुनिया । काडी घासून आतां मी ॥३६॥
				  																	
									  
	 
	काडी घासल्यावांचूनी । कदां न प्रगटे अग्नि ।
	म्हणून केली विनवणी । ती मनास आणा समर्था ॥३७॥
				  																	
									  
	 
	महाराज बोलले त्यावर । उगी न करी चरचर ।
	नुसती काडी धरणें वर । तिला मुळींच घासूं नको ॥३८॥
				  																	
									  
	 
	बंकटलालें तैसें केलें । नुसत्या एका काडीस धरिलें ।
	चिलमीचिया वरती भले । समर्थ-आज्ञा म्हणून ॥३९॥
				  																	
									  
	 
	तों काय झाला प्रकार । ऐका तुम्ही श्रोते चतुर ।
	प्रगट झाला वैश्वानर । काडी नुसती धरतां वरी ॥४०॥
				  																	
									  
	 
	काडीप्रती विस्तवाचा । अंशही नव्हता साचा ।
	हा प्रभाव शक्तीचा । महाराजांच्या लोकोत्तर ॥४१॥
				  																	
									  
	 
	काडी तैसीच राहिली । चिलीम तीही पेटली ।
	कशाचीही नाहीं उरली । जरुर खर्या साधूला ॥४२॥
				  																	
									  
	 
	याचें नांव साधुत्व । उगीच नव्हतें थोतांड मत ।
	आतां सोनाराचे घरांत । काय झालें तें ऐका ॥४३॥
				  																	
									  
	 
	या अक्षयतृतियेला । मान विशेष चिंचवण्याला ।
	जेवीं वर्षप्रतिपदेला । महत्त्व निंब फुलांचें ॥४४॥
				  																	
									  
	 
	असो भोजना बैसली पंगत । चिंचवणें वाढलें द्रोणांत ।
	तों प्रकार ऐसा अघटीत । घडून आला तो ऐका ॥४५॥
				  																	
									  
	 
	त्या चिंचवण्यामाझारीं । अळ्या दिसल्या नानापरी ।
	बुजबुजाट झाला भारी । किळस वाटली सर्वांला ॥४६॥
				  																	
									  
	 
	लोक उठले पात्रांवरुन । अवघ्या अन्नातें टाकून ।
	सोनार बसला अधोवदन । कारण कांहीं उमजेना ॥४७॥
				  																	
									  
	 
	चिंचवण्याच्या संगें भलें । अवघें अन्न वायां गेलें ।
	मग त्या कोडें उमगलें । ऐसें व्हाया मीच कारण ॥४८॥
				  																	
									  
	 
	मी न साधूंसी विस्तव दिला । त्याचा प्रत्यय तात्काळ आला ।
	गजाननाची अगाध लीला । मीं न खचित जाणिली ॥४९॥
				  																	
									  
	 
	गजानन जान्हवी नीर । मीं त्या मानिलें थिल्लर ।
	गजानन राजराजेश्वर । मीं त्या भिकारी मानिलें ॥५०॥
				  																	
									  
	 
	त्रिकालज्ञ गजानन । मीं त्या मानिलें वेडा पूर्ण ।
	कल्पतरुकारण । मीं बाभळ मानिली ॥५१॥
				  																	
									  
	 
	गजानन हा चिंतामणी । मीं लेखिली गार जाणी ।
	गजानन हा कैवल्यदानी । मी ढोंगी मानिला हो ॥५२॥
				  																	
									  
	 
	हाय हाय रे दुर्दैवा । त्वां कैसा साधिला दावा ।
	माझ्या हातून संतसेवा । होवो ना तूं दिलीस ॥५३॥
				  																	
									  
	 
	मसी असो हा धिक्कार । मी भारभूत साचार ।
	जन्म पावलों भूमीवर । द्वय पायांचा पशु मी ॥५४॥
				  																	
									  
	 
	आज माझ्या भाग्यकाळीं । बुद्धि कशी चळती झालि ।
	सुयोगाचि दवडिली । वेळ आलेली म्यां करें ॥५५॥
				  																	
									  
	 
	कांहीं असो आतां जाऊं । समर्थांचे पाय पाहूं ।
	पदीं त्यांच्या अनन्य होऊं । क्षमा मंतूची मागावया ॥५६॥
				  																	
