आसामध्ये पूराने हाहाकार
गुवाहाटी : आसामध्ये पूरामुळे हाहाकार माजला असून जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे. भूतान आणि अरुणाचल प्रदेशच्या किनारपट्टी भागात संततधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर झाली.
या पूराचा १३ जिल्ह्यांतील तीन लाखावर लोकांना फटका बसला आहे. गावांचा संपर्क तुटला असून अनेक लोक पूरात अडकले आहेत. सरकारकडून त्यांच्यासाठी मदतकार्यास सुरुवात झाली आहे. बोंगाईगाव, चिरांग, बारपेटा, जोरहट, बस्का, सोनितपूर आणि दिब्रूगढ या जिल्ह्यांतील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी पात्राबाहेर पडून गावांत शिरले आहे.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आसाममधील पूर परिस्थितीचा आढावा घेतला आणि बचाव व मदतकार्यात केंद्राकडून सहकायार्ची ग्वाही दिली.