गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 20 मार्च 2023 (12:09 IST)

अमृतपाल सिंगचा शोध तिसऱ्या दिवशीही सुरूच, काका हरजित सिंग यांचं आत्मसमर्पण

अमृतपाल सिंग आणि त्याच्या 'वारिस पंजाब दे' या संघटनेवरील कारवाईवरचा आजचा तिसरा दिवस आहे. अमृतपाल सिंग अजूनही फरार आहे. त्याला शोधण्यासाठीची मोहीम सुरू आहेच.
दुसरीकडे, अमृतपाल सिंगचे काका हरजित सिंह आणि ड्रायव्हरने आत्मसमर्पण केलं आहे. आतापर्यंत 112 लोकांना अटक करण्यात आली आहे.
 
पीटीआय या वृत्तसंस्थेने जालंधर (ग्रामीण) चे पोलीस अधीक्षक स्वर्णदीप सिंह यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. त्यांच्या मते दोघांनी रविवारीच आत्मसमर्पण केलं आहे.
 
बीबीसी प्रतिनिधी अरविंद छाब्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतपाल सिंगला अटक करण्याचा प्रयत्न अद्यापही सुरू आहे. पहिल्या दिवशी पंजाब पोलिसांनी अमृतपाल सिंग यांच्या निकटवर्तीयांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर रविवारीही 34 समर्थकांना ताब्यात घेण्यात आलं होतं.
 
पोलीस कारवाई दरम्यान पंजाबमध्ये हाय अलर्ट जारी केला आहे. चंडिगढमध्ये अनेक ठिकाणी कलम 144 लागू करण्यात आला आहे.
फिरोजपूर, भटिंडा, रुपनगर, फरीदकोट, बटाला, फजिल्का, होशियारपूर, गुरुदासपूर, मोगा आणि जालंधर सहित अनेक ठिकाणी पोलिसांनी फ्लॅग मार्च केला. पोलिसांनी या प्रकरणात सलोमा गावातून दुसरं वाहन जप्त करण्यात आलं आहे. त्यात बंदुक, तलवार सहित अन्य वस्तू जप्त केल्याचा दावा करण्यात आला आहे.
 
पंजाब सरकारने मोबाईल आणि इंटरनेट सेवेवरची बंदी सोमवारी दुपारपर्यंत वाढवण्यात आले आहेत.
 
लंडनमधील भारतीय दूतावासावरील तिरंगा उतरवण्याचा प्रयत्न
अमृतपाल सिंग प्रकरणाचे पडसाद आता परदेशातही उमटू लागले आहेत. लंडनमध्ये असलेल्या भारतीय दुतावासाबाहेर गोंधळ घालण्याचा प्रयत्न करत असलेल्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
 
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये एक व्यक्ती खलिस्तान लिहिलेलं काही बॅनर फडकावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तसंच त्याने भारताचा ध्वज उतरवण्याचा प्रयत्न केला.
 
या झटापटीत दोन पोलीस जखमी झाले असून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
 
PA या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार तिथे जमा झालेले लोक खलिस्तानी चळवळीचे समर्थक आहेत.
 
ही घटना झाल्यानंतर तिथल्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आलं आहे. पोलीस येण्याआधी तिथे जमा झालेल्या व्यक्तींनी पळ काढला असं पोलिसांनी सांगितलं.
 
लंडनचे महापौर साजिद खान यांनी या घटनेचा निषेध केला आहे. अशा प्रकारच्या शक्तींना आमच्या शहरात थारा नाही, अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे.
 
भारताचा झेंडा उतरवण्याच्या कथित घटनेनंतर भारताने दिल्लीतील ब्रिटिश उच्चायुक्तालयातील सर्वोच्च अधिकाऱ्याला पाचारण केलं आहे.
 
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार ब्रिटिश उच्चायुक्तांना भारत सरकारने बोलावलं आणि तिथे पुरेशी सुरक्षाव्यवस्था का नव्हती अशी विचारणा केली आहे आणि स्पष्टीकरण मागितलं आहे.
 
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये खलिस्तानी समर्थक भारताचा ध्वज खाली उतरवताना दिसत आहेत.
 
परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात एक निवेदन जारी केलं आहे. ब्रिटनच्या भारतीय दुतावासात काम करणाऱ्या लोकांच्या सुरक्षेप्रति ब्रिटिश सरकार कटिबद्ध नाही, हे अस्वीकारार्ह आहे.
 
पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या बातमीनुसार, भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त अलेक्स हेलिस सध्या दिल्लीत नाहीत. त्यामुळे उपउच्चायुक्त क्रिस्टियन स्कॉट यांना पाचारण करण्यात आलं.
 
