शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By रूपाली वर्बे|
Last Updated : बुधवार, 15 जून 2022 (08:39 IST)

पुरुषप्रधान समाजात संस्कृतीरक्षणाची जबाबदारी स्त्रियांवर का?

women fast
उपासतापास स्त्रीने करायचे, निर्जला स्त्रीने राहयचे, पूजा- पाठ स्त्रीने करायचे, कुंकू, मंगळसुत्र, जोडवे, बांगड्या, आणि उन्हातही भरजड साड्या नेसून हातात पूजेचं ताट धरुन आपला तोळ सांभाळत कधी वडाच्या फेर्‍या मारायच्या तर कधी रात्रभर पदार्थ तयार करुन भरपहाटे शीतलामातेचं पूजन, तर कधी भूक-तहालेल्याने जीवाने तीजचे पूजन स्त्रीने करायचे... तर काय त्यात... स्वइच्छेने करते की ती, तिला काही बळजबरी केली आहे कुणी.... हा टोमणा देखील सोबत... पण ती कतृत्तवान असूनही करते कारण पुरुषप्रधान मानसिकतेने आणि सहन केलेल्या आई आणि सासूने अलगद तिच्या खांद्यावर सणंवारं, कर्मकांडे आणि पुराणात लिहिले भार टाकले असतात.... हे पार नाही पाडले तर काहीतरी वाईट घडेल ही भीति भरलेली असते... मग नाईलाजाने का नसो... ती पाऊल टाकते त्याकडे आणि येणारी पीढीलाही नकळत ओढते त्याबाजूला...
 
हल्ली कुणीही इतके कठिण व्रत करत नाही.. सर्व धकतं... अरे व्वा... आपल्या खूप काही सूट मिळाली हा विचार करुन धर्मानं टाकलेली बंधनं पाळली जातात... संसारासाठी रितिरिवाज, कुळाचार, दररोज नवीन सणं आणि पूजेच्या तयारीपासून ते नैवेद्याने भरलेल्या ताटापर्यंत तयारी करण्याची परंपरा पद्धतशीरपणे स्त्रियांच्या पदरात घातली आहे.. याचे ठसे इतके गडद आहे की यात नवीन काय, हे पाळणे तर धर्म आहे आणि आवडतं मला हे सर्व करायला म्हणत संस्कृतीच्या नावाखाली रखडत राहते...
 
आधीच्या बायकांना पैसा कमावण्यासाठी बाहेर पडण्याची गरज नव्हती म्हणून पुरुषांनी त्यांना करमणूक म्हणून या परंपरा सुरु केल्या असाव्यात, ज्याने त्याचं मन रमलेलं राहावं..किटी - पिकनिक नाही म्हणून अशाने बायकां घराबाहेर पडून चार बायकांशी ओळख करुन घ्यायच्या, हळद-कुंकु म्हणून सुख-दु:ख वाटून घ्यायच्या... सण साजरा केल्याने भेटी-गाठी व्हायच्या... सोशल मीडिया नाही म्हणून चार पदार्थ शिकून घ्यायच्या...अशा कार्यक्रमांमुळे आपल्या नवीन साड्या, दागिने दाखवण्याची संधी मिळत असे... मात्र आजही टेक्नॉलॉजीमुळे काही विशेष फरक न पडता उलट नटूनथटून फोटो अपलोड करण्याची हौस पूर्ण केली जातं आहे...
 
उरलीसुरली भर टीव्ही मालिका भरुन काढत आहे.... घरात एक दिवसही शांती नसलेल्या तर दोन-तीन बायकां सोबत राहत असलेल्या नवर्‍यासाठी देखील स्त्रिया मात्र सणवारं उत्साहाने साजरा करतात...  दागिने काय, साड्या काय, नटणे काय, नवीन फॅशन मांडली जाते.. वरुन सौभाग्याच्या वस्तूंवर एक दोन भावनिक डॉयलॉग मारले जातात... आणि स्त्रिया त्यात वाहत जातात.. दिवा विझणे, कुंकु पुसणे, बांगड्या फुटणे किंवा मंगळसूत्र वाढवणे... अरे बाप रे.. अपशुकन घडणार... तसेच एखादी स्त्री सवाष्ण गेली तर भाग्यवान आणि नवरा आधी मेला तर पापी.. हे चित्र मनात घर करतं आणि अंधविश्वासात भर पडते आणि कर्मकांडाच प्रमोशन होतं...
 
