ॐ नमो श्री गजवदना । गणराया गौरीवंदना ।।
	विघ्नेशा भवभय हरणा । नमन माझे साष्टांगी ।।1।।
	नंतर नमिली श्री सरस्वती । जगन्माता भगवती ।।
				  																								
									  
	ब्रम्हकुमारी विणावती । वियादात्री विश्वाची ।।2।।
	नमन तसे गुरुवर्या । सुखनिधान सद्गुरुराया ।।
				  				  
	स्मरुनी त्या पवित्र पाया । चित्तशुद्धि जाहली ।।3।।
	थोर ऋषिमुनी संतजन । बुधगण आणि सज्जन ।।
				  											 
																	
									  
	करुनी तयांसी नमन । ग्रंथरचना आरंभली ।।4।।
	पूर्वकाळी एकदा अगस्त्य ऋषी । भेटले कार्तिकेयस्वामींसी ।।
				  																							
									  
	नमस्कार करुनी तयांसी । प्रश्न विचारु लागले ।।5।।
	तेहतीस कोटी देव असती । प्रत्येक आपणच श्रेष्ठ म्हणती ।।
				  																	
									  
	सामान्य माणसाची मती । गुंग होऊनी जातसे ।।6।।
	गाणपत्य म्हणती गणपती । शाक्त म्हणती महाशक्ति ।।
				  																	
									  
	स्मार्त म्हणती पशुपती । वैष्णव म्हणती श्रीविष्णु ।।7।।
	नाना देव नाना देवता । प्रत्येकाची ज्येष्ठश्रेष्ठता ।।
				  																	
									  
	आपापल्या परीने भक्ता । आकर्षुनी घेतसे ।।8।।
	हा श्रेष्ठ की तो श्रेष्ठ । कोण कोणाहुनी कनिष्ठ ।।
				  																	
									  
	हे न कळल्याने स्पष्ट । मन संभ्रमी पडतसे ।।9।।
	कोणी म्हणती कालभैरव । हाच खरा महादेव ।।
	तयाचे कृपेने सदैव । सकल कल्याण होतसे ।।10।।
				  																	
									  
	कालभैरव हा देव कुठला । कसा त्याचा उद्भव झाला ।।
	हें जाणण्याची मला । आतुरता फार लागली ।।11।।
				  																	
									  
	तरी आता कृपा करुनी । कोणता देव श्रेष्ठ सर्वांहुनी ।।
	ते मज सांगावे समजावुनी । उपकार मोठे होतील ।।12।।
				  																	
									  
	तेव्हां स्कंदानीं अगस्तीसी । जी कथा सांगितली अपूर्वसी ।।
	ती सांगतों सर्वासीं । म्हणे मिलिंदमाधव  ।।13।।
				  																	
									  
	सुमेरू पर्वतावरी एकेकाळीं । ब्रह्मादि सकळ देवमंडळी ।
	चर्चा करीत होती बसली । तेव्हां काय जाहलें  ।।14।।
				  																	
									  
	ऋषी आणि मुनीजन । सर्वानी एकत्र जमून ।
	सुमेरूवरी केलें आगमन । घेतलें दर्शन देवांचें  ।।15।।
				  																	
									  
	ब्रह्मदेवासी हात जोडून । त्यानी केला एक प्रश्न ।
	" देवांमाजी सर्वश्रेष्ठ कोण । प्रभो आम्हां सांगावे "।।16।।
				  																	
									  
	तेव्हां त्या ब्रह्मदेवाने । स्वसामर्थ्याच्या अहंकाराने ।
	आणिक अतिशय अविचाराने । उत्तर दिलें झडकरी ।।17।।
				  																	
									  
	मी संपूर्ण सृष्टीचा निर्माता । स्वयंभू अनादि ब्रह्म असतां ।
	माझी असामान्य श्रेष्ठता । स्वयंसिध्दच आहे कीं ।।18।।
				  																	