									  
	 
	ऐसा विचार करुनी । सवें घेऊन चिंचवणी ।
	बंकटलालाच्या सदनीं । आला हकीकत सांगावया ॥५७॥
				  																	
									  
	 
	अहो शेटजी बंकटलाला । आज माझा घात झाला ।
	पाहा या चिंचवण्याला । आंत किडे पडले बहु ॥५८॥
				  																	
									  
	 
	माणसें उठलीं उपोषित । तेणें झाला श्राद्धघात ।
	हें ऐसें व्हावया कृत्य । माझा मीच कारण असे ॥५९॥
				  																	
									  
	 
	आज सकाळीं चिलिमीला । मीं नाहीं विस्तव दिला ।
	पोरें मागत असतां मला । समर्थांच्या चिलिमीस्तव ॥६०॥
				  																	
									  
	 
	त्याचेंच हें आहे फळ । चिंचवणी नासलें सकळ ।
	तें ऐकून बंकटलाल । बोलूं लागला येणें रितीं ॥६१॥
				  																	
									  
	 
	तुम्हीं न चिंचोके पाहिले । ते असतील किडलेले ।
	म्हणून हे नासते झाले । तुमचें चिंचवणी वाटे मला ॥६२॥
				  																	
									  
	 
	सोनार म्हणे ऐसी शंका । शेटजी तुम्ही घेऊं नका ।
	नवी चिंच होती देखा । मग चिंचोके किडके कसे ? ॥६३॥
				  																	
									  
	 
	जी मीं चिंच फोडिली । तिचीं टरफलें अजून पडलीं ।
	चिंचोक्यांची रास झाली । मर्जी असल्या पाहा चला ॥६४॥
				  																	
									  
	 
	आतां इतुकीच विनंती । आहे शेटजी तुम्हांप्रती ।
	मला नेऊन पायांवरतीं । घाला शीघ्र समर्थांच्या ॥६५॥
				  																	
									  
	 
	क्षमा मंतूची मागेन । अनन्यभावें करुन ।
	साधु दयेचे परिपूर्ण । सागर मूळचेच आहेत कीं ॥६६॥
				  																	
									  
	 
	समर्थांपुढें भीत भीत । जानकीराम गेला त्वरित ।
	घातलें त्यानें दंडवत । अष्टांगेंसी समर्था ॥६७॥
				  																	
									  
	 
	आणि म्हणाला दयाघना ! । तुला येवो माझी करुणा ।
	मीं अपराध केले नाना । त्यांची क्षमा करावी ॥६८॥
				  																	
									  
	 
	तूं साक्षात् उमानाथ । नांदसी या शेगांवांत ।
	ज्यांची होती मजला भ्रांत । ती त्वां आज निवटीली ॥६९॥
				  																	
									  
	 
	माझे अपराधरुपीं अवघें तृण । जाळी कृपाकृशानें * करुन ।
	समर्था आजपासोन । मी न टवाळी तुझी करी ॥७०॥
				  																	
									  
	 
	जी शिक्षा आज केली । तेवढीच मजसी पुरे झाली ।
	तूं अनाथांचा आहेस वाली । आतां अंत पाहूं नको ॥७१॥
				  																	
									  
	 
	महाराज बोलले त्यावर । खोटें न सांगे तिळभर ।
	तुझें चिंचवणी आहे मधुर । किडे न पडले त्यामध्यें ॥७२॥
				  																	
									  
	 
	तें ऐकतां अवघ्यांनीं । पाहिलें तें चिंचवणी ।
	पहिला प्रकार मावळोनी । गेला होता तेधवां ॥७३॥
				  																	
									  
	 
	अवघ्यांप्रती आश्चर्य झालें । समर्थांचें महत्त्व कळलें ।
	हां हां म्हणतां पसरलें । वृत्त हें त्या गांवामध्यें ॥७४॥
				  																	
									  
	 
	ज्यांच्या त्यांच्या तोंडीं मात । हीच निघूं लागली सत्य ।
	कस्तुरीचा नाहीं येत । वास झांकाया कवणातें ॥७५॥
				  																	
									  
	 
