शरीरमाध्यम खलु सर्वसाधनम
- सुश्रुत जळूकर
“We have moved from a state of nothing to everything! अर्थात- आम्ही काही नसल्याच्या अवस्थेतून सर्व काही असल्याच्या अवस्थेत पोहोचलो आहोत.” एक काळ होता, माणूस निरोगी, आरोग्यसंपन्न, बव्हंशी निर्व्यसनी असायचा. आज उलट चित्र दिसते. आरोग्यसंपन्न, निरोगी, निर्व्यसनी माणसे बोटावर मोजण्याइतकी असतील. तरूण वयातच अनेकांना विविध व्याधींनी ग्रासले जाते. एक प्रकारे ते वृद्धच होतात.
व्याधी होण्यात महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या शरीराला हलण्याची सवय राहिली नाही. पूर्वी दळण्यासाठी जाती, पाटा-वरवंटा होता. आता याची जागा घेतली आहे मिक्सर, ग्राईंडर, वॉशिंग मशीन, व्हॅक्यूम क्लिनर, इलेक्ट्रॉनिक ब्रुम अशा वस्तूंनी. दशकापूर्वी दळणासाठी महिला किमान चक्कीवर तरी जात होत्या, मात्र आता ‘रेडिमेड’ पीठ आणले जाते. चटण्या, पोळ्यांपासून अगदी आंब्याचा रससुद्धा रेडिमेड आणि घरपोच मिळतो. या 'रेडिमेड' पदार्थांमुळे टिव्हीवर सिरीयल पाहण्यात वेळ घालवता येतो. परिणामी कुटुंबातील परस्पर संवाद थांबतो. मुलांना ट्यूशन लावून त्याचे तोंड बंद केले जाते. आणि हातात खायचा पदार्थ घेऊन यजमान आणि यजमानीणबाई टिव्हीसमोर बसून (खाण्यासाठी) तोंड हलवत असतात.
दैनंदिन जीवनातून व्यायाम हद्दपार झालेला असताना पोटात जाण्याच्या पदार्थांत मात्र बेसुमार वाढ झाली आहे. हॉटेलिंग वाढले आहे. त्यातच वीक-एन्डसाठी बाहेर जाऊन खाण्याचा नवा 'सांस्कृतिक उपक्रम' आता जीवनात आला आहे. चायनीज फूड, फास्ट फूड खाण्याच्या सवयींचा आलेख मोठा होतोय. मुलांनाही याचं आकर्षण आहेच, मग काय? पटकन् बनवता येणारे नूडल्ससारखे पदार्थ लगेच तयार होतात. अधूनमधून हे खाणे ठीक, मात्र आठवड्यातले २-३ दिवसातून एकदा न घेणेच इष्ट. नावात जरी “फास्ट” असले तरी माणसाचे शरीर यामुळे “स्लो” होते, हे विसरू नका.
मुलांच्या 'पाठी' वेगळीच दुखणी लागली आहेत. अनेक विद्यार्थी पाठदुखीची तक्रार करतात. पुस्तकांचे आणि अभ्यासासह दप्तराचे ओझे बाळगल्यानंतर हे होणे स्वाभाविकच. त्यातच टिव्ही, कम्प्युटर, व्हिडीओ गेम्स यामुळे डोळेदुखी न जडल्यास चमत्कारच म्हणावा लागेल. त्यातच ‘व्हायरल इन्फेक्शन’ची 'साथ' सगळ्या कुटुंबात पसरली आहे. टीव्हीवरच्या जाहिराती आणि अत्याधिक सतर्कता यामुळे दवाखान्यात न जाताच मुलांना औषध दिले जाते. सर्दी झाल्यास लगेच सर्दीचे औषध देणे, जास्त खेळू न देणे, मातीत-रेतीत खेळू न देणे यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती वाढेल कशी? मुलांना थोडी सर्दीही होऊ द्यावी, अभ्यासाच्या वेळांचे नियोजन करून भरपूर खेळू द्या. प्रतिकारशक्ती नक्कीच वाढेल. लहान वयातच मधुमेह होण्याचे प्रमाणही वाढते आहे. हा भाग थोडा अनुवंशिकही आहेच. मात्र यावर वेळीच उपचार करावे.
शरीर वाकविण्याची सवय लहानपणीच लागायला हवी. पण नंतर जरी त्याचे महत्त्व कळले तरी त्याचे अनुकरण करायला हरकत नाही. रामदेव बाबा, श्री श्री रविशंकर अशा अनेक बाबा मंडळींनी योग आणि अध्यात्माची सांगड घातली आहे. त्यामुळे 'पडीले वळण इंद्रियासी' ही सवय मोडून शरीराला चांगले 'वळण' देण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्याला आपणही 'हातभार' लावला पाहिजे. तरच शरीराचा 'भार' कमी होण्यास मदत होईल. आयटी क्षेत्रात तासनतास कॉम्प्यूटरवर काम केल्याने डोकेदुखी, डोळेदुखी आणि पोटाचे विकार जडतात. अनेकांना वेदनाशामक औषध घेतल्याशिवाय चालतच नाही. ही सवय चांगली नाही. भरीला ताणतणावही असतो. पण ध्यानधारणा शिकवणारी शिबिरांत गेल्यास हा तणाव दूर करण्याची पद्धतही कळते. दैनंदिन जीवनात ती आचरणात आणता येते. हृदयविकाराचे रुग्णही खूप उपाय-उपचार करतात. याबाबत, नियमित व्यायाम-सातत्य आवश्यक असून नियमित व्यायामाचा एक फायदा म्हणजे ह्दयविकार होत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. थोडक्यात 'शरीरमाध्यम खलु सर्वसाधनम' हे लक्षात ठेवले पाहिजे. शरीर संपन्न राहिले तरच आरोग्यसंपन्न व्हाल. त्याचवेळी शरीराप्रमाणे मनही प्रसन्न राखले पाहिजे. कारण 'मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीस कारण' हे समर्थ उगाचच म्हणून गेलेले नाहीत. नाही काय?