गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गजानन महाराज शेगाव
Written By
Last Updated : गुरूवार, 9 सप्टेंबर 2021 (17:09 IST)

श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय ४

॥ श्रीगणेशाय नमः ॥
 
हे सर्वसाक्षी सर्वेश्वरा । नीलकंठा गंगाधरा ।
महाकाल त्र्यबंकेश्वरा । श्रीओंकारा पाव मशी ॥१॥
 
तूं आणि रुक्मिणीशा । एक तत्त्व आहां खास ।
तोय वारी म्हटल्यास । काय जलीं भेद होतो ? ॥२॥
 
तैसी तुमची आहे स्थिती । तंतोतंत जगत्पति ।
जैसी ज्याची मानेल मति । तैसा तो तुज बाहत ॥३॥
 
अनन्यभावें बाहतां । तूं पावसी आपुल्या भक्तां ।
माता न धरी निष्ठुरता । आपल्या वत्साविषयीं कधीं ॥४॥
 
मी तुझें अजाण लेंकरुं । नको माया पाताळ करुं ।
तूं साक्षात् कल्पतरु । इच्छा पूर्ण करी हरा ॥५॥
 
बंकटलालाचे घरांत । असतां स्वामी समर्थ ।
प्रकार एक अघटीत । आला ऐसा घडोनी ॥६॥
 
वैशाख शुद्ध पक्षासी । अक्षयतृतीयेचिया दिवशीं ।
पितरार्थ उदककुंभासी । देती श्राद्ध करोनिया ॥७॥
 
अक्षयतृतीयेचा दिवस । वर्‍हाडांतील लोकांस ।
विशेष वाटे प्रत्येकास । मोठा सण मानिती हा ॥८॥
 
त्या दिवशीं काय झालें । तें पाहिजे श्रवण केलें ।
महाराज पोरांत बैसले । कौतुकें लीला करावया ॥९॥
 
बालकां म्हणती गजानन । चिलीम द्यावी भरुन ।
तंबाखूची मजकारण । विस्तव वरी ठेवोनिया ॥१०॥
 
सकाळपून ऐसाच बसलों । चिलीम मुळीं नाहीं प्यालों ।
त्यामुळें हैराण झालों । भरा चिलीम मुलांनो ! ॥११॥
 
ऐसी आज्ञा ऐकतां भली । पोरें अवघीं आनंदलीं ।
चिलीम भरुं लागलीं । तंबाखू आंत घालुनिया ॥१२॥
 
विस्तवाचा तपास केला । तो न सदनीं मिळाला ।
कां कीं चूल पेटण्याला । अवकाश होता विबुध हो ॥१३॥
 
पोरें चित्तीं विचार करिती । आपापसांत निश्चिती ।
कशी करावी यासी युक्ति । विस्तव पाहिजे चिलिमीला ॥१४॥
 
मुलें पाहून चिंतातुर । बंकट करी मधुरोत्तर ।
अरे जानकीराम सोनार । आहे वेटाळीं * आपुल्या ॥१५॥
 
त्याच्याकडे तुम्ही जावें । विस्तवासी मागून घ्यावें ।
दुकान तें चालण्या बरवें । विस्तव लागतो आधीं त्या ॥१६॥
 
आधीं पेटते बागेसरी । त्याच्यापुढें दुकानदारी ।
ही सोनाराची रीत खरी । आहे ठावें कीं तुम्हांला ॥१७॥
 
पोरांनीं तें ऐकिलें । जानकीरामाकडे आले ।
विस्तव मागूं लागले । समर्थांच्या चिलमीस ॥१८॥
 
जानकीराम रागावला । लेंकरासी बोलता झाला ।
अक्षयतृतियेच्या सणाला । दे न कोणा विस्तव मी ॥१९॥
 
पोरें म्हणालीं त्यावर । जोडोनी आपले दोन्ही कर ।
नको करुं हा अविचार । विस्तव पाहिजे समर्थाला ॥२०॥
 
महाराज श्रीगजानन । देवाचेही देव जाण ।
त्यांच्या चिलमीकारण । विस्तव हा जातसे ॥२१॥
 
साधुप्रती कांहीं देतां । तेथें अशुभाचि नसे वार्ता ।
उगीच व्यावहारिक कथा । सांगत आम्हां बसूं नको ॥२२॥
 