									  
	ब्रह्मदेवाची गर्वोक्ति ऐकून । क्रोधायमान झाले ऋतुनारायण ।
	म्हणाले," हें आहे तुझें अज्ञान । सत्य तूं न जाणसी ।।19।।
				  																	
									  
	मी विश्वाचा पालनकर्ता । मीच सृष्टीचा नियंता ।
	मीच गतिशक्तीचा कर्ता । प्रत्यक्ष यज्ञस्वरूप मी ।।20।।
				  																	
									  
	मी आहे परमज्योती । मीच आहे परागती ।
	केलिस सृष्टिची उत्पत्ति । माझ्याच प्रेरणेने तूं ।।21।।
				  																	
									  
	अर्थात तूं श्रेष्ठ नसून । मीच आहे श्रेष्ठ जाण ।
	स्वतःकडे घेसी मोठेपण । काय तुला म्हणावें "।।22।।
				  																	
									  
	झालें, ऐसें जुंपलें भांडण । " मीच श्रेष्ठें " म्हणती दोघेजण ।
	शेवटीं " वेदांसी विचारूं आपण "। असें त्यांनीं ठरविलें ।।23।।
				  																	
									  
	ऋग्वेद आणि यजुर्वेद । सामवेद आणि अथर्ववेद ।
	यांच्याशीं केला वादविवाद । " श्रेष्ठ देव कोण असे ? "।।24।।
				  																	
									  
	ऋग्वेद म्हणे " ज्याचे पासून । सर्वांचें होते प्रवर्तन ।
	ज्यांत भूतमात्रांचा विलय जाण । तोच रुद्र श्रेष्ठ असे "।।25।।
				  																	
									  
	यजुर्वेद म्हणे विचार करून । योगद्वारें होतें ज्याचें अर्चन ।
	यज्ञयागांचा स्वामी स्वयंप्रमाण । शिव तो श्रेष्ठ जाणावा ।।26।।
				  																	
									  
	साम म्हणे " ज्यामध्यें विश्वाचें भ्रमण । योगीजन करिती जयाचें ध्यान ।
	ज्याच्या तेजें ब्रह्मांड उजळे पूर्ण । एक त्र्यंबक श्रेष्ठ तो " ।।27।।
				  																	
									  
	अथर्व देई तसेच उत्तर। म्हणे " जो भक्तांचे दु:ख करी दूर।।
	तोच कैवल्यरूप श्रीशंकर। श्रेष्ठ असे सवांर्हुनी " ।।28।।
				  																	
									  
	वेदांचे उत्तर ऐकून । ब्रह्मा आणि नारायण ।।
	दोघांनीही संतापून । निंदा केली शिवाची ।।29।।
				  																	
									  
	तोंच अमूर्त प्रणव सनातन । मूर्त स्वरूप करूनी धारण ।।
	म्हणे स्वयंज्योती शंकर भगवान । सर्व देवांत श्रेष्ठ असें ।।30।।
				  																	
									  
	तरीही दोघांचे भांडण । संपले नाही मुळीच जाण ।।
	दूर होईना त्यांचे अज्ञान । तेव्हा चमत्कार जाहला ।।31।।
				  																	
									  
	दोघांच्या मध्ये एक विराट । दिव्य प्रकाशज्योत झाली प्रगट।।
	त्या ज्योतीचा लखलखाट । विश्वव्यापी भासला ।।32।।
				  																	
									  
	हां हां म्हणता ज्योतिर्मंडली । एक बालकाकृती दिसु लागली ।।
	दिव्य तेजप्रभा आगळी । मुखावरी विलसतसे ।।33।।
				  																	
									  
	वर्ण शुद्धनिलांजनासमान । त्रिनेत्र विचित्र नागभूषण ।।
	त्रिशूळ वाजवी खणखण । शिवाचा अंशावतार तो ।।34।।
				  																	
