शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 7 ऑगस्ट 2022 (11:26 IST)

सहिष्णू असणं म्हणजे द्वेषपूर्ण वक्तव्यंही खपवून घेणं नाही- जस्टिस चंद्रचूड

सहिष्णू असणं म्हणजे एखाद्या व्यक्तीने केलेली द्वेषपूर्ण वक्तव्यंही खपवून घेणं असा अर्थ होत नसल्याचं मत जस्टिस डी. वाय. चंद्रचूड यांनी व्यक्त केलं आहे.
 
गुजरात नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांसोबत जस्टिस चंद्रचूड यांनी शनिवारी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या सद्सद्विवेकबुद्धीनुसार वागण्याचाही सल्ला दिला.
 
सोशल मीडियाच्या मर्यादित 'अटेन्शन स्पॅन'च्या काळात आपलं काम हेच दीर्घकाळ परिणाम करणारं ठरतं.त्यामुळे आपण दैनंदिन आयुष्यातल्या लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींचा फारसा विचार केला नाही पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं.
 
"व्होल्टेअरनं म्हटलं होतं की, तुम्ही जे म्हणत आहात त्याच्याशी मी सहमत नसेन. पण तुमच्या मत मांडण्याच्या अधिकाराचं मी मरेपर्यंत रक्षणच करेन. आपण हीच शिकवण स्वतःमध्ये बिंबवली पाहिजे," असं चंद्रचूड यांनी या विद्यार्थ्यांना सांगितलं.