आम्ही आहों मुलें लहान । तूं मोठा आमच्याहून ।
ऐसें साच असून । हें न कैसें कळे तुला ? ॥२३॥
 
विस्तव तूं देशील जरी । भाग्य येईल तुझ्या घरीं ।
चिलीम पिऊन तृप्त जरी । झाला गजानन महाराज ॥२४॥
 
तें सोनारें न ऐकिलें । अद्वातद्वा भाषण केलें ।
ज्याचें जवळ मरण आलें । त्याचे पाय खोलाकडे ॥२५॥
 
सोनार म्हणे बालकांसी । गजानन कशाचा पुण्यराशी ? ।
त्या चिलमीबहाद्दरासी । साधु म्हणून सांगूं नका ! ॥२६॥
 
गांजा तमाखू पीत बसतो । नग्न गांवांत हिंडतो ।
वेडयापरी चाळे करितो । पितो पाणी गटाराचें ॥२७॥
 
जात गोत नाहीं त्याला । ऐशा वेडयापिशाला ।
मी साधु मानण्याला । नाहीं मुळीं तयार ॥२८॥
 
बंकटलाल खुळावला । नादीं त्याच्या लागला ।
नाहीं देत विस्तवाला । मी तयाचे चिलमीसी ॥२९॥
 
तो आहे ना साक्षात्कारी । मग विस्तव कशाला पाहिजे तरी ? ।
आपुल्या कर्तृत्वें कां न करी । विस्तवातें निर्माण ? ॥३०॥
 
साधु नाथ जालंदर । पीत होते चिलीम फार ।
परी विस्तवासाठीं घरघर । ना हिंडले कदा ते ॥३१॥
 
जा जा उभे न राहा येथ । विस्तव ना मिळे तुम्हांप्रत ।
नाहीं मला किंमत । त्या तुमच्या पिशाची ॥३२॥
 
पोरें विन्मुख परत आलीं । महाराजांसी निवेदिली ।
हकीकत जी कां झाली । सोनाराचे दुकानांत ॥३३॥
 
ती ऐकतां हास्यवदन । करिते झाले दयाघन ।
नाहीं आपणां प्रयोजन । मुळींच त्याच्या विस्तवाचें ॥३४॥
 
ऐसें म्हणोन घेते झाले । चिलीम आपुल्या हातीं भले ।
बंकटलालासी बोलले । काडी एक वरती धरी ॥३५॥
 
बंकट म्हणे गुरुराया । थोडें थांबा परम सदया ।
विस्तव देतों करुनिया । काडी घासून आतां मी ॥३६॥
 
काडी घासल्यावांचूनी । कदां न प्रगटे अग्नि ।
म्हणून केली विनवणी । ती मनास आणा समर्था ॥३७॥
 
महाराज बोलले त्यावर । उगी न करी चरचर ।
नुसती काडी धरणें वर । तिला मुळींच घासूं नको ॥३८॥
 
बंकटलालें तैसें केलें । नुसत्या एका काडीस धरिलें ।
चिलमीचिया वरती भले । समर्थ-आज्ञा म्हणून ॥३९॥
 
तों काय झाला प्रकार । ऐका तुम्ही श्रोते चतुर ।
प्रगट झाला वैश्वानर । काडी नुसती धरतां वरी ॥४०॥
 
काडीप्रती विस्तवाचा । अंशही नव्हता साचा ।
हा प्रभाव शक्तीचा । महाराजांच्या लोकोत्तर ॥४१॥
 
काडी तैसीच राहिली । चिलीम तीही पेटली ।
कशाचीही नाहीं उरली । जरुर खर्‍या साधूला ॥४२॥
 
याचें नांव साधुत्व । उगीच नव्हतें थोतांड मत ।
आतां सोनाराचे घरांत । काय झालें तें ऐका ॥४३॥
 
या अक्षयतृतियेला । मान विशेष चिंचवण्याला ।
जेवीं वर्षप्रतिपदेला । महत्त्व निंब फुलांचें ॥४४॥
 