	चंदुमुकीन नांवाचा । गृहस्थ एक शेगांवाचा ।
	निःसीम भक्त समर्थांचा । त्याची कथा ऐका ही ॥७६॥
				  																	
									  
	 
	श्रोते ज्येष्ठ मासांत । सभोंवार बसले भक्त ।
	अति आदरें जोडोन हात । दृष्टि ठेवून पायावरी ॥७७॥
				  																	
									  
	 
	कोणी आंबे कापिती । कोणी फोडी हातांत देती ।
	कोणी पंख्यानें घालिती । वारा समर्थांकारणें ॥७८॥
				  																	
									  
	 
	कोणी वांटिती खडीसाखर । कोणी गळ्यांत घालिती हार ।
	कोणी चंदन थंडगार । लाविती अंगीं साधूच्या ॥७९॥
				  																	
									  
	 
	तयीं महाराज म्हणाले चंदूला । हे आंबे नकोत मला ।
	दोन कान्होले उतरंडीला । आहेत तुझ्या ते आण जा ॥८०॥
				  																	
									  
	 
	चंदू बोले कर जोडून । आतां कान्होले कोठून ? ।
	इच्छा असल्या तळून । ताजे आणितों गुरुराया ॥८१॥
				  																	
									  
	 
	तईं महाराज वदले वाचें । नाहीं कारण ताज्याचें ।
	पाहिजेत तुझ्या उतरंडीचे । कान्हवले मज खावया ॥८२॥
				  																	
									  
	 
	जा वेळ करुं नको । उगीच सबबी सांगूं नको ।
	गुरुपाशीं बोलूं नको । खोटें वेडया यत्किंचित् ॥८३॥
				  																	
									  
	 
	त्या मुकिनचंदूप्रती । लोक आघे बोलती ।
	जा ये पाहून शीघ्रगती । खोटी न होय संतवाणी ॥८४॥
				  																	
									  
	 
	चंदू घराप्रती गेला । कांतेस पुसूं लागला ।
	दोन कान्हवले उतरंडीला । आहेत काय रंभोरु ? ॥८५॥
				  																	
									  
	 
	तैं बोले अंगना । होऊन गेला एक महिना ।
	आतां कान्हवले आपुल्या सदना । मिळतील कशाचे ? ॥८६॥
				  																	
									  
	 
	अक्षयतृतीया दिवशीं भले । कान्हवले मीं पतिराया केले ।
	ते न आतां राहिले । संपून गेले त्याच दिनीं ॥८७॥
				  																	
									  
	 
	मर्जी असल्या नवे करितें । समर्थास्तव तळून देतें ।
	ही पहा मी ठेवितें । कढई नाथा चुलीवर ॥८८॥
				  																	
									  
	 
	तुम्ही थांबा क्षणभर । सामान अवघें तयार ।
	नको पाहाण्या बाजार । कान्हवल्याच्या साहित्यासी ॥८९॥
				  																	
									  
	 
	चंदू बोले त्यावरी । ताजे नकोत सुंदरी ।
	जे तूं उतरंडी माझारीं । दोन ठेविले तेच दे ॥९०॥
				  																	
									  
	 
	समर्थांनीं ऐसेंच कथिलें । तेंच मी तुज निवेदिलें ।
	आठवण करुन चांगलें । पाहा कांहीं येधवां ॥९१॥
				  																	
									  
	 
	ऐसे ऐकतां पतिवचन । कांता गेली घोटाळून ।
	करुं लागली शोधन । कान्हवल्याचे चित्तांतरीं ॥९२॥
				  																	
									  
	 
	कान्हवल्यांचा शोध करितां । आठवण झाली तत्त्वतां ।
	उघड म्हणे थांबा नाथा । सत्य गिरा समर्थांची ॥९३॥
				  																	
									  
	 
	दोन कान्हवले होते उरले । ते मी उतरंडीस ठेविले ।
	त्यांचें स्मरण नाहीं उरलें । सगळ्या महिन्यांत मजलागीं ॥९४॥
				  																	
									  
	 
	त्यास महिना होऊन गेला । असेल बुरसा वरी आला ।
	ते खाण्याच्या उपयोगाला । राहिले नसतील अणुमात्र ॥९५॥
				  																	
									  
	 
