शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 7 जुलै 2021 (23:33 IST)

त्यांच्यामुळेच मी आज मंत्री बनलो, मोदी जी जबाबदारी देतील, ती मी सांभाळेन

राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी चार व्यक्तींचे प्रामुख्याने आभार मानले असून त्यांचे ऋणी असल्याचं सांगितलं आहे. “आज मी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आभारी आहे. त्यांच्यामुळेच मी आज मंत्री बनलो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी जबाबदारी देतील, ती मी संभाळेन”, असं राणे यावेळी म्हणाले.दरम्यान, आपण आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज्ञेप्रमाणे काम करू, असं देखील राणेंनी यावेळी नमूद केलं. “सुरुवातीला मुंबई पालिकेत १९८५मध्ये नगरसेवक झालो. मग बेस्टमध्ये चेअरमन झालो. मग आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, पुन्हा आमदार, खासदार आणि आता मंत्रीपदाची शपथ घेतोय याचं सर्व श्रेय नरेंद्र मोदी, अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं आहे. त्यांचा मी ऋणी आहे. मोदी देतील ती जबाबदारी मी सांभाळीन. त्यांच्या आज्ञेप्रमाणे मी काम करीन. महाराष्ट्राला मंत्रीपद मिळाल्याने महाराष्ट्राला न्याय देण्यासाठी मी काम करीन”, असं राणेंनी नमूद केलं.
 
“अनेक चढ-उतार आले. पण शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या कृपेने, सहकार्याने, आशीर्वादाने मला हे पद मिळालं आहे. मी त्यांचा ऋणी आहे. त्यांनी टाकलेला विश्वास मी सार्थ ठरवीन”, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं.