1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

अजून १४ ते १५ आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात : जयंत पाटील

राज्यात आता राष्ट्रपती राजवट लागू झाली असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मेरिटवर आमदारांची भरती होईल, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. भाजपा आणि अपक्ष मिळून १४ ते १५ आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.
 
संपर्कात असलेल्या या आमदारांना योग्यवेळी पक्षात घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. शिवाय ही भरती मेगाभरती नसून मेरिटवर भरती असणार असल्याचं जयंत पाटील म्हणाले. भाजपात गेलेले अनेक नेते राष्ट्रवादीत परतण्यास इच्छुक आहेत, पण स्थानिक नेत्यांशी बोलूनच भाजपात गेलेल्या नेत्यांना परत घेण्याबाबत विचार करणार असल्याचं ते म्हणाले. राष्ट्रवादीच्या संपर्कात असलेल्या आमदारांची नावं घेऊन त्यांना आता अडचणीत आणणार नाही, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.
 
ज्या भाजपाविरोधात लढलो त्या पक्षासोबत जाण्याला मर्यादा आहेत, असं सूचक विधानही जयंत पाटील यांनी केलं. राष्ट्रवादीच्या बैठकीला आले असताना पाटील यांनी भाजपासोबत जाण्याची शक्यता पूर्णतः फेटाळली नाही. शिवसेनेसोबत जाण्यासंदर्भात 'दगडापेक्षा वीट मऊ' अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. राज्यात सरकार देण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाही. शरद पवारच याबाबत निर्णय घेतील, असंही पाटील म्हणालेत.