	ऐसें बोलून तात्काळ उठली । उतरंड सर्व धांडोळली ।
	कान्हवले ते ठेवलेली । कळशी होती खापराची ॥९६॥
				  																	
									  
	 
	आंत जों पाहिलें न्याहाळून । तों दृष्टी पडले तिच्या दोन ।
	कान्हवले जे सुकोन । गेले होते थोडके ॥९७॥
				  																	
									  
	 
	बुरसा मुळींच नाहीं आला । श्रोते त्या कान्हवल्याला ।
	बट्टा संतवाणीला । नाहीं लागला कधीं जगीं ॥९८॥
				  																	
									  
	 
	कान्हवल्यातें पाहोन । उभयतांचें हर्षलें मन ।
	धन्य साधु गजानन । महा समर्थ सिद्धयोगी ॥९९॥
				  																	
									  
	 
	चंदू कान्हवले घेऊन आला । समर्थांसी अर्पिता झाला ।
	लोक करती आश्चर्याला । त्याच्या कृतीतें पाहून ॥१००॥
				  																	
									  
	 
	लोक म्हणती गजानन । खचित असती त्रिकालज्ञ ।
	भूत भविष्य वर्तमान । यांसी अवघे कळतसे ॥१॥
				  																	
									  
	 
	चंदूच्या त्या कान्हवल्यांसी । सेविते झाले पुण्यराशी ।
	राम शबरीच्या बोरांसी । जेवीं झाला भक्षिता ॥२॥
				  																	
									  
	 
	शेगांवच्या दक्षिणेसी । चिंचोली गांव परियेसी ।
	तेथील एक रहिवासी । माधव नामें विप्र होता ॥३॥
				  																	
									  
	 
	वय ज्याचें साठावर । अवयव झाले क्षीण फार ।
	तरुणपणीं संसार । हेंच होतें ब्रह्म ज्याचें ॥४॥
				  																	
									  
	 
	प्रारब्धाच्या पुढारी । कोण जातो भूमिवरी ? ।
	ब्रह्मदेवें जीं कां खरीं । लिहिलीं अक्षरें तेंच होय ॥५॥
				  																	
									  
	 
	माधवासी न कोणी उरले । कांतापुत्र मरुन गेले ।
	म्हणून विरक्त जाहलें । मन तयाचें संसारीं ॥६॥
				  																	
									  
	 
	जी का होती चीजवस्त । ती अवघी केली फस्त ।
	म्हणे आतां माझी गत । होईल कैशी देवदेवा ? ॥७॥
				  																	
									  
	 
	म्यां हमाधुमीचा संसार केला । तो आतां अवघा निमाला ।
	आठविलें कधीं नाहीं तुला । एक क्षणही दीनबंधो ! ॥८॥
				  																	
									  
	 
	आतां माझा वाली कोण ? । दीनदयाळा तुजवांचून ।
	माझें हें अरण्यरोदन । तुजविण देवा कोण ऐके ? ॥९॥
				  																	
									  
	 
	ऐसा अनुताप धरुन पोटीं । शेगांवीं आला शेवटीं ।
	गजाननाच्या द्वारवंटीं । हट्ट धरुन बैसला ॥११०॥
				  																	
									  
	 
	आरंभिलें उपोषण । अन्नपाण्यातें त्यागून ।
	वदनीं वदे नारायण । खंड न पडे तयाला ॥११॥
				  																	
									  
	 
	ऐशापरी एक गेला । दिवस परी नाहीं उठला ।
	तईं महाराज वदले तयाला । हें करणें उचित नसे ॥१२॥
				  																	
									  
	 
	हेंच हरीचें नामस्मरण । कां न केलें मागें जाण ।
	प्राण देहातें सोडून । जातां वैद्य बोलाविसी ! ॥१३॥
				  																	
									  
	 
	तरुणपणीं ब्रह्मवारी । म्हातारपणीं करिसी नारी ।
	अरे वेळ गेल्यावरी । नाहीं उपयोग साधनाचा ॥१४॥
				  																	
									  
	 
	जें करणें तें वेळेवर । करावें कीं साचार ।
	घर एकदां पेटल्यावर । कूप खणणें निरर्थक ! ॥१५॥
				  																	
									  
	 