									  
	ज्याला बघुनी प्रत्यक्ष काळ । भयभीत होई कांपे चळचळ ।।
	कालभैरव नावे सकळ । संबोधती तयाला ।।35।।
				  																	
									  
	दुष्टांचे करी तो दमन ।  यास्तव  आमर्दक  नामाभिधान ।।
	भक्तांचे पाप करी भक्षण ।। म्हणूनी पापभक्षक तो ।।36।।
				  																	
									  
	कालराज हेही नाव त्याचे । रक्षण करी तो काशी क्षेत्राचें ।।
	पारिपत्य करुनी पाप्यांचें । शासन घोर करीतसे ।।37।।
				  																	
									  
	अंगी विश्वोद्धारक शक्ति । त्रिलोकी जयाची थोर कीर्ती ।।
	ऐसी पाहूनी बालमूर्ति । ब्रह्मदेव त्यासी बोलला ।।38।।
				  																	
									  
	माझ्या पांचव्या मुखापासुनी । जन्म तुझा झाला म्हणोनी ।।
	मला आता शरण येउनी । शुभाशिर्वाद घेई तू ।।39।।
				  																	
									  
	भणाणले ब्रम्हदेवाचे मस्तक । शिवनिंदा करी पाचवे मुख ।।
	ऐकुनी त्याची बकबक ।। काळभैरव क्रुद्ध जाहला।।40।।
				  																	
									  
	भव्य रूप प्रगट केले । अक्राळ विक्राळ आगळे ।।
	डोळे लालेलाल झाले । जळत्या निखार्यासारखे।।41।।
				  																	
									  
	मग त्या काळभैरवानें । डाव्या करंगळीच्या नखाने ।।
	ब्रह्मदेवाचे शिर छाटिले रागाने । अपराध केला म्हणोनी ।।42।।
				  																	
									  
	तेव्हा त्या ब्रह्मदेवाचे डोळे । एका क्षणात चक्क उघडले ।।
	आणि त्यांनी हात जोडीले । चुकलो चुकलो म्हणोनी ।।43।।
				  																	
									  
	नारायणेंही तेंच केले । भैरवस्तुती स्तोत्र गाईले ।।
	दोघांनाही सत्य ज्ञान झालें । प्रत्यक्ष शिव प्रगटले ।।44।।
				  																	
									  
	देवांनी केली पुष्पवृष्टी । आनंदे भरली सर्व सृष्टि ।।
	श्रीशंकराची दयादृष्टि । अभय देई दोघांना ।।45।।
				  																	
									  
	शिव म्हणे ब्रह्मदेवाला । आणि यज्ञस्वरूपी नारायणाला ।।
	मीच हा अवतार घेतला । अज्ञान दूर करायासी ।।46।।
				  																	
									  
	अष्टभैरव माझे अंशावतार । काळभैरव हा सर्वाहुनी थोर ।।
	त्याची तीन स्वरूपे अगोचर । जाणते तेच जाणती ।।47।।
				  																	
									  
	महाकाळ,बटुकभैरव । तिसरा स्वर्णाकर्षणभैरव ।
	तयावरी ठेविती भक्तीभाव । त्यांचे कल्याण होतसे ।।48।।
				  																	
									  
	क्षेत्रपाल,ईशानचंडेश्वर । मृत्युंजय,मंजुघोष,अर्धनारीश्वर।
	नीलकंठ,दंडपाणी,दक्षिणामूर्तिवीर । अवतार माझेच असती ते।।49।।
				  																	
									  
	काळभैरवाची करतील भक्ती । त्यांची होईल कामनापूर्ती ।।
	विघ्नेदु:खें दूर होती । सत्य सत्य वाचा ही ।।50।।
				  																	
									  
	मग म्हणे काळभैरवासी । तूं जरी माझा अवतार अससी ।।
	तरीही स्पष्ट सांगतो तुजसी । सत्य ते सत्य मानावे ।।51।।
				  																	