"लंडनमध्ये झालेल्या भारतीय उच्चायुक्तालयाच्या विरोधात फुटीरतावादी आणि दहशतवादी कारवायांचा निषेध नोंदवण्यासाठी नवी दिल्लीतील उच्चायुक्तांना पाचारण करण्यात आलं," असं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.
अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेबाबत स्पष्टीकरण मागत या घटनेत सामील असलेल्या लोकांना अटक करण्याची मागणी भारताने केली आहे.
 
ब्रिटिश उच्चायुक्तांनी एक ट्विट करत या घटनेचा निषेध केला आहे.
 
अमृतपाल सिंग नेमका आहे तरी कोण?
मागील काही दिवसांपासून पंजाबच्या राजकारणात अमृतपाल सिंगच्या नावाची चर्चा जोरावर आहे.
 
29 वर्षीय अमृतपाल सिंग खलिस्तान समर्थक असल्याचं म्हटलं जातं. मागच्या वर्षी ॲक्टर-ॲक्टिविस्ट असलेल्या दीप सिंग सिद्धूचं निधन झालं.
 
दीप सिंग सिद्धूने ह्यात असताना 'वारीस पंजाब दे' या संघटनेची स्थापना केली होती. त्याच्या मृत्यूनंतर ही जबाबदारी अमृतपाल सिंगच्या खांद्यावर येऊन पडली. ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी अमृतपाल सिंगला दुबईहून परतावं लागलं.
ॲक्टर-ॲक्टिविस्ट अशी ओळख असणारा दीप सिंग सिद्धू शेतकरी आंदोलनादरम्यान प्रकाशझोतात आला होता. पुढे रस्ता अपघातात त्याचा मृत्यू झाला.
 
मीडियाला दिलेल्या एका इंटरव्ह्यू मध्ये अमृतपाल सिंग सांगतो की, अमृतसरच्या जादुखेडा गावात त्यांचं बालपण गेलं. 10 फेब्रुवारी 2023 मध्ये बाबा बकाला इथे त्याचा विवाह पार पडला.
 
गोपनीयतेचा मुद्दा पुढे करत त्याने आपल्या पत्नी आणि कुटुंबाबद्दल काहीही सांगणं टाळलं. शिवाय माध्यमांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करणं टाळावं असंही पुढे सांगितलं.
 
अमृतपाल सिंहच्या म्हणण्यानुसार, शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर रोजगाराच्या शोधात त्याने अरबस्तान गाठलं.
 
आपला स्वभाव लोकांमध्ये मिसळण्याचा नसून मित्रमंडळी सुध्दा मर्यादित असल्याचं त्याने सांगितलं.
 
एका मुलाखतीत त्याने सांगितलं होतं की, दुबईतील मोठमोठ्या इमारती बघण्यासाठी लोक खूप लांबून लांबून येतात. पण दुबईमध्ये राहत असताना देखील आपण या इमारती पाहायला कधी गेलोच नाही.
 
आपल्या शिक्षणाविषयी तो सांगतो की, शाळेत असताना त्याने त्याच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं होतं. पण त्यानंतर तो दुबईला गेला.
 
तर दुसऱ्या एका मुलाखतीत त्याने सांगितलं होतं की, इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये त्याने तीन वर्ष घालवली, पण आजही त्याला इंजिनिअरिंगची डिग्री मिळालेली नाही.
 
पोलीस स्टेशनवर काढला होता मोर्चा
'वारीस पंजाब दे' संघटनेच्या समर्थकांनी अमृतसरजवळील अजनाला येथील एका पोलीस स्टेशनवर गेल्या महिन्यात मोर्चा काढला होता.
 
या संघटनेचे समर्थक बंदुका आणि तलवारी घेऊन आपल्या प्रमुखाला म्हणजेच अमृतपाल सिंगचा सहकारी लवप्रीत सिंग याची सुटका करायला गेले होते.
पोलिस आणि समर्थकांमध्ये झटापट झाली. या झटापटीत एका पोलीस अधिकाऱ्यासह सहा पोलीस जखमी झाले.
 
अमृतपाल सिंगही आपल्या समर्थकांसोबत पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला होता.
 
त्याने पोलिसांना 'अल्टीमेटम' दिला असून संघटनेच्या हजारो समर्थकांनी पोलिस स्टेशनमध्ये एवढा गोंधळ घातला की पोलिसांना लवप्रीत सिंगच्या सुटकेचं आश्वासन द्यावं लागलं. अमृतपाल सिंग आणि त्याच्या समर्थकांसमोर पोलीस हतबल झाल्याचं दिसून आलं.
 
अमृतपाल म्हणाला की, "अमृतपाल हताश आहे, तो एकटा पडलाय असं काही वृत्तपत्रांत छापून आलंय... पण भक्तांनी मला कशापद्धतीने पाठिंबा दिलाय हे तुम्हाला दिसलंच असेल."
 
Published By- Priya Dixit