असो भोजना बैसली पंगत । चिंचवणें वाढलें द्रोणांत ।
तों प्रकार ऐसा अघटीत । घडून आला तो ऐका ॥४५॥
 
त्या चिंचवण्यामाझारीं । अळ्या दिसल्या नानापरी ।
बुजबुजाट झाला भारी । किळस वाटली सर्वांला ॥४६॥
 
लोक उठले पात्रांवरुन । अवघ्या अन्नातें टाकून ।
सोनार बसला अधोवदन । कारण कांहीं उमजेना ॥४७॥
 
चिंचवण्याच्या संगें भलें । अवघें अन्न वायां गेलें ।
मग त्या कोडें उमगलें । ऐसें व्हाया मीच कारण ॥४८॥
 
मी न साधूंसी विस्तव दिला । त्याचा प्रत्यय तात्काळ आला ।
गजाननाची अगाध लीला । मीं न खचित जाणिली ॥४९॥
 
गजानन जान्हवी नीर । मीं त्या मानिलें थिल्लर ।
गजानन राजराजेश्वर । मीं त्या भिकारी मानिलें ॥५०॥
 
त्रिकालज्ञ गजानन । मीं त्या मानिलें वेडा पूर्ण ।
कल्पतरुकारण । मीं बाभळ मानिली ॥५१॥
 
गजानन हा चिंतामणी । मीं लेखिली गार जाणी ।
गजानन हा कैवल्यदानी । मी ढोंगी मानिला हो ॥५२॥
 
हाय हाय रे दुर्दैवा । त्वां कैसा साधिला दावा ।
माझ्या हातून संतसेवा । होवो ना तूं दिलीस ॥५३॥
 
मसी असो हा धिक्कार । मी भारभूत साचार ।
जन्म पावलों भूमीवर । द्वय पायांचा पशु मी ॥५४॥
 
आज माझ्या भाग्यकाळीं । बुद्धि कशी चळती झालि ।
सुयोगाचि दवडिली । वेळ आलेली म्यां करें ॥५५॥
 
कांहीं असो आतां जाऊं । समर्थांचे पाय पाहूं ।
पदीं त्यांच्या अनन्य होऊं । क्षमा मंतूची मागावया ॥५६॥
 
ऐसा विचार करुनी । सवें घेऊन चिंचवणी ।
बंकटलालाच्या सदनीं । आला हकीकत सांगावया ॥५७॥
 
अहो शेटजी बंकटलाला । आज माझा घात झाला ।
पाहा या चिंचवण्याला । आंत किडे पडले बहु ॥५८॥
 
माणसें उठलीं उपोषित । तेणें झाला श्राद्धघात ।
हें ऐसें व्हावया कृत्य । माझा मीच कारण असे ॥५९॥
 
आज सकाळीं चिलिमीला । मीं नाहीं विस्तव दिला ।
पोरें मागत असतां मला । समर्थांच्या चिलिमीस्तव ॥६०॥
 
त्याचेंच हें आहे फळ । चिंचवणी नासलें सकळ ।
तें ऐकून बंकटलाल । बोलूं लागला येणें रितीं ॥६१॥
 
तुम्हीं न चिंचोके पाहिले । ते असतील किडलेले ।
म्हणून हे नासते झाले । तुमचें चिंचवणी वाटे मला ॥६२॥
 
सोनार म्हणे ऐसी शंका । शेटजी तुम्ही घेऊं नका ।
नवी चिंच होती देखा । मग चिंचोके किडके कसे ? ॥६३॥
 
जी मीं चिंच फोडिली । तिचीं टरफलें अजून पडलीं ।
चिंचोक्यांची रास झाली । मर्जी असल्या पाहा चला ॥६४॥
 
आतां इतुकीच विनंती । आहे शेटजी तुम्हांप्रती ।
मला नेऊन पायांवरतीं । घाला शीघ्र समर्थांच्या ॥६५॥
 
क्षमा मंतूची मागेन । अनन्यभावें करुन ।
साधु दयेचे परिपूर्ण । सागर मूळचेच आहेत कीं ॥६६॥
 