									  
	ब्रह्मदेवाचे पाचवे मुख । माझी निंदा करी नाहक ।।
	म्हणुनी फक्त तेंच मस्तक । कापिंलेस तूं कोपाने ।।52।।
				  																	
									  
	क्रोधाग्नि पेटता मनी । विवेकबुद्धि भस्म होउनी ।।
	घडती पापें हातुनी । अविचारी अनर्थ होतसे ।। 53।।
				  																	
									  
	तू वागलास अविचाराने ।  तुझ्या त्या दुष्कृत्याने ।  
	ब्रह्महत्येच्या महापातकाने ।  ग्रासिले असे तुजलागी ।।54।।
				  																	
									  
	ब्रम्हहत्येचे पाप अघोर । दुष्परिणाम त्याचे थोर ।।
	कोणी कितीही असो बलवत्तर । पापमुक्त न होई ।।55।।
				  																	
									  
	जो कोणी महापातक करी । तो तो जातो नरकपुरी ।।
	अनंत युगे  दु:ख भारी । भोगणे प्राप्त होतसे ।। 56।।
				  																	
									  
	जेव्हा महापातकी प्राणी । मुक्त होतो नरककुंडातुनी ।।
	त्याला वृक्षवेली शिळा योनी । सप्त लक्ष वर्षे लाभते ।।57।।
				  																	
									  
	त्यानंतर कीड, मुंगी जीव योनी । सात हजार वर्षे कष्ट भोगुनी ।
	पशुपक्षादि अनेक जन्म घेऊनी । दु:ख भोगी अपार ।।58।।
				  																	
									  
	हे शिवाचे भाषण ऐकुनी । काळभैरव घाबरला मनीं ।।
	म्हणे मुक्त व्हावया पापातुनी । काही उपाय सांगावा ।। 59।।
				  																	
									  
	शिव म्हणे मग त्यासी । एक उपाय सांगतो तुजसी ।।
	पृथ्वीवरील ती वाराणसी । अविमुक्त तें क्षेत्र असे ।।60।।
				  																	
									  
	त्या क्षेत्राचे रक्षण । चण्डिका करिती रात्रंदिन ।।
	त्या सर्वांचे नामाभिधान । ऐक आता सांगतो ।।61।।
				  																	
									  
	दुर्गा उभी दक्षिणेला । अंतरेश्वरी नैऋत्येला ।।
	अंगारेश्वरी पश्चिमेला । सुसज्ज असे सर्वदा ।। 62।।
				  																	
									  
	भद्रकाली असे वायव्येला । भीमचंडी उभी उत्तरेला ।।
	महामत्ता ईशान्यदिशेला । क्षेत्ररक्षण करितसे ।।63।।
				  																	
									  
	उर्ध्वकेशी सहित शंकरी ।। पूर्व दिशेचे रक्षण करी ।।
	अध:केशी आग्नेय कोनावरी ।। लक्ष ठेवी अखंडित ।।64।।
				  																	
									  
	ऐसे ते काशीक्षेत्र जाण । भूलोकी असे पवित्र पावन ।।
	तेथील पंचगंगेत करिता स्नान । पापक्षालन होतसे ।।65।।
				  																	
									  
	देवदेवता, यक्ष किन्नर । नाग, सिद्ध आणि विद्याधर ।।
	पिशाच्चें आणि नारीनर । होती पापमुक्त तिथें ।।66।।
				  																	
									  
	त्या क्षेत्री तु जाशील जेव्हा । पापमुक्त तुही होशील तेव्हा ।।
	वंद्य होऊनी सर्व देवा । सुखें तेथे राहशील ।।67।।
				  																	
									  
	घ्यावयासि आतां प्रायश्चित्त । कापलेले मस्तक घे हातांत ।।
	काशीला जा भिक्षा मागत । पापमुक्त व्हाया ।।68।।
				  																	
