शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019 (09:57 IST)

मराठवाड्यात पाऊसच नाही तरीही नदीला आला पूर, कसे शक्य आहे ?

मराठवाड्याची जीवनसंजीवनी असलेला जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यामुळे कोठेही पाऊस नसतानाही बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील होत असलेल्या सतत पावसामुळे जायकवाडीत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरु असून, त्यामुळे जायकवाडीतून पुढे विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे. गेवराई तालुक्यातील 32 गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर शनीचे राक्षस भुवन येथील शनी मंदिरात पाणी शिरलं आहे. पांचाळेश्वर मंदिरही पाण्याने वेढलं आहे.
 
नाशिक जिल्ह्यात पडत असलेल्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पूर स्थिती कायम आहे. त्यामुळे आधीच शंभर टक्के भरलेल्या जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग करावा लागत आहे. त्यामुळे जायकवाडी धरणाचे तब्बल 16 दरवाजे अडीच फुटाने उचलून तब्बल 37 हजार क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग केला आहे. त्यामुळे धरणाखालील परिसरात गोदावरी नदीला पूर आला आहे. पाण्याचा विसर्ग धरणात आणखी वाढला तर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात केला जाण्याची शक्यता आहे. इकडे नाशिकला अजूनतरी पाऊस सुरु असल्याने आणि धरणातून विसर्ग सुरु असल्याने जायकवाडीला पाणी पोहचत राहणार असून अजून काही दिवस पूर स्थिती कायम राहणार आहे. मात्र जायकवाडी मुळे पुढील अनेक जिल्ह्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.