समर्थांपुढें भीत भीत । जानकीराम गेला त्वरित ।
घातलें त्यानें दंडवत । अष्टांगेंसी समर्था ॥६७॥
 
आणि म्हणाला दयाघना ! । तुला येवो माझी करुणा ।
मीं अपराध केले नाना । त्यांची क्षमा करावी ॥६८॥
 
तूं साक्षात् उमानाथ । नांदसी या शेगांवांत ।
ज्यांची होती मजला भ्रांत । ती त्वां आज निवटीली ॥६९॥
 
माझे अपराधरुपीं अवघें तृण । जाळी कृपाकृशानें * करुन ।
समर्था आजपासोन । मी न टवाळी तुझी करी ॥७०॥
 
जी शिक्षा आज केली । तेवढीच मजसी पुरे झाली ।
तूं अनाथांचा आहेस वाली । आतां अंत पाहूं नको ॥७१॥
 
महाराज बोलले त्यावर । खोटें न सांगे तिळभर ।
तुझें चिंचवणी आहे मधुर । किडे न पडले त्यामध्यें ॥७२॥
 
तें ऐकतां अवघ्यांनीं । पाहिलें तें चिंचवणी ।
पहिला प्रकार मावळोनी । गेला होता तेधवां ॥७३॥
 
अवघ्यांप्रती आश्चर्य झालें । समर्थांचें महत्त्व कळलें ।
हां हां म्हणतां पसरलें । वृत्त हें त्या गांवामध्यें ॥७४॥
 
ज्यांच्या त्यांच्या तोंडीं मात । हीच निघूं लागली सत्य ।
कस्तुरीचा नाहीं येत । वास झांकाया कवणातें ॥७५॥
 
चंदुमुकीन नांवाचा । गृहस्थ एक शेगांवाचा ।
निःसीम भक्त समर्थांचा । त्याची कथा ऐका ही ॥७६॥
 
श्रोते ज्येष्ठ मासांत । सभोंवार बसले भक्त ।
अति आदरें जोडोन हात । दृष्टि ठेवून पायावरी ॥७७॥
 
कोणी आंबे कापिती । कोणी फोडी हातांत देती ।
कोणी पंख्यानें घालिती । वारा समर्थांकारणें ॥७८॥
 
कोणी वांटिती खडीसाखर । कोणी गळ्यांत घालिती हार ।
कोणी चंदन थंडगार । लाविती अंगीं साधूच्या ॥७९॥
 
तयीं महाराज म्हणाले चंदूला । हे आंबे नकोत मला ।
दोन कान्होले उतरंडीला । आहेत तुझ्या ते आण जा ॥८०॥
 
चंदू बोले कर जोडून । आतां कान्होले कोठून ? ।
इच्छा असल्या तळून । ताजे आणितों गुरुराया ॥८१॥
 
तईं महाराज वदले वाचें । नाहीं कारण ताज्याचें ।
पाहिजेत तुझ्या उतरंडीचे । कान्हवले मज खावया ॥८२॥
 
जा वेळ करुं नको । उगीच सबबी सांगूं नको ।
गुरुपाशीं बोलूं नको । खोटें वेडया यत्किंचित् ॥८३॥
 
त्या मुकिनचंदूप्रती । लोक आघे बोलती ।
जा ये पाहून शीघ्रगती । खोटी न होय संतवाणी ॥८४॥
 
चंदू घराप्रती गेला । कांतेस पुसूं लागला ।
दोन कान्हवले उतरंडीला । आहेत काय रंभोरु ? ॥८५॥
 
तैं बोले अंगना । होऊन गेला एक महिना ।
आतां कान्हवले आपुल्या सदना । मिळतील कशाचे ? ॥८६॥
 
अक्षयतृतीया दिवशीं भले । कान्हवले मीं पतिराया केले ।
ते न आतां राहिले । संपून गेले त्याच दिनीं ॥८७॥
 
मर्जी असल्या नवे करितें । समर्थास्तव तळून देतें ।
ही पहा मी ठेवितें । कढई नाथा चुलीवर ॥८८॥
 