									  
	ऐसे बोलुनी क्षणात । कैलासपती झाले गुप्त ।।
	काळभैरव तिन्ही लोकात । भ्रमण करु लागला ।।69।।
				  																	
									  
	तो पुढे पुढे चाले जरी । महापातक त्याचा पाठलाग करी ।।
	येता वाराणशीच्या वेशीवरी । पाप तेथेच थांबले ।। 70।।
				  																	
									  
	काळभैरव प्रवेशिता काशीक्षेत्री । हातांतील शीर पडले खालती ।।
	त्या स्थळा " कपालमोचन " म्हणती । तीर्थ प्रसिद्ध झाले तें ।।71।।
				  																	
									  
	काळभैरव झाला तेथील । शहराचा मुख्य कोतवाल ।।
	दैवत थोर काशीतील । सर्वाहुनी ठरला श्रेष्ठ तो ।।72।।
				  																	
									  
	आधीं दर्शन काळभैरवाचे । नंतर श्रीकाशीविश्वेश्वराचे ।।
	ऐशापरी वागती तयांचे । सकल पाप जातसे ।।73।।
				  																	
									  
	कार्तिक मास तो पवित्र । वद्य अष्टमी पवित्र फार ।।
	काळभैरवाचा अवतार । शुभदिनी त्या जाहला ।।74।।
				  																	
									  
	कोणतीही अष्टमी , चतुर्दशी । रविवार किंवा मंगळवार दिवशी ।।
	शरण जावे काळभैरवासी । करावी पूजाप्रार्थना ।।75।।
				  																	
									  
	तोतो होतो प्रसन्न ज्याला । दु:ख चिंता नसते त्याला ।।
	अशुभ अमंगल जाते लयाला । सकल सिद्धी लाभती ।।76।।
				  																	
									  
	होते इच्छित दीर्घायु संतती । मिळते स्थावरजंगम संपत्ती ।।
	काळभैरवाचे महात्म्य किती । आणि कैसे वर्णावे ।।77।।
				  																	
									  
	शत्रुभय आणि चोरभय । समूळ निश्चये नष्ट होय ।।
	म्हणुनी तयाचेच पाय । धरावे भक्तिभावाने ।।78।।
				  																	
									  
	वैभवशिखरीं भक्त चढे । दिनोदिनी लौकिक वाढे ।।
	त्यासी पाहता काळ दडे । काळभैरवाच्या धाकाने ।।79।।
				  																	
									  
	राजलक्ष्मी आणि राजमान्यता । मिळे समाजांत मानमान्यता ।।
	काळभैरवाच्या सत्य भक्ता । उणे न पडे काहींही ।।80।।
				  																	
									  
	स्कंदस्वामींचे भाषण ऐकुनी । समाधान पावले अगस्तीमुनी ।।
	काळभैरवस्मरण करीत मनी । स्वस्थानी गेले आनंदे ।।81।।
				  																	
									  
	यास्तव जोडुनी दोन्ही हस्त । म्हणावे काळभैरव वरद स्तोत्र ।।
	जपावा काळभैरव मंत्र । निशिदिनी मनीं अखंड 82।।
				  																	
									  
	ऐसे करील जो सहामास । काळभैरव प्रसन्न होईल त्यास ।।
	देव भक्तांचा होतो दास । स्वंयसिद्ध सत्य हे ।।83।।
				  																	
									  
	कोणी रंक असो वा राव । हृदयी धरुनी दृढभाव ।।
	प्रार्थना करिता काळभैरव । धाउनी येई संकटी ।।84।।
				  																	
									  
	सदा ठेवुनी सद्वर्तन । करिती जे काळभैरव स्मरण ।।
	तयांसी साक्षात शंकर भगवान । प्रत्यक्ष दर्शन देतसे ।। 85।।
				  																	