सगळे सणं नवर्‍याच्या दिर्घायुष्यासाठी, निरोगी राहण्यासाठी... हे व्रत करुन आशिर्वाद मिळणार तेही सौभाग्यवती हो म्हणून... कारण बुद्धिमत्ता, पैसा, स्वत:चे आरोग्य, यश, ताकद अशा गरजेच्या गुणांची अपेक्षा स्त्री ठेवूच शकत नाही.. शेवटी काय... करणार ही आणि भाग्य लाभणार पुरुषांना... आणि हो महत्त्वाचं म्हणजे यावर चर्चा नको... नाही तर काय वाया गेलेली बाई आहे ही वगैरे... असे ऐकायला मिळतं...
 
पुरुषांसाठी व्रतवैकल्ये स्त्रीने करायचे... आणि पुरुषांनी काय.. उपाशी पोटी स्त्रीने तयार केलेले पक्कवान... त्यावर ताव मारायचा.. त्या त्यांची काहीच चूक नाही... पुरुषांनी मांडलेल्या परंपरा... आजही पुरुष मंडळी त्याचा आनंद घेत आहे आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा महिलांनी मात्र अभिमान बाळगायचा.. तसेच याविरोधात बोलण्याची तर सोयच नाही...यावर बोलायला गेलो तर स्त्रियाचं आधी पाय खेचतील..पाय कसले थेट जीभचं ओरबाडतील...
 
खरं मन ऐकालं तर... घरी कटकट नको म्हणून पाळते मी... एखाद्याचं मन राखयला एवढं केलं तर काय बिघडलं?... आपल्या मुलांना कसे कळतील सण वारं.... अगं मनाला बरं वाटतं केल्याने... माझी श्रद्धा आहे... मलाच खूप आवड आहे म्हणून करते... असे एकापेक्षा एक लॉजिक मांडले जातात... अगदी स्वत:ला फेमिनिस्ट म्हणून घेणार्‍या देखील यात कच्च्याचं.. धर्माविरुद्ध बोलायचं तरी कसं.. खरंच उद्या काही उलट घडलं तर... या प्रथा, परंपरा आणि कर्मकांड दर्शवणारं धर्म, यावर मात्र स्त्रीवादी देखील चकार शब्द काढत नाहीत.... आपल्याला काय, चांगलं नटायला मिळतंय, 'पाउट' सेल्फी घेऊ... स्टेट्स अपडेट करु... सर्वांनी केले देखील... आपण पटकन टाकायला हवं...
 
अहो पण आपल्यावर ही अप्रत्यक्ष संस्कृती जपण्याची बळजबरीच आहे, हे कुणालाच लक्षात येतं नाहीये... कारण ते जन्मापासून गुटीत पाजले गेले आहे.. हे सगळं पुरुषांनी मांडलेलं आणि त्यांच्याभोवती फिरवणारं ठरतंय हे कळत नाहीये... फेमिनिझमच्या नावाखाली स्त्रीवादी महिला किती जरी पुरुषांना खाली पाडण्याचा प्रयत्न करत असतील पण पुरुषांनी बनवलेल्या धार्मिक व्यवस्थेबद्दल सर्व गप्प... त्यात नकळत अडकलेल्या महिला... त्या विषयावर बोलणे देखील पाप घडल्याप्रमाणे वागतात... यात काही चुकीचे वाटत नसेलही कदाचित कारण... कित्येक वर्षांपासून व्यवस्थिपणे तू यात रुजावी म्हणून खांद्यावर रुढी-परंपरेचं ओझं ठेवलं... आणि भरभरुन कौतुक केलंय.... की तूच ती शक्ती आहे जे कल्याणासाठी हे लादू शकते... ते ओझं जाणवतच नाही कारण तू नकळत त्याला कर्तव्य मानलं.. आपल्यामुळे सर्व सुरळीत घडत असल्याचा अभिमान बाळगत सर्व मुकाट्याने स्विकारलं... प्रश्न विचारणार्‍यांना अधर्मीचा टॅग मिळाला नाहीतर भीती दाखवली गेली...
 
पुरुषांचं यशच यात आहे की महिला किती तरी काळापासून शारीरिक वेदना सहन करुन, हसून-नटून गुलामी करताय... त्यात चुकुनही एक जरी चुक घडली तर... पुरुष सांत्वना देताय... मात्र आपल्याकडून अपराध घडला म्हणून स्त्रिया मात्र प्रायश्चितच्या रुपात स्वत:चे अजून हाल करून घेताय..