तुम्ही थांबा क्षणभर । सामान अवघें तयार ।
नको पाहाण्या बाजार । कान्हवल्याच्या साहित्यासी ॥८९॥
 
चंदू बोले त्यावरी । ताजे नकोत सुंदरी ।
जे तूं उतरंडी माझारीं । दोन ठेविले तेच दे ॥९०॥
 
समर्थांनीं ऐसेंच कथिलें । तेंच मी तुज निवेदिलें ।
आठवण करुन चांगलें । पाहा कांहीं येधवां ॥९१॥
 
ऐसे ऐकतां पतिवचन । कांता गेली घोटाळून ।
करुं लागली शोधन । कान्हवल्याचे चित्तांतरीं ॥९२॥
 
कान्हवल्यांचा शोध करितां । आठवण झाली तत्त्वतां ।
उघड म्हणे थांबा नाथा । सत्य गिरा समर्थांची ॥९३॥
 
दोन कान्हवले होते उरले । ते मी उतरंडीस ठेविले ।
त्यांचें स्मरण नाहीं उरलें । सगळ्या महिन्यांत मजलागीं ॥९४॥
 
त्यास महिना होऊन गेला । असेल बुरसा वरी आला ।
ते खाण्याच्या उपयोगाला । राहिले नसतील अणुमात्र ॥९५॥
 
ऐसें बोलून तात्काळ उठली । उतरंड सर्व धांडोळली ।
कान्हवले ते ठेवलेली । कळशी होती खापराची ॥९६॥
 
आंत जों पाहिलें न्याहाळून । तों दृष्टी पडले तिच्या दोन ।
कान्हवले जे सुकोन । गेले होते थोडके ॥९७॥
 
बुरसा मुळींच नाहीं आला । श्रोते त्या कान्हवल्याला ।
बट्टा संतवाणीला । नाहीं लागला कधीं जगीं ॥९८॥
 
कान्हवल्यातें पाहोन । उभयतांचें हर्षलें मन ।
धन्य साधु गजानन । महा समर्थ सिद्धयोगी ॥९९॥
 
चंदू कान्हवले घेऊन आला । समर्थांसी अर्पिता झाला ।
लोक करती आश्चर्याला । त्याच्या कृतीतें पाहून ॥१००॥
 
लोक म्हणती गजानन । खचित असती त्रिकालज्ञ ।
भूत भविष्य वर्तमान । यांसी अवघे कळतसे ॥१॥
 
चंदूच्या त्या कान्हवल्यांसी । सेविते झाले पुण्यराशी ।
राम शबरीच्या बोरांसी । जेवीं झाला भक्षिता ॥२॥
 
शेगांवच्या दक्षिणेसी । चिंचोली गांव परियेसी ।
तेथील एक रहिवासी । माधव नामें विप्र होता ॥३॥
 
वय ज्याचें साठावर । अवयव झाले क्षीण फार ।
तरुणपणीं संसार । हेंच होतें ब्रह्म ज्याचें ॥४॥
 
प्रारब्धाच्या पुढारी । कोण जातो भूमिवरी ? ।
ब्रह्मदेवें जीं कां खरीं । लिहिलीं अक्षरें तेंच होय ॥५॥
 
माधवासी न कोणी उरले । कांतापुत्र मरुन गेले ।
म्हणून विरक्त जाहलें । मन तयाचें संसारीं ॥६॥
 
जी का होती चीजवस्त । ती अवघी केली फस्त ।
म्हणे आतां माझी गत । होईल कैशी देवदेवा ? ॥७॥
 
म्यां हमाधुमीचा संसार केला । तो आतां अवघा निमाला ।
आठविलें कधीं नाहीं तुला । एक क्षणही दीनबंधो ! ॥८॥
 
आतां माझा वाली कोण ? । दीनदयाळा तुजवांचून ।
माझें हें अरण्यरोदन । तुजविण देवा कोण ऐके ? ॥९॥
 
ऐसा अनुताप धरुन पोटीं । शेगांवीं आला शेवटीं ।
गजाननाच्या द्वारवंटीं । हट्ट धरुन बैसला ॥११०॥
 