									  
	भैरवाचे कराया पूजन चिंतन । काळवेळेचे नसे बंधन ।।
	स्त्रीपुरुषांनी त्यासी निशिदिन । भक्तिभावे भजावे ।।86।।
				  																	
									  
	घरींदारी, कचेरीत, । वाटेत किंवा प्रवासात ।
	नामस्मरण करावे अखंडित । तेणे कल्याण होतसे ।।87।।
				  																	
									  
	काळभैरव होता प्रसन्न । पळते पाप आणि दैन्य ।।
	मिळते विपुलधनधान्य । ऐसे सामर्थ्य तयांचे ।।88।।
				  																	
									  
	अघोरीविद्या, मंत्रतंत्रशक्ती । भैरवभक्तांसी कधी न बाधती ।।
	स्तोत्र हे जेथे पठण करिती । तेथें भुतेखेते न राहती ।।89।।
				  																	
									  
	काळभैरवासी नित्य स्मरता । बंदिवासातुन होते मुक्तता ।।
	येते हाती राजसत्ता । ऐसा समर्थ देव तो ।।90।।
				  																	
									  
	ॐ असितांगभैरवाय नम:। ॐ रुरुभैरवाय नम:।।
	ॐ चंडभैरवाय नम:। ॐ क्रोधभैरवाय नम:।।91।।
	ॐ उन्मत्तभैरवाय नम:।ॐ कपालीभैरवाय नम:।।
				  																	
									  
	ॐ भीषणभैरवाय नम:। ॐ संहारभैरवाय नमो नम:।।92।।
	ॐ महाकाळा, महाकोशा। महाकाया, विश्वप्रकाशा ।।
				  																	
									  
	मत्ता, महेशा, सर्वेशा । काळभैरवाय नमो नम: ।।93।।
	संहाररूपा, खट्वांगधारका । कंकाळा, पापपुण्यशोधका ।।
				  																	
									  
	सुराराध्या, तापहारका । काळभैरवाय नमो नम: ।।94।।
	लोलाक्षा, लोकवर्धना । लोस्याप्रिया, श्वानवाहना ।।
				  																	
									  
	भुतनाथा, भुतभावना । काळभैरवाय नमो नम: ।।95।।
	हे श्री देवाधिदेवा । कराल वदना, काळभैरवा ।।
				  																	
									  
	कृपाशिर्वाद नित्य असावा । पदीं लीन जाहला ।।96।।
	कुटुंबातील सर्व व्यक्ती । त्यांसी दीर्घायुष्य, आरोग्य, शक्ति ।।
				  																	
									  
	बुध्दि, किर्ती, संपत्ती । देऊनी वंश वाढवी ।।97।।
	जाऊं आम्ही जेथें जेथें । कार्यसिध्दी होवो तेथें ।।
				  																	
									  
	मनी कुविचार भलभलते । येऊं नको देऊं तूं ।।98।।
	मिलिंदमाधव याच साठी ।  तुझ्या पायी घाली मिठी ।।
				  																	
									  
	अपराध पापें कोटीकोटी । क्षमा त्यांची करावी ।।99।।
	घरीं नांदो सतत शांतता । पडूं नये कशाची कमतरता ।।
				  																	
									  
	योगक्षेमाची नसावी चिंता । हेंच देंवा मागणे ।। 100।।
	शके अठराशे सत्याण्णवासी । माघमासी कृष्णपक्षीं ।।
				  																	
									  
	चतुर्दशी  महाशिवरात्रीसी । ग्रंथ पूर्ण झाला हा ।।101।।
	श्री काळभैरवार्पणमस्तु ।। शुभं भवतु ।।
				  																	
									  
	भक्तकवि मिलिंदमाधवकृत काळभैरव वरद स्तोत्र ग्रंथ संपूर्ण ।।
	जपासाठी मंत्र ।।  ॐ काळभैरवाय नम:।।