संबंधित माहिती
- जेजुरीजवळ अनियंत्रित ट्रकने वारकऱ्यांना चिरडले, तीन महिला भाविकांचा मृत्यू
- मोशी दुर्घटनेत मृतांचा आकडा ७ वर, भावेश वाणी यांचा दुर्देवी मृत्यू
- पुण्यात कात्रजमधून ५.७९ कोटी रुपयांचे एमडी अमली पदार्थ जप्त, एकाला अटक
- पुण्यात भूमी अभिलेख फेरफार प्रकरणी एसडीएम, तहसीलदार आणि इतर १५ अधिकाऱ्यांचे निलंबन
- मोशी कचरा डेपो अपघातात ५० तासांनंतरही ८ कामगार ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरूच
४१ मिनिटांपूर्वीच कुटुंबीयांशी बोलणे झाले होते, होर्मुझ सामुद्रधुनीतील क्षेपणास्त्र हल्ल्यात पुण्याच्या हेरंब करमरकर यांचा मृत्यू
होर्मुझच्या सामुद्रधुनीत (Strait of Hormuz) जहाजांवर झालेल्या हल्ल्यात पुण्यातील एका तरुण मरीन इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 'एमव्ही जीएफएस गॅलेक्सी' या मालवाहू कंटेनर जहाजावर 'थर्ड इंजिनिअर' म्हणून कार्यरत असलेले हेरंब करमरकर असे या मृत तरुणाचे नाव आहे.
प्रक्षेपकाच्या हल्ल्यामुळे लागली आग
रविवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास हे जहाज ओमानच्या जलसीमांजवळून जात असताना एका प्रक्षेपकाचा या जहाजाला फटका बसला. या आघातामुळे जहाजाच्या इंजिन रुममध्ये भीषण आग लागली.
हल्लानंतर हेरंब बेपत्ता
जहाजावरील एकूण २४ कर्मचाऱ्यांपैकी ११ जण भारतीय होते. ओमानच्या नौदलाने वेळेत बचावकार्य राबवून २३ जणांना सुरक्षित बाहेर काढले. मात्र, हल्ला झाला तेव्हा हेरंब इंजिन रुमच्या जवळ असल्याने ते बेपत्ता झाले होते. मंगळवारी त्यांच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आली.
शेवटचा फोन कॉल झाल्यानंतर बरोबर ४१ मिनिटांनी हा स्फोट झाला
मिळालेल्या माहितीनुसार, हल्ल्यापूर्वी रविवारी रात्री २:४९ च्या सुमारास हेरंब करमरकर यांनी पुण्यातील आपल्या कुटुंबीयांशी शेवटचे संभाषण केले होते. या संभाषणानंतर बरोबर ४१ मिनिटांनी—म्हणजेच पहाटे ३:३० वाजता—त्यांच्या जहाजावर हल्ला करण्यात आला. त्यानंतर मंगळवारी, त्यांच्या कंपनीने कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांच्या मृत्यूची बातमी दिली. ही बातमी कुटुंबासाठी अत्यंत धक्कादायक ठरली असून, या घटनेनंतर पुण्यात शोककळा पसरली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ते या सागरी मोहिमेवर होते आणि लवकरच भारतात परतणार होते.
भारत सरकारचा तीव्र निषेध
अमेरिका आणि इराण यांच्यात वाढत्या आंतरराष्ट्रीय तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीत व्यावसायिक जहाजांवर हल्ले वाढले आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने इराणी दूतावासाच्या उपप्रमुखांना बोलावून या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला आहे. तसेच, पश्चिम आशियातील हिंसाचार तात्काळ थांबवून संवाद साधण्याचे आवाहन केले आहे.
यूएईमधील भारतीय दूतावास या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, प्रभावित झालेल्या आणि जखमी झालेल्या इतर भारतीय खलाशांना आवश्यक ती सर्व मदत पुरवली जात आहे.