	ज्या कन्यापुत्रांसाठीं । तूं केलीस आटाआटी ।
	ते अवघे गेले शेवटीं । टाकोनिया तुजलागीं ॥१६॥
				  																	
									  
	 
	अशाश्वताचें पोषण । केलें शाश्वता विसरुन ।
	त्या कर्माचीं तुजलागून । फळें भोगणें भाग असे ॥१७॥
				  																	
									  
	 
	तीं फळें भोगिल्याविना । सुटका तुझी होईना ।
	दे हा टाकून हट्टीपणा । विवेक कांहीं करी मनीं ॥१८॥
				  																	
									  
	 
	तें न माधवें ऐकिलें । हट्टासि ना सोडिलें ।
	यत्न लोकांचे वायां गेले । त्यासी भोजन घालण्याचे ॥१९॥
				  																	
									  
	 
	शेगांवचा कुलकर्णी । करुं लागला विनवणी ।
	भोजनास चला सदनीं । अन्नाविण राहूं नका ॥१२०॥
				  																	
									  
	 
	तेंही म्हणणें माधवाला । नाहीं पटलें तसाच बसला ।
	समर्थांच्या सान्निध्याला । नाम घेत हरीचें ॥२१॥
				  																	
									  
	 
	रात्र झाली दोन प्रहर । तमें आक्रमिलें अंबर ।
	निशीचा तो शब्द किर्र । होऊं लागला वरच्यावरी ॥२२॥
				  																	
									  
	 
	आसपास कोणी नाहीं । ऐसें पाहून केलें कांहीं ।
	कौतुक तें लवलाही । स्वामी गजाननांनीं ॥२३॥
				  																	
									  
	 
	रुप धरिलें भयंकर । दुसरा यमाजी भास्कर ।
	आ पसरुन माधवावर । धांवून आले भक्षावया ॥२४॥
				  																	
									  
	 
	तेणें माधव पळाला । घेऊन आपला जीव भला ।
	धडकी भरली चित्ताला । छाती उडे धडधड ॥२५॥
	 
				  																	
									  
	बुडबुडा आला तोंडासी । शब्द फुटेना वाचेसी ।
	ऐशा पाहोन स्थितीसी । समर्थें धरिलें सौम्य रुप ॥२६॥
				  																	
									  
	 
	आणि बोलले गर्जोन । हेंच कां तुझें धीटपण ।
	तूं काळाचें भक्ष्य जाण । असाच खाईल काळ तुला ॥२७॥
				  																	
									  
	 
	त्याची चुणूक दाखविली । पुढची स्थिति जाणविली ।
	तेथें पळाया नाहीं उरली । यमलोकांत जागा तुला ॥२८॥
				  																	
									  
	 
	माधव ऐसें ऐकतां । झाला विनयें बोलतां ।
	यमलोकाची नको वार्ता । तेवढी माझी टाळा हो ॥२९॥
				  																	
									  
	 
	नको नको हें जीवित । द्या धाडून वैकुंठांत ।
	हीच विनंति आपणांप्रत । महाराज माझी शेवटची ॥१३०॥
				  																	
									  
	 
	यमलोकीं जें दिसणार होतें । तें तुम्हीं दाविलें येथें ।
	आतां या लेंकरातें । यमलोकीं धाडूं नका ॥३१॥
				  																	
									  
	 
	माझ्या पातकाच्या राशी । आहेत जरी बहुवशी ।
	परी त्या जाळणें तुम्हांसी । नाहीं मुळीं अशक्य ॥३२॥
				  																	
									  
	 
	कांहीं सुकृत पदरीं होतें । म्हणून पाहिलें तुम्हांतें ।
	संतभेटी ज्याला होते । यमलोक ना तयासी ॥३३॥
				  																	
									  
	 
	ऐसें ऐकतां भाषण । समर्थें केलें हास्यवदन ।
	महापतीता पावन । साधूच एक करिती कीं ॥३४॥
				  																	
									  
	 
	श्रीमन्नारायण नारायण । ऐसेंच माधवा करी भजन ।
	जवळ आलें तुझें मरण । आतां गाफील राहूं नको ॥३५॥
				  																	
									  
	 
