वटसावित्री पौर्णिमा
ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर
MHNEWS |
नदीकाठची वाळू आणून पात्रात भरावी. तिच्यावर सत्यवान आणि सावित्री यांच्या मूर्ती ठेवाव्या. मग त्यांची षोडशोपचार पूजा करावी. त्यानंतर अर्घ्य द्यावे. मग पुढील मंत्राने सावित्रीची प्रार्थना करावी -
सावित्री ब्रह्मसावित्री सर्वदा प्रियभाषिणी।
तेन सत्येन मां पाहि दु:खसंसारसागरात् ।।
अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते ।
अवियोगास्तवथाS स्माकं भूयाज्जन्मनि जन्मनि ।।
पूजा झाल्यावर संध्याकाळी सुवासिनींसह सावित्रीची कथा श्रवण करावी.
या व्रतात सावित्रीच्या मूर्तीची पूजा सांगितलेली असली, तरी रूढी मात्र वेगळी आहे. सावित्रीचा पती सत्यवान वडाच्या झाडाखाली गतप्राण झाला आणि पुन्हा तिथेच सजीव झाला, या संकेताला अनुसरुन स्त्रिया या दिवशी वडाचीच पूजा करतात. त्यासाठी त्या वटवृक्ष असेल त्या ठिकाणी जाऊन वडाच्या मुळांशी पाणी घालतात आणि त्याला प्रदक्षिणा घालून सुताचे वेष्टण करतात. नंतर त्याची पूजा करतात. नंतर त्याच्या मुळाशी असलेल्या सावित्री-ब्रह्मदेव, सत्यवान-सावित्री, धर्मराज व नारद यांच्या प्रतिमांचे पूजन करतात व प्रार्थना करतात.
वड जवळपास नसले, तर वडाची फांदी कुंडीत रोवून किंवा वटसावित्रीचे चित्र भिंतीवर चिकटवून त्याची पूजा करण्याचीही प्रथा आहे. पूजेनंतर सुवासिनींनी सौभाग्यवायने देतात.
MHNEWS