आरंभिलें उपोषण । अन्नपाण्यातें त्यागून ।
वदनीं वदे नारायण । खंड न पडे तयाला ॥११॥
 
ऐशापरी एक गेला । दिवस परी नाहीं उठला ।
तईं महाराज वदले तयाला । हें करणें उचित नसे ॥१२॥
 
हेंच हरीचें नामस्मरण । कां न केलें मागें जाण ।
प्राण देहातें सोडून । जातां वैद्य बोलाविसी ! ॥१३॥
 
तरुणपणीं ब्रह्मवारी । म्हातारपणीं करिसी नारी ।
अरे वेळ गेल्यावरी । नाहीं उपयोग साधनाचा ॥१४॥
 
जें करणें तें वेळेवर । करावें कीं साचार ।
घर एकदां पेटल्यावर । कूप खणणें निरर्थक ! ॥१५॥
 
ज्या कन्यापुत्रांसाठीं । तूं केलीस आटाआटी ।
ते अवघे गेले शेवटीं । टाकोनिया तुजलागीं ॥१६॥
 
अशाश्वताचें पोषण । केलें शाश्वता विसरुन ।
त्या कर्माचीं तुजलागून । फळें भोगणें भाग असे ॥१७॥
 
तीं फळें भोगिल्याविना । सुटका तुझी होईना ।
दे हा टाकून हट्टीपणा । विवेक कांहीं करी मनीं ॥१८॥
 
तें न माधवें ऐकिलें । हट्टासि ना सोडिलें ।
यत्‍न लोकांचे वायां गेले । त्यासी भोजन घालण्याचे ॥१९॥
 
शेगांवचा कुलकर्णी । करुं लागला विनवणी ।
भोजनास चला सदनीं । अन्नाविण राहूं नका ॥१२०॥
 
तेंही म्हणणें माधवाला । नाहीं पटलें तसाच बसला ।
समर्थांच्या सान्निध्याला । नाम घेत हरीचें ॥२१॥
 
रात्र झाली दोन प्रहर । तमें आक्रमिलें अंबर ।
निशीचा तो शब्द किर्र । होऊं लागला वरच्यावरी ॥२२॥
 
आसपास कोणी नाहीं । ऐसें पाहून केलें कांहीं ।
कौतुक तें लवलाही । स्वामी गजाननांनीं ॥२३॥
 
रुप धरिलें भयंकर । दुसरा यमाजी भास्कर ।
आ पसरुन माधवावर । धांवून आले भक्षावया ॥२४॥
 
तेणें माधव पळाला । घेऊन आपला जीव भला ।
धडकी भरली चित्ताला । छाती उडे धडधड ॥२५॥
 
बुडबुडा आला तोंडासी । शब्द फुटेना वाचेसी ।
ऐशा पाहोन स्थितीसी । समर्थें धरिलें सौम्य रुप ॥२६॥
 
आणि बोलले गर्जोन । हेंच कां तुझें धीटपण ।
तूं काळाचें भक्ष्य जाण । असाच खाईल काळ तुला ॥२७॥
 
त्याची चुणूक दाखविली । पुढची स्थिति जाणविली ।
तेथें पळाया नाहीं उरली । यमलोकांत जागा तुला ॥२८॥
 
माधव ऐसें ऐकतां । झाला विनयें बोलतां ।
यमलोकाची नको वार्ता । तेवढी माझी टाळा हो ॥२९॥
 
नको नको हें जीवित । द्या धाडून वैकुंठांत ।
हीच विनंति आपणांप्रत । महाराज माझी शेवटची ॥१३०॥
 
यमलोकीं जें दिसणार होतें । तें तुम्हीं दाविलें येथें ।
आतां या लेंकरातें । यमलोकीं धाडूं नका ॥३१॥
 
माझ्या पातकाच्या राशी । आहेत जरी बहुवशी ।
परी त्या जाळणें तुम्हांसी । नाहीं मुळीं अशक्य ॥३२॥
 
कांहीं सुकृत पदरीं होतें । म्हणून पाहिलें तुम्हांतें ।
संतभेटी ज्याला होते । यमलोक ना तयासी ॥३३॥
 
ऐसें ऐकतां भाषण । समर्थें केलें हास्यवदन ।
महापतीता पावन । साधूच एक करिती कीं ॥३४॥
 