	किंवा अजून वांचण्याची । आस आहे तुला साची ।
	ती असल्यास आयुष्याची । वाढ तुझ्या करितों मी ॥३६॥
				  																	
									  
	 
	माधव म्हणे गुरुराया । नको मला आयुष्य सदया ।
	ओखटी ही प्रपंचमाया । त्यांत पुन्हां गोवूं नको ॥३७॥
				  																	
									  
	 
	तथास्तु ऐसें महाराज वदले । तूं जें मागसी तें मीं दिलें ।
	आतां तुला नाहीं उरलें । जन्मास येणें भूमीवर ॥३८॥
				  																	
									  
	 
	ऐशा रीतीं दोघांचा । संवाद गुप्त स्वरुपाचा ।
	झाला त्या वर्णण्या वाचा । नाहीं माझी समर्थ ॥३९॥
				  																	
									  
	 
	इहलोकीचें देहभान । माधवाचें निमालें जाण ।
	कित्येक बोलूं लागले जन । उपवासें फिरलें मस्तक ॥१४०॥
				  																	
									  
	 
	म्हणून वेडेचार करी । जनकल्पना नानापरी ।
	उठत्या झाल्या त्या अवसरीं । त्या किती म्हणून वर्णाव्या ? ॥४१॥
				  																	
									  
	 
	असो माधवाचें देहावसान । समर्थासन्निध झालें जाण ।
	चुकलें त्याचें जन्ममरण । गजाननाच्या कृपेनें ॥४२॥
				  																	
									  
	 
	असो एक्या समयीं भली । समर्थांसी इच्छा झाली ।
	ती त्यांनीं निवेदिली । आपुल्या शिष्यवर्गातें ॥४३॥
				  																	
									  
	 
	वैदिक ब्राह्मण बोलवा । मंत्रजागर येथें करवा ।
	वेदश्रवणें देवदेवा । आनंद होतो अतिशय ॥४४॥
				  																	
									  
	 
	पन्हें पेढे बरफी खवा । भिजल्या डाळीस मीठ लावा ।
	एकेक रुपया तो द्यावा । घनपाठी ब्राह्मणातें ॥४५॥
				  																	
									  
	 
	ऐसें भाषण ऐकिलें । शिष्य विनवूं लागले ।
	ऐसे वैदिक नाहीं उरले । या आपुल्या शेगांवीं ॥४६॥
				  																	
									  
	 
	सांगाल तो करुं खर्च । परी अडचण आहे हीच ।
	ब्राह्मण मिळविण्याचि साच । आमचा उपाय यातें नसे ॥४७॥
				  																	
									  
	 
	महाराज म्हणाले त्यावरी । करा उद्यां तयारी ।
	ब्राह्मण धाडील श्रीहरी । तुमच्या वसंतपूजेला ॥४८॥
				  																	
									  
	 
	मग काय विचारितां । अवघे हर्षले तत्त्वतां ।
	झाली तयारी हां हां म्हणतां । रुपये शंभर झाले जमा ॥४९॥
				  																	
									  
	 
	सामान सर्व आणिलें । चंदनाचें उटणें केलें ।
	आंत केशर कालविलें । तैसाच आणखी कापुर ॥१५०॥
				  																	
									  
	 
	दोन प्रहरचे समयाला । ब्राह्मण आले शेगांवाला ।
	जे पदक्रम जटेला । जाणत होते विबुध हो ! ॥५१॥
				  																	
									  
	 
	थाटांत वसंतपूजा झाली । ब्राह्मण मंडली आनंदली ।
	दक्षिणा घेऊनी गेली । अन्य ग्रामाकारणें ॥५२॥
				  																	
									  
	 
	संतांच्या जें मनीं येत । तें तें पुरवी रमानाथ ।
	कमी न पडे यत्किंचित । ऐसा प्रभाव संतांचा ॥५३॥
				  																	
									  
	 
	बंकटलाल प्रतिवर्षी । व्रत हें चालवी अतीहर्षी ।
	अजून परी शेगांवासी । वंशज त्याचे करिती हें ॥५४॥
				  																	
									  
	 
	हा दासगणूविरचित । गजाननविजय नामें ग्रंथ ।
	साधकासी दावो पथ । विमलशा हरिभक्तीचा ॥१५५॥
				  																	
									  
	 
	श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