शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: गुरूवार, 16 एप्रिल 2015 (10:01 IST)

मनाला स्थिरता पाहिजे

श्रीमद्भगवद्गीतेचा सहावा अध्याय हा संपूर्णपणे योगाभ्यास आहे. कुंडलिनीची स्थाने, तिची जागृती, त्याचे परिणाम, पद्धती इ. सर्व अभ्यास या अध्यायात आलेला आहे. योगमार्गाचा अभ्यास करणे ही सुद्धा एक तपश्चर्या आहे. त्यावर ज्ञानेश्वरीने तर सूक्ष्म विचार मांडलेला आहे. सोपानदेवीमध्ये सुद्धा भगवद्गीतेतील श्लोकावरील सरळसरळ भाष्य आलेले आहे. ज्ञानेश्वर महाराजाच्यासारखी पूरक उदाहरणे सोपानदेवीमध्ये आलेली नसली तरी ती भाषा मात्र सहज समजते.

पवित्र शुभ देशी प्रतिष्ठोन ।
स्थिर करावे आपुले आसन ।।
उंच नीच नसावे जाण ।
बैसावया कुश: कृष्णाजन वस्त्र ।।

सो.6.10

जी मंडळी योगसाधना करतात ते मनाची प्रसन्नता, एकाग्रता वाढविण्यासाठी आपले बसण्याचे स्थान, बैठक व्यवस्था कशी करून घेतात. त्याचे वर्णन वरील ओवीमध्ये केलेले आहे. मन एकाग्रतेसाठी योगी माणूस अत्यंत पवित्र, स्वच्छ, एकांतास योग्य अशी जागा निवडतो. शक्यतो ही जागा निर्जन असते. म्हणजे तिथे माणसांचा वावरच नसतो का? तर साधनेत बोलत बसल्याने व्यत्यय येतो. विषयसुखच जास्त वाढत जाते. म्हणून जंगलात, एकांताची, निर्जन अशी जागा निवडली जाते. ती जागा चढ-उतार, उंच, खड्ड्यातून नसावी. तिथे कुश म्हणजे काड्या, गवताचे आसन तयार केल्यास अधिक चांगले. निसर्गाच विविध वस्तूपासून असे पवित्र आसन तयार करून घ्यावे. त्यावर बसून साधना, तपश्चर्या करावी. ही सगळी योग्यांची लक्षणे असतात.

आम्ही सांसारिक माणसं. जंगलात जाऊन बसणे किंवा अन्य ठिकाणी एकांतात बसणे आजच्या जमान्यात शक्य नाही. मग आम्हाला काय उपयोग? वरील ओवीचा. आम्हाला आजच्या जीवनात काय उपयोग? तर उपयोग नक्की आहे. काय सांगितलं आहे? वरील ओवीत आपण जे काम दररोज करतो तेच काम लवकर, प्रसन्नतेने आणि दिलेल्या वेळेत पूर्ण करावयाचे असेल तर काम कारण्यासाठी बसण्याची किंवा उभं राहण्याची जागा आहे ती स्वच्छ असावी हा सर्वसाधारण अलिखित नियम आहे. नाहीतर सर्वत्र घाण, थुंकलेली, धूळ साचलेली, दुर्गंधियुक्त असेल तर मन लागत नाही. आळस, नकारात्मक विचार यायला लागतात. काम होत नाही म्हणा किंवा होणारे काम उशिरा आणि मंदगतीने होते. याउलट तीच जागा चढउतार खड्डा नसलेली सपाट, उंच ठिकाणी असेल. उंच याचा अर्थ आपण पाटावर, चौरंगावर असा घेऊ. त्यावर एक छान असे बस्कर घातले व सभोवताली उदबत्तीचा सुगंध पसरलेला असेल तर उद्विग्न, चंचल अवस्थेत असलेला माणूसदेखील अशा वातावरणामुळे शांत व प्रसन्न होतो. मनातील गोंधळ आपोआपच दूर होतो आणि स्थिरता मिळते. मानवी प्रकृतीचा एक अलिखित नियम आहे. कोणात्याही घाई गडबडीत किंवा गोंधळात घेतलेला निर्णय हा यश देणारा किंवा उपयोगाचा नसतो. तो नेहमी चुकीचा परिणाम करणारा असतो. त्यासाठी शांतता हवी असते शिवाय निसर्गाने तयार केलेल्या वस्तूंचा वापर करून ती जागा आसन घालून तयार केली असेल तर निगेटिव्ह म्हणजेच नकारात्मक विचार दूर जातात आणि मन प्रसन्न होते.

साधना, ध्यानधारणा ही शांत, एकांतात किंवा एकाग्रतेने सतत व्हायला पाहिजे. तेव्हा ती फलद्रुप होत असते. रामायणात एक कथा आलेली आहे. ही कथा आपल्याला मनाची एकाग्रता व दृढनिश्चियी बनविते. कथा फारच छान आहे. त्यातून शिकण्यासारखे आहे.

राम रावणांचे युद्ध अत्यंत घनघोर व प्रचंड परिणामिक झाले. सतत सात दिवस झालेल्या युद्धात दोन्हीही बाजूंनी प्रचंड शस्त्रांचा, बाणांचा वापर झाला. सतत संहारक शस्त्रांचा वापर करूनसुद्धा रावण काही मरतच नव्हता. या सगळ्या घडामोडी, दृश्य सीतेला अशोक वनात सांगितल्या जात होत्या. कधी एकदा रावणाचा वध होतो आहे याची सीता फार वाट पाहतं होती. परंतु यश काही येत नव्हते. त्यामुळे चिंताग्रस्त असलेली सीता तिच्याजवळच असणार्‍या त्रिजटा नावांच्या दासीला विचारते, रामराय एवढी प्रयत्नांची शिकस्त करत आहेत. मग तरीदेखील दुष्ट रावण का मरत नाही. त्यावर त्रिजटा फार छान उत्तर देते. ती म्हणते, ‘सीतामाई खरं सांगू, रावणाच हृदामध्ये तुम्हाला मोठे स्थान आहे. तो तुम्हाला हृदयात ठेवतो आहे आणि आपल्या हृदयामध्ये राम दडलेला आहे. जोपर्यंत तुम्ही रामाला विसरत नाही. तोपर्यंत तुम्हाला रावण त्याच्या हृदयातून काढणार नाही. त्यामुळे रामच रामाला कसा मारू शकेल? पण एकवेळ अशी येईल की, राम रावणावर प्रचंड बाणाचा वर्षाव करेल. त्यामुळे त्रस्त होऊन रावण संपेल. रावणाची तुमच्या विषयीची एकाग्रता भंग पावेल. नकारात्मकता लाभेल. तपश्चर्येचा भंग होईल.

डॉ. हेरंबराज पाठक