श्रीमन्नारायण नारायण । ऐसेंच माधवा करी भजन ।
जवळ आलें तुझें मरण । आतां गाफील राहूं नको ॥३५॥
 
किंवा अजून वांचण्याची । आस आहे तुला साची ।
ती असल्यास आयुष्याची । वाढ तुझ्या करितों मी ॥३६॥
 
माधव म्हणे गुरुराया । नको मला आयुष्य सदया ।
ओखटी ही प्रपंचमाया । त्यांत पुन्हां गोवूं नको ॥३७॥
 
तथास्तु ऐसें महाराज वदले । तूं जें मागसी तें मीं दिलें ।
आतां तुला नाहीं उरलें । जन्मास येणें भूमीवर ॥३८॥
 
ऐशा रीतीं दोघांचा । संवाद गुप्त स्वरुपाचा ।
झाला त्या वर्णण्या वाचा । नाहीं माझी समर्थ ॥३९॥
 
इहलोकीचें देहभान । माधवाचें निमालें जाण ।
कित्येक बोलूं लागले जन । उपवासें फिरलें मस्तक ॥१४०॥
 
म्हणून वेडेचार करी । जनकल्पना नानापरी ।
उठत्या झाल्या त्या अवसरीं । त्या किती म्हणून वर्णाव्या ? ॥४१॥
 
असो माधवाचें देहावसान । समर्थासन्निध झालें जाण ।
चुकलें त्याचें जन्ममरण । गजाननाच्या कृपेनें ॥४२॥
 
असो एक्या समयीं भली । समर्थांसी इच्छा झाली ।
ती त्यांनीं निवेदिली । आपुल्या शिष्यवर्गातें ॥४३॥
 
वैदिक ब्राह्मण बोलवा । मंत्रजागर येथें करवा ।
वेदश्रवणें देवदेवा । आनंद होतो अतिशय ॥४४॥
 
पन्हें पेढे बरफी खवा । भिजल्या डाळीस मीठ लावा ।
एकेक रुपया तो द्यावा । घनपाठी ब्राह्मणातें ॥४५॥
 
ऐसें भाषण ऐकिलें । शिष्य विनवूं लागले ।
ऐसे वैदिक नाहीं उरले । या आपुल्या शेगांवीं ॥४६॥
 
सांगाल तो करुं खर्च । परी अडचण आहे हीच ।
ब्राह्मण मिळविण्याचि साच । आमचा उपाय यातें नसे ॥४७॥
 
महाराज म्हणाले त्यावरी । करा उद्यां तयारी ।
ब्राह्मण धाडील श्रीहरी । तुमच्या वसंतपूजेला ॥४८॥
 
मग काय विचारितां । अवघे हर्षले तत्त्वतां ।
झाली तयारी हां हां म्हणतां । रुपये शंभर झाले जमा ॥४९॥
 
सामान सर्व आणिलें । चंदनाचें उटणें केलें ।
आंत केशर कालविलें । तैसाच आणखी कापुर ॥१५०॥
 
दोन प्रहरचे समयाला । ब्राह्मण आले शेगांवाला ।
जे पदक्रम जटेला । जाणत होते विबुध हो ! ॥५१॥
 
थाटांत वसंतपूजा झाली । ब्राह्मण मंडली आनंदली ।
दक्षिणा घेऊनी गेली । अन्य ग्रामाकारणें ॥५२॥
 
संतांच्या जें मनीं येत । तें तें पुरवी रमानाथ ।
कमी न पडे यत्किंचित । ऐसा प्रभाव संतांचा ॥५३॥
 
बंकटलाल प्रतिवर्षी । व्रत हें चालवी अतीहर्षी ।
अजून परी शेगांवासी । वंशज त्याचे करिती हें ॥५४॥
 
हा दासगणूविरचित । गजाननविजय नामें ग्रंथ ।
साधकासी दावो पथ । विमलशा हरिभक्तीचा ॥१५५॥
 
श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥
 
॥ इति चतुर्थोऽध्यायः समाप्तः ॥

श्रीगजाननविजयग्रंथअध्याय५